Tuesday, March 20, 2012

" पुर्ण होईल अशी ईच्छा..!"

           नमस्कार मित्रांनो, यंदांच २०१२ हे वर्ष खरं तर माझ्यासाठी लिखाणाच्या बाबतीत खुप लकी ठरलयं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही कारण वर्षाच्या सुरुवातीलाच "तो आणि त्याची ती" ही कादंबरी पुर्ण झाली, "लाईफ इन फार्मसी कॉलेज" या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचं काम पुर्णत्वाकडे चाललयं, आणि यासगळ्यांच्या जोडीला "शिंपल्यातले मोती" या कथा-संग्रहातील ११ पैकी ७ कथा पुर्ण झालेल्या आहेत. म्हणुनच यावेळी मनात लपवलेले शब्द तुमच्या समोर घेऊन आलोय ते या नव्या कथेच्या स्वरुपात..! "पुर्ण होईल अशी ईच्छा" ही शिंपल्यातले मोती या कथासंग्रहातील पहिली कथा, तसं "पुर्ण होईल अशी ईच्छा..!" यानावावरुन कित्येकांनी कथेत काय असु शकतं याचा अंदाज लावायला सुरुवात केली असेल, पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी कित्येकांचे अंदाज नक्कीच चुकतील. तशी ही कथा ८-मार्चला म्हणजेच जागतिक महिलादिनीच टाकायला हवी होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झाला, असो, मुलगी, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सुन, सासु आणि अनंतकाळची माता अशा प्रत्येक भुमिकेला आयुष्यभर न्याय देणार्‍या स्त्रीवर्गाच्या कर्तृत्वाला सलाम..! कथा बरीच मोठी आहे, म्हणुन या कथेचा मुख्य सारांश टाकतोय, तर जास्त शब्दांची  ताणा-ताण न करता कथेलाच सुरुवात करतो..!
        "आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी पुन्हा जर घडणार असतील तर मी पहिले त्यांचा शेवटच बदलुन टाकला असता गं..!" असं आपल्या पत्नीकडे बघुन म्हणतांना दिनेशच्या डोळ्यांत पाणी दाटुन आलं होतं. सोनोग्राफी सेंटरमध्ये ते आपला नंबर कधी येईल त्याची वाट बघत होते. दिनेशपेक्षा जास्त टेंशन आलं होतं ते मालतीला. तितक्यात त्यांच्या नाव पुकारलं आणि त्या दोघांना आत तपासणीसाठी बोलवलं, आत तपासणीसाठी जातांनाच मालतीचं मन काळजीच्या समुद्रात अखंड बुडुन गेलं, ती तिचा, दिनेश आणि त्यांच्या होणार्‍या बाळाचा विचार करु लागली.
        दिनेश आणि मालती ह्या दोघांचा प्रेमविवाह झालेला होता, त्या दोघांचही रसायनशास्त्रात पदविकेपर्यंत शिक्षण पुर्ण झालेलं होतं. दोघं कॉलेजला असतांना एकमेकांच्या प्रेमात पडलेली होती. आपलं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर दिनेश आणि मालतीनं विवाह करायचा ठरवलं खरं पण त्यांच्या समोर मोठी अडचण होती ती म्हणजे "जात"..! दोघही वेगवेगळ्या जातीची होती, त्यामुळे घरच्यांकडुन कडाडुन विरोध होणार याची दोघांना कल्पना होती, पण तरीही दिनेशनं धाडसं करुन मालतीच्या घरी विचारलं, अपेक्षेप्रमाणे त्याला विरोध झालाच, "अरे वेडा झालास का? अरे कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या पोरीनं, शेजार्‍यांना कळलं तर, अगं नातेवाईक तर तोंडावर थुकतील माझ्या, आपला समाज वाळीत टाकेल आपल्या कुटुंबाला, हे असं थ्यारं करायचे म्हणुन कॉलेजात जायची का तु?" आणि असं बरंच काही मालतीच्या वडीलांनी दिनेशला सुनावलं होतं. आणि स्वतःच्या घरी जेव्हा दिनेशनं विचारलं तेव्हा तर जणु त्याच्या घरात अणुबॉंम्ब पडवा असा हाहाकार झाला. पण आईनं आपल्या लेकराच्या पंखात बळ दिलं, आणि मोठ्या मुश्किलीने दिनेशचे वडील त्या लग्नाला तयार झाले पण एक महाकठीण अट त्यांनी त्याला घातली होती. इकडे दिनेशशी लग्नाला नकार दिल्याने मालतीने अन्नपाण्याचा त्याग केला दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत होती, शेवटी तिचेही घरचे लग्नाला तयार झाले, आणि त्या दोघांचा तो आंतर-जातीय विवाह पार पडला.
        चावडीवरुन गप्पा मारुन जेव्हा दिनेशचे वडील घरी परतायचे तेव्हा जमलेल्या बाकीचे वयस्करांसाठी खालच्या जातीतील पोरीशी गावच्या देशमुखाच्या पोरानं लग्न केलं हा कितीतरी दिवस चर्चेचा विषय ठरायचा. कित्येक जणांना मालती हडळ वाटायची, त्यांच्या मते तीनंच काहीतरी करणी करुन दिनेशला लग्न करायला भाग पाडलं असं वाटायचं या अशा गोष्टीमुळे समाज भ्रष्ट होऊल, गावावर देवीचा कोप होईल, गावात रोगराई पसरेल, दिनेशच्या ह्या कृत्याने गावातील बाकीची तरणी पोरं सुद्धा असंच काहीतरी करु शकतील अशी भिती त्यांना वाटायची, पण दिनेशच्या वडीलांसमोर असं त्यांना सांगायची हिम्मत होत नव्हती. त्याउलट एका खालच्या जातीच्या मुलीशी लग्न करुन समाजापुढे आदर्श ठेवला असं गावच्या काही शिकलेल्या तरुणांना वाटायचं म्हणुनच काय की त्यांना दिनेश एकदम पिक्चर मधला हिरोच वाटायला लागला. दिनेशच्या घरात हळुहळु मालती त्याच्या कुटुंबातील एक एक सदस्याचा विश्वास जिंकत होती. आपल्या सासुबाईंची तर ती लाडकी सुन बनुन गेली, आपल्या लेकाच्या बरोबरीनं शिक्षण घेतलेल्या मुलीला सगळं घरकाम येतं, हा सासुबाईंसाठी मोठा कौतुकाचा विषय असायचा. मालतीसुद्धा हळुहळु आपल्या संसारात रमत होती, आणि अशातच एकदिवस आपल्या संसारात नवीन पावलांच आगमन होईल हे जेव्हा तिला कळालं तेव्हा तर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
        आपण बाप होणार आहोत हे जेव्हा दिनेशला कळलं त्यावेळी त्यालाही तितकाच आनंद झाला, पण फार काळ त्याचा तो आनंद टिकला नाही, त्याला कारण होतं त्याच्या वडीलांनी घातलेली लग्नापुर्वीची अट..! दिनेशने जेव्हा त्याच्या घरी आपण मालतीशी लग्न करणार असं सांगितलं त्यावेळी त्याच्या वडीलांनी जणु जमदग्नीचाच अवतार धारण केला असं वाटायला लागला. "आबा, लहानपणा पासुन मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, कधी कुठलाच हट्ट केला नाही, आजपर्यंत कधी तुमचा शब्द खाली पडु दिला नाही. आबा आज तुमच्याजवळ तुम्हाला जमेल आणि माझी पुर्ण होईल अशीच ईच्छा मागतोय ना आबा, आनंदानं द्या संमती माझ्या लग्नाला, आबा ही पहिली आणि शेवटचीच पुर्ण होईल ना माझी ईच्छा?" असं म्हणुन दिनेश खुप रडला होता. त्यावेळी दिनेशच्या वडीलांनी त्याला सांगितलं, "पोरा, मला उभ्या आयुष्यात वाटलं नव्हतं तु असं काही करशील, तुझ्या हातुन जे काही घडलं त्यातुन खुप दुखावलोयं मी, पण तुशी ईच्छा जरुर पुर्ण होईल, मी तुझ्या लग्नाला होकार देईल पण एका अटीवरच, आपल्या घराण्याची परंपरा आहे, आजपर्यंत या घरातल्या ज्यांची लग्न झाली, त्या सगळ्यांना लग्नानंतर पहिला मुलगाच झाला. तु तुझी ईच्छा म्हणुन खुशाल त्या पोरीशी लग्न कर, पण जर लग्नानंतर तिला पहिला मुलगा झाला नाही तर मी तुझं दुसरं लग्न लावुन देईल, आणि ही माझी पुर्ण होईल अशी ईच्छा आहे, बोल कबुल आहे का अट?" अशा या वडीलांच्या घातलेल्या अटीला दिनेशने त्यावेळी होकार दिला होता, पण आता त्याला त्या अटीमुळे अस्वस्थता जाणवत असे, जर आपल्याला मुलगी झाली तर मालतीचं काय होईल? आपल्या बाळाचं काय होईल याविचारानं आपल्याला वेड लागेल असं त्याला वाटायचं. एकदिवस त्याने धीर करुन मालतीला हा प्रकार सांगितला.
        पायाखालची जमिनच निघुन जावी असा धक्का मालतीला बसला, सासर्‍यांनी घातलेल्या अटीत सगळ्यांत जास्त तीचीच फरफट होणार होती. या सागळ्यामुळे ती दुःखी झाली, सासुबाईंना मालतीच्या दुःखाचं कारण माहिती होतं, त्यांनी तिला आईप्रमाणे धीर दिला, सगळं काही ठिक होईल," देवं इतकी परिक्षा नाही बघणार तुझी लेकरा, त्या विधात्यावर विश्वास ठेव..!" असं त्या तिला म्हणायच्या. दिवसांमागुन दिवस जात होते, तसं तसं मालती आणि दिनेशची काळजी वाढतच होती. एकदिवस रात्री दिनेश मालतीला म्हणाला, "मालती तुला आठवतोयं का गं आपल्या कॉलेजचा पहिला थिम डे? त्यावेळी आपण ते वंशाची पणती हे पथनाट्य सादर केलं होतं ते?" दिनेशच्या त्या प्रश्नानं मालतीच्या चेहर्‍यावर वेगळीच लाली आली, "अरे चांगलाच आठवतोयं ना, त्या पथनाट्यात आपल्याला पहिली मुलगी झालीयं आणि आपण तिच्या जन्मामुळे खुप खुष आहोत असं दाखवलेलं होतं, आणि त्या नाटकानंतर नेहमी मला वाटायचं की मला पहिली मुलगीच व्हावी ते..!" "अगं मला तर अजुनही असंच वाटतं की आपल्याला मुलगीच व्हावी, कॉलेजमध्ये असतांना स्त्रीभ्रुण हत्या थांबवण्यासाठी कितीतरी जनजागृती करणारे उपक्रम आपण  राबवले, मुलगा आणि मुलीत भेदभाव करायचा पटत नाही मला, किती कमनशीबी आहे मी, हीच गोष्ट स्वतःच्या जन्मदात्याला पटवुन देऊ शकत नाही, मालती, मी देवाला रोज प्रार्थना करतो की मला मुलगीच हवी," असं दिनेश मालतीला म्हणाला. "तुझं म्हणनं खरं व्हावं रे, चल झोप आता, उद्या आपल्याला सोनोग्राफीला जायचं आहे ना..!" असं मालती त्याला बोलली.
        सोनोग्राफीची तपासणी करुन झाल्यानंतर मालती आणि दिनेश यांचा चेहर्‍यावरचा आनंद ओसांडुन वाहात होता, आनंदाने ते घरी आले, घरी फक्त मालती आणि बाळाची तब्येत चांगली आहे असंच सांगितलं, आणि योगा-योगाने ८-मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मालतीची डिलीव्हरी झाली, तिला मुलगा-मुलगी अशा जुळ्यांची माता बनायचं सौभाग्य मिळालं, दिनेश मालती जवळ गेला, आपल्या दोन्ही मुलांकडे त्याने बघितलं, आणि म्हणाला खरंच आबा आणि आपण पुर्ण होईल अशीच ईच्छा मागितली नाही का? असं म्हणतांना त्याला आनंदाश्रु आवरणं कठीण गेलं. आपल्याला पहिला मुलगा झाला म्हणुन दिनेशचे वडीलपण खुष झाले होते, आपल्या नातवंडाकडे बघुन त्याचा चेहरा फुलला होता, दिनेशकडे बघताच त्यांनी माफी मागायला हात जोडले, पण दिनेशने त्यांना सावरलं, "आबा, माझी काय माफी मागतायं, उलट देवाचे आभार माना की ज्याच्यामुळे तुमचीच काय, पण माझीही ईच्छा पुर्ण झाली." 
        सासरे बाहेर गेल्यानंतर मालती दिनेशला म्हणाली, "त्या दिवशी तु बोलला की आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी पुन्हा जर घडणार असतील तर मी पहिले त्यांचा शेवटच बदलुन टाकला असता, जर ही गोष्ट पुन्हा घडणार असेल तर दिनेश तुला या गोष्टीचा शेवट कसा अपेक्षित होता रे?" मालतीचा तो प्रश्न ऐकुन दिनेश क्षणभर तिच्याकडे बघुन हसला आणि बोलला, "मालती तुला ठाऊक आहे मला कसा शेवट हवा होता ते, पण असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नाही का? आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट आपल्याला लिहिता येत नाही ते योग्यंच आहे..!" दिनेशच्या त्या उत्तराने मालती सुखावली. ईच्छा तर प्रत्येकाच्या असतात, स्वप्न प्रत्येकजण बघतो, पण फार थोडेच जण त्या स्वप्नांत रंग भरण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्याच ईच्छा पुर्ण होतात. म्हणातात ना ईच्छा असेल तर मार्ग दिसेल, म्हणुन ईच्छा असु द्या, पण त्या पुर्ण करायचा प्रयत्न करायचं सोडु नका. 
        तर मित्रांनो, कसा काय वाटला "पुर्ण होईल अशी ईच्छा", या कथेचा सारांश? आशा करतो की तुम्हाला संपुर्ण कथा वाचायची ईच्छा नक्कीच झाली असणार, दिनेश आणि मालती कसे एकत्र आलेत? लग्नासाठी झालेला त्यांच्या घरच्यांचा विरोध, गावकर्‍यांकडुन होणारी मालतीची अवहेलना, सासर्‍यांच्या अजब अटीमुळे होणारा मनस्ताप, सासुबाईंची माया, हे सगळं वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ब्लॉग लिहितांना काही मर्यादा असतात, म्हणुन संपुर्ण कथा टाकली नाही त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, तुमचीच ईच्छा पुर्ण करण्यासाठी चला आता तुमची रजा घेतो. पुढच्यावेळी पुन्हा येईल नव्या विषयासह, मनात लपवेल्या आणखी काही शब्दांसह, तोपर्यंत प्रत्येकाची एकतरी ईच्छा पुर्ण होवो हीच परमेशवराचरणी प्रार्थना..! जय मराठी,  जय महाराष्ट्र..!

Sunday, March 11, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१

          "आयुष्यात काही जण मुळातच नैसर्गिक हिर्‍याप्रमाने असतात, जोपर्यंत अंगठीच्या कोंदणात बसवण्यासाठी हिर्‍याला तयार केलं जात नाही तोपर्यंत त्या रिकाम्या अंगठी अन त्या हिर्‍याचं अस्तित्व असुन नसल्यासारखंच नाही का? आयुष्यातील आणखी एक नवं वर्ष आलं." असं वाक्य ३१ डिसेंबरच्या रात्री आपल्या डायरीत लिहुन त्यानं बरोबर रात्री १२ वाजता ती डायरी जाळुन टाकली. धडाधडा पेटलेल्या डायरी कडे अर्जुन एकदम निरागसपणे बघत होता. अर्जुन सिराजसिंह राजपुत २१ वर्षाचा मुलगा होता. पिळदार शरिरयष्टी, नाकी डोळे एकदम सुरेख, सावळा असला तरी एक चमक त्याच्या डोळ्यांत असायची. संघर्ष, प्रामाणिकता आणि आदर या तिसुत्रीवर त्याचं आयुष्य चालंल होतं. असा हा अर्जुन मग जमलेल्या आपल्या मित्रांबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी त्यांच्यात मिसळला. "काय यार अर्जुन नेहमी सारखं वर्षभर दररोज अगदी न चुकता डायरी लिहितोस आणि मग वर्षाच्या शेवटी जाळुन टाकतो, निदान जाळायच्या आधी आम्हाला एकदा तरी वाचायला दिली असती." रितेशनं त्याच्याकडे बघुन असं म्हंटल्यावर त्याच्या गालावर गोड हसु आलं, हसला की त्याच्या पाणीदार डोळ्यांत जणु आनंदाश्रु क्षणातच उभे रहायचे. आत्ताही अगदी असंच झालं, पण ह्यावेळी त्यानं आपल्या मित्राच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करुन आसमंतावर एक नजर टाकली आणि पुन्हा मग तो मित्रांच्या मध्ये आला. सोहमने तोपर्यंत सर्वांसाठी सोमरस तयार करुन ठेवलं. "लाईफ मे एक बार" असं नेहमी म्हणनार्‍या सोहमला आणि त्याच्या ग्रुपला पहिल्यांदाच चिल्ड बियरचा आस्वाद घ्यायचा होता. अर्जुन साठी देखील त्यानं ग्लास भरला होता. अर्जुन, सोहम, रितेश, हर्षित, नचिकेत, ध्रुव आणि शार्दुल असा तो सात मित्रांचा ग्रुप होता.
सातही जण एकाच फिल्डचे होते, एकाच कॉलेजचे, एकाच गावात राहाणारे. त्यांच्या मैत्रीचं सगळ्या वर्गाला आश्चर्य वाटायचं.! सातही जण जणु सेव्हन वंडर्स. "हॅपी न्यु इयर बॉस" म्हणत सोहम अर्जुनकडे तो भरलेला एकच प्याला घेऊन आला, "मला नकोय रे, तुला माहित आहे ना मला असलं काही पटतं नाही." असं म्हणत अर्जुनने नकार दिला. पण त्याच्या हातात पेला पकडवत बाकीच्यांकडे बघत सोहम बोलला, "अरे ओय आधी विधी तर करुन घ्या मग सुरु करु ना..!" अर्जुनला मात्र हसु आवरनं अवघड झालं. त्याला दिलखुलास हसतांना पाहिल्यावर अख्या ग्रुपला जोश आला. "काही म्हणा दोस्तांनो, अर्जुन एकदम मनमोकळे पणाने हसतो नाही का? नाही तर आपल्या गर्लफ्रेंड्स एकमेकीं बरोबर नेहमी असतात पण त्यातली एखादी जरी हसली की." असं म्हणता म्हणता नचिकेत हसायला लागला, "अरे सगळ्या जणु रिसेप्शनिस्ट सारख्या हसतात असंच वाटतं!" असं सोहम बोलला अन पुन्हा सगळे हसायला लागले. हसता हसता बाकीच्या ग्रुपने आप-आपले प्याले ओठांपर्यंत नेले नसतील तोच "खळ्ळ्ळ.." आवाज आला, अर्जुनने तो भरलेला ग्लास हातातच दाबुन फोडुन टाकला, फरशी वर पडलेल्या त्या फुटक्या ग्लासतच त्याचं ते सळसळणारं रक्त भळाभळा पडु लागलं. "अर्जुन अरे काय केलंस?" असं म्हणत अख्खा ग्रुप त्याच्या जवळ आला, रितेश गच्चीवरुन धावत खाली आला आणि त्याच्या रुममधुन फर्स्ट-एड किट घेऊन आला, अर्जुनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, रक्ताने माखलेल्या हाताकडे बघुन तो हसला, "टेंशन नका घेऊ रे, जोश जोश मध्ये फुटला, तुम्ही सुरु करा मी करतो माझ्या हाताला बॅंडेज" असं म्हणनार्‍या अर्जुनकडे पाहुन हर्षित बोलला, "अरे तुझ्या हाताचं नाही, ग्लासभर बियर वाया गेली त्याची चिंता..!" पुन्हा मग ते क्षणभर चिंताग्रस्त झालेलं वातावरणात पुन्हा जणु तरुणाई संचारली. हर्षित मुद्दाम तसं बोलला हे सगळ्यांना माहिती होतं, पी.जे. मारायची त्याची ती सवयच..!
दोस्तांच्या पार्टीला आता चांगला रंग आला होता, तितक्यात "माय हार्ट इज बिटींग" अशी रिंगटोन असलेल्या रितेशच्या मोबाईल वर तेजालीचा फोन आला. घाई-घाई फोन उचलायला गेलेल्या रितेशला ध्रुव बोलला, "वहिनींना आमची आठवण येते का ते विचार रे." "असं का, ओय तुझ्या फ्रिडम फायटरचा फोन येईल ना तेव्हा दाखवतो." असं म्हणत रितेशने फोन उचलला. सात जणांच्या ग्रुप मध्ये अर्जुन आणि हर्षितला सोडुन बाकीच्यांना गर्लफ्रेंड्स होत्या. सोहम मात्र वर्गातल्या सहा जणींचा जणु कॉमन बॉयफ्रेंड होता. नचिकेत आणि ध्रुवच्या गर्लफ्रेंड्सची नावं त्या दोघांनी कंप्युटर गेम्सच्या नावानुसार मोबाईल मध्ये सेव्ह केली होती. ध्रुवच्या चैतालीला देशाचा खुप अभिमान आहे म्हणुन तो तिला फ्रिडम फायटर म्हणायचा. तर मितालीचे वडिल कुस्तीगीर म्हणुन नचिकेत तिला स्मॅकडाउन म्हणायचा. चांगल अर्धा-तास फोनवर तेजालीशी बोलल्यानंतर रितेश परत पार्टीत सामिल झाला. "काय म्हणत होती वहिनी?" असा सगळ्यांनी एकासुरात विचारलं अन रितेश बोलला, "काही नाही तिला रात्री एक वाजता अंताक्षरी खेळायची होती, आता राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्टापुढे कुणाचं काही चालतं का?" सगळे मग एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघायला लागली एक मिनिट कुणीच काही बोललं नाही, मग केव्हाचा शांत असलेला अर्जुन बोलला, "वेड्या तुझ्यावर ती खुप प्रेम करते रे.!" "केले असते प्रयत्न थोडेफार तर कॉलेजमध्येच आज असती आमची प्रेम-प्रकरणे दोन चार!" असं हर्षित अर्जुनला पाहुन बोलला. "चला रात्रं खुप झाली," असं म्हणत मग अर्जुन तिथुन जाऊ लागला. अर्जुनला जातांना बघुन सगळे हर्षितला बोलायला लागले, "काय यार, त्याला नाही आवडत त्याच गोष्टी त्याच्या समोर ओकायची तुझी सवय कधी मोडेल काय माहिती." 
रात्र चांगलीच भरात होती, चंद्राचं तेज चांदण्यांमुळं खुलुन दिसत होतं, हवेत जरा गारवा होता, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी फोडल्या गेलेल्या फटाक्याच्या दारुचा गंध वातावरणात दरवळत होता. अर्जुनच्या पावलांची गती तशी साधरण होती, निद्रादेवीच्या अधीन असलेल्या घरांकडे बघत बघत तो चालला होता. त्याच्या घराजवळ आल्यावर त्याने समोरच्या सोसायटीतल्या दुसर्‍या मजल्यावर नजर टाकली, आणि स्वगतच हसावं असं त्याला वाटलं पण तो एक मिनिट तिथेच बघत होता. स्वराली राहात होती त्या प्लॅटवरुन मग त्याची नजर हटली आणि आपल्या घराच्या दाराला लावलेलं कुलुप उघडुन तो त्या घरात आला. त्याच्या डोळ्यात आसवं दाटुन आली होती. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या फोटो कडे बघुन तो रडु लागला. देवीच्या दर्शनासाठी जातांना घडलेल्या अपघातात अर्जुनच्या संपुर्ण कुटुंबाला देवीचं जणु बोलावनं आलं, कारण अवघा बारा वर्षांचा असतांना अनाथपण त्याच्या वाट्याला आलं होतं. त्याचे मामा-मामी त्याच गावात राहात होते, मामा-मामीला मुलं बाळ नव्हतं त्यांनी अर्जुनला त्यांच्याकडे राहण्यास सांगितलं, पण अर्जुनने मात्र आपल्याच घरात राहाण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्याच्या स्वावलंबी पणाचं उदाहरण शाळेतले शिक्षक मुलांना द्यायचे. आयुष्यात एकटेपणाचा आनंद आणि एकटेपणाचं दुख: ज्याच्या वाट्याला येतं त्यालाच त्यातलं सगळं कळतं नाही का? अर्जुन मुळात अभ्यासत तरबेज होता, क्रिडा, कला, साहित्याची त्याला प्रचंड आवड होती.
रडता रडता त्याला केव्हा जोप लागली ते त्यालाच कळलं नाही. आज त्याच्या स्वप्नात अचानक त्याला स्वराली दिसली अन तो तसाच खडबडुन जागा झाला. रात्रभर गार फरशीवर झोप लागल्यामुळे त्याच्या अंगभर मुंग्या आल्या होत्या, तरी तो झटपट उठला. आई-वडीलांच्या प्रतिमेला त्याने वंदन केलं, आपल्या घराची साफ सफाई करुन तो व्यायामशाळेकडे निघाला, सकाळचे सहा-सव्वासहा वाजले असतील, वातावरणातील थंडी त्याच्या सर्वांगाला बोचत होती. रात्री हातातच ग्लास फोडल्यामुळे त्याचा हात दुखतं होता तरी तसाच तो व्यायामशाळेत आला, बजरंग बलीच्या मुर्तीसमोर तो नतमस्तक झाला, आणि एकतास कसुन त्यानं व्यायाम केला. जातांनाही त्यानं बजरंग बलीला वंदन केलं, आणि हनुमान चालिसा गुण-गुणत तो बाहेर पडला. सकाळचं धुकं हळुहळु दुर सरुन उगवत्या सुर्यनारायणाचं दर्शन धरणीला होत होतं. रस्त्यावरुन चालतांना त्याच्या डोक्यात त्या स्वप्नाबद्दल विचारमंथन सुरु झालं होतं. त्याचवेळी स्वराली आणि तिची मैत्रीण मैथिली स्कुटीवर बसुन अर्जुन ज्या रस्त्याने घराकडे परतत होता त्याच रस्त्यानं सकाळच्या शिकवणीला चालली होती. अचानक स्कुटी चालवत असलेल्या मैथिलीने अर्जुन जवळ येत असल्याचं लक्षात घेऊन स्कुटीचा वेग कमी केला, ही गोष्ट स्वरालीच्या लक्षात आली, तीनं लगेच मागुन मैथिलीला चिमटा काढला आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजली. मैथिलीने मुद्दाम अर्जुन जवळ आल्यावर जोरात ब्रेक दाबला आणि हॉर्न वाजवला आणि वेगात स्कुटी तिथुन चालवली. हॉर्नच्या आवाजामुळे अर्जुनचं लक्ष त्या दोघींकडे गेलं आणि त्याच्या गालावर हसु उमटलं.

Thursday, March 1, 2012

जरा दोन शब्द "तो आणि त्याची ती" या माझ्या नव्या कादंबरीबद्दल..!

     असं म्हणतात "ज्याला स्वत:च्या चुका स्वत:लाच कळतात त्याने प्रेमात कधीच पडु नये आणि चुकुन प्रेमात पडलं तर आपल्या प्रेयसी शिवाय दुसरीकडे जगजाहिर करु नये" हे कितपत सत्य असतं हे ज्याला त्याला आलेल्या अनुभवांवरुन ठरणार नाही का? "प्रेम म्हणजे प्रेम असतं-तुमचं आणि आमचं खरंच सेम असतं" हे एकदा तरी तपासुन बघावं असं कॉलेजला असतांना वाटायचं. "केले असते प्रयत्न थोडेफार तर कॉलेजमध्येच असतील आमची प्रेम-प्रकरणे दोन चार..!" या उक्ती प्रमाणे मग आयुष्यातं काहीतरी घडनं स्वाभाविक असतंच.
          "तो आणि त्याची ती" ही कादंबरी सामान्यांसाठी तरी एक कथाच त्या दोघांची. आयुष्यात कधीतरी प्रेमात पडलेल्या आणि पडलेल्यां सर्वांचीच.. प्रेम म्हंटल की लगेच काहींच्या मनातील भावनांवर जणु पहिल्या पावसासारखी धुंदी तर काहींची अवस्था काही औरच जणु दगडालाही पाझर फुटावा अन धरणीला कंप सुटावा. आयुष्यात एकटेपणाचा आनंद आणि एकटेपणाचं दुख: ज्याच्या वाट्याला येतं त्यालाच त्यातलं सगळं कळतं नाही का? तीच्या वर भरभरुन प्रेम करण्याशिवाय प्रेमानं त्याला दुसरं काही शिकवलंच नाही असा या कादंबरीचा नायक. एखाद्या चित्रपटातला नायक वाटावा आजच्या भाषेत सांगायचं तर चॉकलेट बॉय सारखा तर मुळीच नाही, आणि जीच्यावर तो प्रेम करायचा ती पन काही स्वर्गातील अप्सरा नव्हती ना वाटायची चटकचांदणी, पण दोघही एक-मेकांना हवी-हवीशी वाटणारी..!
          नदीच्या दोन काठांप्रमाणे ती आणि तो, आणि नदी सारखं आयुष्यभर वाहणारं त्यांच प्रेम, आयुष्याच्या समुद्रात नकळतपणे समावुन वाहुन जातं, उतारवयात मग बाष्पाच्या रुपात पुन्हा जवळ येतं आणि पहाटेच्या कोमल सुर्य किरणांच्या साक्षीने दवबिंदुत जणु एकत्र सामावुन जातं. पानावर साचलेलं ते दवबिंदु मग हळु-हळु खाली पडु लागतं, धरणीच्या पोटात मग हळुच रुजुन जातं, आणि पहिल्या पावसातील मातीच्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या प्रेमाचा सुगंध सदैव दरवळतो.. जणु माझ्या प्रेमाच्या अर्थ तुला मी मरणशय्ये वर असतांना कळु दे, तुझ्या डोळ्यांतल्या त्या दोन आसवांकडे बघुन पुन्हा मला संजिवनी मिळु दे..! असंच सांगतो.
          ठरवुन दोस्त बनवता येतात पण ठरवुन प्रेम कधी करता येतं का? विश्वासाच्या मुळांनी तग धरलेल्या, मैत्री खोडावर, त्यागाच्या फांद्यांवर, इच्छाशक्तीच्या पानावर, निस्वार्थ फुलांजवळ बागडणारं छोटंस फुलपाखरु म्हणजे प्रेम असतं का? या प्रश्नाचं समाधान शोधण्यासाठी जणु तो आणि ती धडपडताय असं तुम्हाला वाचतांना जाणवेल. "तो आणि त्याची ती" ही कादंबरी खरंच आपण करतो ते प्रेमच आहे का ह्याचा विचार करायला लावणारी प्रेमळ आणि निरागस कथाच आहे.
          "तो आणि त्याची ती" या कादंबरीच्या लिखाणाची सुरुवात खरी झाली ती मी सेकंड इयर बी.फार्मला असतांना, मी लिहिलेल्या "प्रेमासाठी वाट्टेल ते" यानाटकाच्या कथेतच या कादंबरीचा पाया होता असं मला वाटतं.. बी.फार्मसी पुर्ण झाल्यानंतर आयुष्यात आलेल्या अनपेक्षित वळणार जेव्हा वर्षभर थांबाव लागणारच होतं असं जेव्हा कळलं अन मग जोमानं सुरुवात केली "तो आणि त्याची ती" या कादंबरीच्या लिखाणाला. "तो आणि त्याची ती" ही कादंबरी लिहिणं माझ्यासाठी स्वप्न जगण्यासारखंच होतं असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. "तो आणि त्याची ती" हे नाव मला एकदिवस अचानक सुचलं, त्यादिवशी सहजच लिहायला सुरुवात केली आणि सुरुवातीचे - पाने लिहिल्यानंतर मला एका क्षणी मीच ते सगळं जीवन जगतोयं असं वाटलं. आणि हीच भावना माझ्यासाठी खुप खास होती, कदाचित ह्या भावनेच्या ओघातच मग ही कादंबरी लिहितांना स्वतःला झोकुन द्यावसं वाटलं. कादंबरीची काही पाने ही ब्लॉगवर टाकली, कादंबरीतली काही वाक्य फेसबुकवरही टाकायचो, त्यांना अनपेक्षित प्रतिसाद येत गेला, आणि त्यामुळे लिखाणाला नवा जोश, नवी उमेद मिळायची. एकदिवस माझ्या घरच्यांना याबाबत सांगितलं, वडिलांनी कादंबरी वाचली, ते काही बोलले नाही मात्र त्या कादंबरीच कौतुक करणारी एक चिठ्ठी त्यांनी मला दिली. ती चिठ्ठी वाचतांना मनाला एक अनोखं, अविस्मरणीय असं समाधान मिळलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लिहु शकतो याबाबत खंबीर विश्वास त्यामुळे निर्माण झाला. माझ्या लेखणीनं त्यावेळी जणु माझी लाज राखली, कोणत्याही पुरस्कारापेक्षा मला ती चिठ्ठी खुप अनमोल वाटते
     प्रस्तुत कादंबरी जरी कल्पनांतुन साकारलेली असली तरी माझ्या आयुष्यातील काही घटनांतुन सत्याची एक किनार तिला देण्याचा नक्कीच थोडासा प्रयत्न केला आहे, म्हणुनच यातील व्यक्ती अन पात्रांच्या नावाचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही, कोठे आढळल्यास निव्वळ योगायोगच समजावा. प्रेमामुळं स्वाभाविक सर्वांना आनंदच मिळतो, सगळे सुखावततात हे जरी खरं असलं तरी जीवनातील सर्व रसांना सगळ्या गुण-दोषांबरोबर एकत्र गुंफुन ठेवत असलेल्या प्रेमावर केलेल्या लिखाणामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच क्षमस्व. प्रस्तुत कादंबरी मला ज्यांनी जन्म दिला आणि माझ्या आयुष्याचे गुरु असलेल्या माझ्या प्रेमळ आई-वडीलांना, ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन या देशातली कोटी कुळे उद्धारली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वस्वीपणे अर्पण करावीशी वाटते. माझ्या "लाईफ इन फार्मसी कॉलेज" या पुस्तकाला जसा उत्तम प्रतिसाद दिला, अगदी तसाच प्रतिसाद मिळेल अशी नुसतीच आशा नाही तर खात्रीसुद्धा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी निस्वार्थ प्रेमाचा वसंत येवो, आणि प्रत्येक अर्जुनाला त्याची स्वराली मिळेल अशी ईश्वराकडे माझी प्रार्थना..!
तुम्हा सर्वांचा
-स्वप्निल सुरेश गरुड