Sunday, December 23, 2012

"तो आणि त्याची ती..! १.१८

                  सकाळी अर्जुन जेव्हा कॉलेजला जायला निघाला त्यावेळीही त्याच्या डोक्यात तोच विचार सुरु होता. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यानं तेजालीला याबद्दल सांगितलं. "अरे अर्जुन, कशाला तसा विचार करतोय तु? तुझ्या आयुष्यात असं काही घडणारच नाही रे, खर्‍या प्रेमासमोर तर प्रसंगी देवालाही झुकावं लागतं, तु फक्त याचा विचार कर की तुला स्वरालीसोबत जास्तीत जास्त कसा वेळ घालवता येईल. मी जर मुलगा असते ना, तर कधीच स्वरालीला प्रपोझ करुन मोकळीही झाले असते, तिच्यासारखी मुलगी तुला शोधुनही सापडणार नाही अर्जुन, तुला समजतयंना मला काय म्हणायचं आहे ते?" असं तेजाली बोलल्यावर अर्जुनला जरा हायसं वाटलं. थोड्यावेळानं तिथे हर्षित आला, त्याच्या चेहरा उदास दिसत होता. "काय रे काय झालं?" असं अर्जुनने त्याला विचारलं, "भांडण झालं रे लावण्याबरोबर." असं म्हणतांना हर्षितचा चेहरा केवीलवाणा वाटत होता. "अरे हर्षित, भांडण झालं तरी कशावरुन सांगशील का?" असं तेजाली बोलली. "अगं, काल आम्ही फोनवर बोलत होतो, तितक्यात आईनं आवाज दिला म्हणुन मी लावण्याला पटकन बाय म्हणत फोन ठेवला, नंतर परत फोन केला तर ती मला बोलली, "काय रे, दुसर्‍या गर्लफ्रेंडसोबत बोलत होतास का?" ती असं बोलली आणि मी मुद्दाम तिला चिडवण्यासाठी बोललो की मला जर दुसरी गर्लफ्रेंड असती तर तुझ्याशी बोलायला वेळ तरी असता का? बस्स यावरुन आमचं भांडण झालं, मी रात्रभर जागुन तिला किती मेसेज करुन सॉरी बोललो, तरी तीनं एका मेसेजलाही रिप्लाय केला नाही रे," असं हर्षित बोलला.
                          हर्षित असं बोलत असतांना त्याच्यामाघे लावण्या उभी होती हे त्याच्या लक्षातच आलं नव्हतं, हर्षितचं बोलणं झाल्यावर ती बोलली, "वेड्या तुला भांडता तरी येतं का?" लावण्याचा आवाज ऐकुन हर्षितनं माघे वळुन बघितलं, आणि कान पकडतच तो तिला सॉरी म्हणायला लागला. "अरे हर्षित, मीच तुला सॉरी म्हणायला हवं रे, मी तुला तसं बोलायला नको होतं रे, उलट माझीच चुकी असतांना देखील तु रात्रभर मला मेसेज करत होता, आय एम सॉरी हर्षु, अरे मरणापुर्वीच मी जणु सरणावर जळते रे जेव्हा तुझ्याशी असा अबोला धरते..! " असं लावण्या एकदम प्रेमानं बोलली, आणि हर्षितचा चेहरा आनंदानं फुलला. "चला भांडण मिटलं तर तुमचं एकदाच," असं तेजाली बोलली, आणि मग ते सगळे हसायला लागले.
                      कॉलेज सुटल्यानंतर लावण्या आणि हर्षित दोघंही घराकडे निघाले, पण दोघंही शांतच होते. शेवटी न रहावुन लावण्याच बोलली, "काय रे हर्षित, काय झालयं तुला? असा गप्प गप्प का आहेस? काहीतरी बोल ना.!" हर्षितनं तिच्याकडे बघितलं, आणि शांतपणे बोलला, "हे लावण्या, तुला एक सांगु?" लावण्याने मानेनच होकार दिला, हर्षित काय सांगतोय हे ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते. "लावण्या, लग्नापुर्वी होणारी धर्मपत्नी नेहमीच आपल्या गर्लफ्रेंडपेक्षाही जास्त प्रेम आणि काळजी करते नाही कां गं?, आणि लग्न झाल्यानंतर आपलं कर्तव्य असतं की आपणही तिच्यावर तितकच निस्वार्थ प्रेम करावं, कारण या जगात आपल्यावर प्रेम करणारी माणसं फार थोडीच असतात नाही ना?" असं म्हणुन हर्षितनं तिच्याकडे बघितलं. हर्षितनं तिच्याकडे बघितल्यावर लावण्या मनापासुन हसायला लागली, तिला हसतांना बघितल्यावर हर्षितलाही हसु आवरणं कठीण गेलं, हसता हसताच तो बोलला, "हे लावण्या मला वाटलं, तु म्हणशील, मी कसलाही विचार करतो, पण तुला तर चक्क हसु आलं?" लावण्याने त्याच्याकडे बघितलं आणि बोलली, "कसं जमतं रे हर्षित, तुला इतकं छान छान विचार करायला, असं छान वाक्य सुचणं?" हर्षितला काय उत्तर द्याव सुचलच नाही, तो नुसताच तिच्याकडे एकटक बघत राहिला. त्याला असं बघुन शेवटी लावण्याच बोलली, "ज्याच मन चांगल असतं, त्याचे विचार आणि वाणी देखील तितकीच चांगली असते हो ना?" हर्षितनं होकारार्थी मान डोलावली.
                      घरी स्वरालीनं अभ्यास झाल्यानंतर अर्जुनला वाढदिवशी काय सरप्राईज द्यायचं याचा विचार ती करु लागली, आणि थोड्यावेळानं तिला भन्नाट कल्पना सुचली, दुसर्‍या दिवशी तीनं तिचा पेपर झाल्यानंतर तेजालीला फोन केला आणि त्याबद्दल सांगितलं. तेजालीला स्वरालीची कल्पना खुप आवडली, आणि तीनं स्वरालीचं कौतुकही केल. तेजालीनं मग रितेश आणि बाकी सगळ्यांना स्वरालीच्या कल्पना सांगितली. "स्वरालीच ख्ररी अर्जुनची बेस्ट फ्रेंड आहे असं वाटतं नाही, आपल्याला का नाही सुचत अर्जुन आणि स्वराली सारखं विचार करायला? अरे आम्ही इतक्या वर्षांपासुन एकमेकांसोबत आहोत, पण इतक्या रोमॅंटिक कल्पना कधी मनात डोकावल्याच नाहीत रे," असं तेजाली स्वरालीच्या कल्पने बद्दल बोलली. मग ठरल्याप्रमाणे सगळे जण आप आपल्या तयारीला लागले.
                        अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच स्वरालीचा पेपर होता, तरी अभ्यास करुन तीनं अर्जुनचा वाढदिवस खास करायचाच याचा निर्धार केला होता. इकडे हर्षितनं आरामशीर अर्जुनच्या घराची एक चावी मिळवली, आणि त्याला त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपल्या घरी बोलावुन घेतलं, अर्जुन त्या दिवशी हर्षितच्या घरी राहिला, आणि दुसर्‍या दिवशी तसाच त्याच्या सोबत कॉलेजला आला. पण आज कॉलेजमध्ये त्यांच्या ग्रुपमधलं त्याला आणि हर्षितला सोडुन कुणीच आलं नव्हतं, कॉलेज सुटल्यावरही हर्षितनं बहाणा करुन बराच वेळ अर्जुनला घरी जाण्यापासुन रोखुन ठेवलं होतं, मग शेवटी तो अर्जुन घरी पोहचायच्या आधी तो त्याच्या घरी पोहचुन गेला, इकडे स्वराली आणि बाकीच्या ग्रुपनं सगळी तयारी पुर्ण करुन ठेवली आणि ते सगळे अर्जुनची वाट बघत होते, दरम्यान अर्जुनचे मामा मामी देखील तिथे आले, स्वरालीनंही तिच्या आई-बाबांना बोलवलं होतं.

Sunday, December 2, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१७


        स्वराली आणि मैथिली दोघीजणी मॅथचा पेपर देऊन बाहेर आल्या, "अर्जुन कुठे दिसतोयं का बघं गं मैथिली, काल बोलला होता तो की पेपर झाल्यानंतर भेटुया," असं स्वराली अर्जुनला नजरेनं शोधतांना बोलली. तितक्यात तिला समोरुन अर्जुन येतांना दिसला, "तो बघं, काय आयुष्य आहे अर्जुनला, आत्ताच आठवण झाली आणि लगेच तो समोर, क्या बात है स्वराली, प्रेमात शक्ती असते हे ऐकलं होतं आज बघितलंही..!" असं मैथिलीनं तिला चिडवलं. स्वरालीला हसु आलं, तितक्यात अर्जुनही तिथे आला, "काय गं स्वराली का हसतेयं?" असं त्यानं तिला विचारलं. "काही नाही रे, मैथिलीच्या मनात काहीही सुरु असतं, अरे पेपर छान होता, सेक्शन वन थोडा चॅलेंजिंग होता बरं!" असं स्वराली त्याला बोलली. "अरे अर्जुन तु म्हंटल्याप्रमाणे आलास रे खरंच, मला वाटलं." असं मैथिली अर्जुनला बोलली. "अगं स्वरालीला कबुल केलं आणि आलो नाही असं होणारच नाही, आणि माझी काय बिशाद दिलेला शब्द मोडायची, स्वराली रागावली नसती का माझ्यावर?" असं अर्जुन हसतच बोलला. "हे अर्जुन, मी कधी रागावलेयं का तुझ्यावर रे? अगदी स्वप्नातही तुझ्यावर रागावेल असं मला वाटत नाही बघं." असं स्वराली जरा लाजतच बोलली. "व्वा बघं अर्जुन, ती रुसल्यावर तिला मनवायचा आनंद तुझ्या नशीबात नाहिऐ बघितलंस." असं म्हणत मैथिली हसु लागली. 
                   स्वराली आणि मैथिली घरी गेल्यानंतर अर्जुन कॉलेजमध्ये आला. लेक्चर झाल्यानंतर त्याला खान सरांनी बोलावुन घेतलं, खान सरांनी त्याचं मेडिकल चेकअप करुन घ्यायचं ठरवलं होतं, अर्जुन आल्यानंतर त्यांनी अर्जुनला मेडिकल चेकअप बद्दल सांगितलं. अर्जुननेही सहमती दर्शवली, कारण ऑपरेशननंतर त्याला आपल्याला बॉक्सिंग करता येईल ना याची चिंता असायची, त्याचंच निरसण होण्यासाठी मेडिकल चेकअप होणं गरजेच होतं. "सर अर्जुनच्या मेडिकल चेकअप मध्ये काही प्रॉब्लेम असला तर?" असं तिथे उभा असलेला सखाराम शिपाई बोलला. "राजपुत का खुन उसकी रगों मे दौडता है, सखाराम अर्जुनका मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आएगा देखों, एक छोटासा ऑपरेशन मेरे अर्जुन को बॉक्सिंग करने से नहीं रोक सकता." असं खान सर मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाले. त्यांचा आत्मविश्वास बघुन अर्जुनला बरं वाटलं, एकप्रकारे त्याच्या मनातली चिंता त्यामुळे थोडीशी कमी झाली. "खान सर बरोबर बोलतायं ते अगदी योग्यंच आहे, जरी मेडिकल रिपोर्ट मध्ये काही असु दे, अर्जुन सिराजसिंह राजपुतला बॉक्सिंग करण्यापासुन कोणीच रोखु शकणार नाही, एका ऑपरेशनमुळे मी खचलो तर राजपुत म्हणवण्याचा अधिकार तरी राहिल का मला?" असं अर्जुन मनातच बोलला. खान सरांना मग त्याने मेडिकल चेकअपची तारिख आणि वेळ विचारुन घेतली, आणि मग तो घरी परतला.
               घरी आल्यावर अभ्यास करत असतांना त्याच्या डोक्यात व्हॅलेंटाईन डे बद्दल विचार सुरु झाले, "विल यु बी माय व्हॅलेंटाईन" असं त्यानं मनातच स्वरालीला विचारलं, नंतर तो स्वगतच हसला, "अरे काय अर्जुन, काय झालयं तरी काय तुला? अभ्यास कर अभ्यास," असं मग त्याने स्वतःच्या मनाला समजवलं आणि पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. आज अभ्यास करतांना त्याच चित्त विचलीत होऊ लागलं होतं, मग त्याने रितेशला फोन केला, "रितेश मला काहीच सुचत नाहिए रे, तु आणि तेजाली वेळ असेल तर याल का घरी?" असं त्याने त्याला विचारलं. थोड्यावेळानं मग रितेश आणि तेजाली दोघही त्याच्या घरी आले. "काय रे अर्जुन काय झालं," असं तेजालीनं त्याला विचारलं. "अगं आता कसं सांगावं तेच कळत नाहिए बघं, परवा उजाडेल त्या दिवसाचा विचारानं अभ्यासातपण आज मन लागत नाहिये," असं अर्जुनजरा लाजतच बोलला. "ए रितेश, अरे अर्जुन चक्क व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलतोयं बघितलं का? अरे व्वा कोण आहे ती लकी गर्ल? हं लेट मी गेस, स्वराली, बरोबर ना..? असं म्हणतांना तेजाली खुप आनंदुन गेली होती. अर्जुन तर पुरताच लाजुन गेला होता, "अर्जुनराजे, म्हणजे तिला प्रपोझ करायचा मानस तर नाही ना आपला?" असं रितेशनं त्याला चिडवलं. "तसा काही विचार केला नाही रे..!" असं अर्जुन बोलला. "तेजु, बघं अर्जुन एकदम आपल्या हर्षित सारखा बोलायला लागला हो की नाही?" असं रितेश तेजालीला बोलला. "अरे अर्जुन, हर्षितला लावण्याने प्रपोझ केलयं बरं, स्वरालीला सांगु का?" असं म्हणतांना तेजाली एकदम एक्साईट झाली, तितक्यात तिच्या माघुन स्वराली तिथे आली, "काय सांगयच मला तेजाली दिदी?" असं स्वरालीनं तिला विचारलं. स्वरालीला बघताच तेजालीनं अर्जुनला नजरेनच खुणवलं, "अगं काही नाही, तुझी बारावी झाली की आमच्याच कॉलेजला ऍडमिशन घे असं सांगायच होतं तिला," असं अर्जुन तेजाली काही बोलायच्या आत पटकन बोलला. तेजाली अर्जुनकडे बघुन हसली, "हो गं स्वराली, तु आमच्या कॉलेजमध्ये आलीस तर काय धम्माल येईल ना, याबद्दलच आम्ही बोलत होतो," असं तेजाली बोलली.
                  "अगदी माझ्या मनातही तसंच होतं तेजाली दिदी, आई-बाबांना सोडुन मी बाहेर नाही जाणार शिकण्यासाठी, अगं पण मी येईल त्यावेळी तुमचं फायनल इयर असेल ना." असं स्वराली तिला बोलली. "विचार जुळले की, मनातल्या भावना कळण्यास वेळ लागत नाही, असं कोणीतरी म्हणुन गेलं" असं रितेश बोलला. अर्जुनला हसु आलं, थोडावेळ मग ते चौघं जण गप्पा मारत होते. बोलता बोलता तेजाली मुद्दाम बोलली, "स्वराली परवा रितेश आणि माझा पाचवा व्हॅलेंटाईन डे आहे माहिती आहे." "अरे व्वा, किती छान.!" असं स्वराली खुष होऊन बोलली. "अगं स्वराली अर्जुनला विचारना काही..!" असं रितेश तिला बोलला. "अरे हो की, अर्जुनचं विचारायचंच राहिलं?" असं स्वरालीनं अर्जुनकडे कुतुहुलपुर्ण नजरेनं बघत बोलली. "हे तेजाली, रितेशला समजवं काहीतरी, आणि स्वराली माझ्या आयुष्यात अजुन तरी काही व्हॅलेंटाईन डे साजरा करायची वेळ आली नाही बरं." असं अर्जुन बोलल्यावर तेजाली, रितेश आणि स्वराली तिघंही हसायला लागले. "तुमच्या कॉलेजमध्ये होतो का स्वराली व्हॅलेंटाईन डे साजरा?" असं तेजालीनं तिला विचारलं. "नाही गं, असलं काही नसतं कॉलेजमध्ये, पण माझी मैत्रिण मैथिली मात्र खुप एक्साईटेड असते बरं, आम्ही अकरावीत असतांना एक मुलागा आला होता तिला रोझ द्यायला, तिच्याच कॉलनीमधला होता. पण तीने नाही घेतला, उलट ती इतकी चिडली की बस." असं स्वराली बोलल्यावर अर्जुनला हसु आलं. "कदाचित तु समोर असशील म्हणुन ती चिडली असेल बरं का स्वराली." असं अर्जुन बोलल्यावर स्वरालीलाही हसु आलं. थोड्यावेळानं मग ती तिच्या घरी गेली.
                     "अरे अर्जुन काय सॉलीड चान्स होता तुला, वेडाच आहे तु अशी  सुवर्णसंधी परत आली असती का, विचारुन तर बघायचं ना तिला." असं तेजाली अर्जुनकडे बघुन बोलली. "अगं असं कसं एकदम अचानक तिला विचारु? मैथिली जशी त्या मुलावर चिडली तशी स्वराली पण चिडली म्हणजे?" असं अर्जुन तिला बोलला. "मी म्हंटल होतं ना तेजाली तुला, जे काही करायचं ते अर्जुनला स्वतःलाच करु दे, चला वेळ होतोयं, तुला तुझ्या घरी सोडायचं आहे." असं रितेश तेजालीला बोलला आणि मग ते दोघेही तिथुन निघुन गेले. स्वराली घरी परतल्यावर ती अर्जुनचाच विचार करु लागली. अर्जुनने फक्त विचारायचीच देरी आहे, असं तीचं मन तिला सांगायचं. तेजाली आणि रितेश सारखं, तीचं आणि अर्जुनचं नातं असाव असं तिला आता वाटु लागलं. बारावी पास झाल्यानंतर तीनं ठरवुन टाकलं की अर्जुनच्या कॉलेजलाच प्रवेश मिळवायचा. 
          रितेश-तेजाली गेल्यानंतर अर्जुनला वाटु लागलं होतं की बोलता बोलता स्वरालीशी त्यासंदर्भात विचारायला हरकत नव्हती, स्वराली आपल्याला तिचा बेस्ट फ्रेंड मानते हे त्याला चांगल ठाऊक होतं, ती नुसतीच त्याला बेस्ट फ्रेंड मानते की अजुन काही, हे कधी ना कधी तरी विचारायलाच हवं असं त्याला वाटु लागलं. दरम्यान त्याला उद्या त्याच्या मेडिकल चेक अपची आठवण झाली आणि मग तो झोपी गेला. दुसर्‍या दिवशी अर्जुनचं मेडिकल चेक अप झालं, त्याचे रिपोर्ट २४ तासांनंतर समजणार होते, रिपोर्ट मध्ये नक्की काय आहे हे त्याच्या बरोबर जाणुन घ्यायला खान सर पण उत्सुक होते. कॉलेजला परतल्यावर उद्या असणार्‍या व्हॅलेंटाईन डेच्या वातावरण निर्मितीला आजपासुनच सुरु झालीए असं अर्जुनला वाटतं होतं. कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तपालनाची आधीच ताकीद दिलेली होती, व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली काही अशोभनीय वर्तन, मुलींची छेड काढणं, किंवा कोणतही अश्लील वर्तन आढळुन आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे संकेत प्राचार्यांनी दिलेले होते. कॉलेजच्या कॅंटीन मालकाने देखील कॅंटीन विविध रंगबेरंगी फुलांनी, फुग्यांनी सजवली होती. विध्यार्थ्यांच्या आग्रहामुळे शिपायांनी कॅम्पस ऐरवी असायचा त्यापेक्षाही अधिक स्वच्छ करुन घेतला, स्टुडंट्स कॉर्नर तर खास सजवण्यावर भर होता. प्रेमावरचे लेख, कविता, पेंटिग्स, कथा यांनी तो स्टुडंट्स कॉर्नर एकदम भरुन गेला होता.
           व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तर कॉलेज जणु प्रेमनगरीच वाटत होतं. कॅंटीन मधुन जुणे रोमॅंटिक गाण्यांचा आवाजानं वातावरणात जणु वेगळीच प्रेमाची लाली पसरली होती. लावण्या कॅंटीनमध्ये हर्षितची वाट बघत होती, कॅंटीनमध्ये बाकीचा ग्रुप पण जमलेला होता. "आजा रे.." हे गाजलेलं गाणं कॅंटीनमध्ये सुरु होतं, शामलीनं लावण्याकडे बघितलं, "लावण्या येईल हर्षित नक्की.." असं म्हणत तीनं तिला जणु चिडवलं, आणि तितक्यात तिला समोरुन हर्षित येतांना दिसला. लावण्या धावतच त्याच्याजवळ गेली. आज ती खुप आनंदात होती, हे तीचा चेहरा आणि डोळेच सांगत होते. "हॅपी व्हॅलेंटाईन डे लावण्या," असं म्हणत हर्षितने तिला सुंदर लाल गुलाबाचं फुल दिलं. तीनंही आनंदाने ते फुल घेतल्यावर त्याला बोलली, "मला मला माहित नाही की तु तुझं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे फुल का दिलंस, पण जितका आनंद ही कळी उमलतांना झाडाला झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला तु हे फुल दिल्यावर झालाय रे..! हर्षित आणि लावण्याकडे बघुन बाकीचा ग्रुप "पहेला नशा, पहिला खुमार." हे गाणं गुणगुणायला लागला. नंतर सगळे जण कॅंटीनमध्ये गप्पा मारु लागले. "अरे अर्जुन कुठे आहे?" असं हर्षितनं विचारलं. "अरे खरचं की, अर्जुन आज दिसलाच नाही रे," असं मिताली बोलली. "रितेश त्याच्या घरी फोन करुन बघ रे, कदाचित अजुन तो घरीच असेल," असं तेजाली बोलल्यावर रितेशने अर्जुनच्या घरी फोन केला. पण अर्जुन फोन उचलायला घरीच नव्हता. त्या दिवशी तो कॉलेजलाही आला नव्हता. सायंकाळी मग त्याचा सगळा ग्रुप त्याच्या घरी आला, पण त्याच्या घराला कुलुप होतं. मग ते सगळे जण अंगणात थांबुनच त्याची वाट बघु लागले.
           "स्वराली, अर्जुनच्या घरासमोर त्याचे मित्र-मैत्रीणींची जमलेले दिसतायं, पण अर्जुन दिसत नाहिएं बघं, असं टेरेसमध्ये उभ्या असलेल्या स्वरालीच्या आईनं तिला सांगितलं. ती घाई-घाईनं टेरेसमध्ये आली. "अगं खरंच गं आई, आज सकाळचा तो दिसलाच नाही, थांब मी आलेच," असं म्हणत स्वराली खाली गेली. स्वरालीला बघताच तेजालीनं तिला विचारलं, "स्वराली अर्जुन भेटला होता का आज?" "अगं तेजालीदी मी पण तुम्हाला तेच विचारायला आले होते." असं स्वराली बोलल्यावर बाकीचा ग्रुपला अर्जुन खरंच कुठे गेलायं याची चिंता लागली. हर्षितनं अर्जुनच्या मामाच्या घरी फोन करुन बघितला, पण अर्जुन तिथंही नव्हता. सुमारे आठ वाजता समोरच्या रस्तावरुन त्यांना अर्जुन येतांना दिसला, "अरे तो बघा अर्जुन आलाच," असं लावण्या बोलली. अर्जुन त्याच्या घराजवळ आल्यावर आपल्या सगळ्या मित्रांना बघुन, विषेश म्हणजे स्वरालीला बघुन खुष झाला. "काय राजपुत साहेब, कोणत्या लढाई साठी गेले होते? स्वारीचा केव्हाचा पत्ता नाही, कॉलेजच्या जहांगीरीकडे आज फिरकला नाही आणि हातात कोणता लवाजमा घेऊन आला आहात राजे?" असं हर्षितनं त्याला विचारलं. 
         "अरे आज पहाटे मला तेच स्वप्न पडलं जे या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पडलं होतं, मला उठल्यावर मनात आलं की ते स्वप्न चित्रित करावं म्हणुन त्यासाठी सकाळ पासुनच घराच्या बाहेर होतो," असं म्हणत त्यानं ते दिवसभर मेहनत करुन काढलेलं चित्र सगळ्यांना दाखवलं. "हे स्वराली, मला माहिती आहे तु खुपच चांगली चित्रकार आहेस, सगळ्यात पहिले तु सांग तुला कसं वाटलं?" असं अर्जुनने तिला विचारलं. अर्जुनचं ते चित्र तीनं बारकाईनं बघितलं, तिला मनोमन खुप आनंद झाला होता. "अर्जुन खरंच खुप खुप खुप सुंदर चित्र काढलयं रे तु, अगदी जिवंत वाटावं असंच चित्र आहे बघं, मलाही कदाचित असं काढायला जमणार नाही रे, मी ठेवुन घेऊ का हे प्लीज?" असं स्वरालीनं त्याला विचारलं. अर्जुनने आनंदाने होकारार्थी मान डोलावली आणि मनातच बोलला, "अगदी माझ्या मनातलंच बोललीस बघं, अगं दिवसभर तुझ्यासाठीच तर काढत होतो ते." बाकीच्या ग्रुपनेही मग त्याच्या चित्राच मनापासुन कौतुक केलं. मग त्यांनी अर्जुनला सकाळी कॉलेजमध्ये घडलेल्या गमती जमती सांगितल्या. व्हॅलेंटाईन डेच्या त्या गप्पा ऐकतांना अर्जुनने स्वरालीकडे चोरुन बघत होता, हे तिच्या लक्षात आलं, ती पण त्याच्या नजरेला लाजुनच नजर भिडवत होती. "हे लावण्या तु आणि हर्षित कॅंटीनमध्ये त्या गाण्यावर केला तो ऍक्ट करुन दाखवाना अर्जुनला प्लीज," असं रितेश बोलला. मग त्या दोघांनी "प्यार हुआ इकरार हुआ" या गाण्यावर सकाळी केला तसा ऍक्ट केला. अर्जुन, स्वरालीनं त्याला मनापासुन दाद दिली. मग थोड्यावेळानं सगळेजण आप-आपल्या घरीन गेले. स्वराली जाऊ लागल्यावर अर्जुन तीला बोलला, "हे स्वराली, तुला खरंच आवडलं ना मी काढलेलं चित्र?" तीनं क्षणभर त्याच्याकडे बघितलं, तीच्या नजरेत वेगळीच चमक होती, "हो रे अर्जुन, तुला वाटेल मी काही पण विचार करतेयं, पण हे चित्र बघता क्षणी त्या चित्रातील मुली मध्ये मी जणु स्वतःलाच बघत होते, खुप छान काढलयं चित्र, खरंच मी ते माझ्या रुममध्ये लावणार बघं," असं ती त्याला बोलली. "आणि त्या चित्रातला मुलगा?" असं अर्जुनने तिला लाजतच विचारलं, स्वरालीला हसु आलं, लाजतच ती त्याला बोलली, "तुला माहिती आहे कोण आहे तो." असं म्हणत ती तिथुन धावतच घरी गेली. अर्जुनला जणु स्वर्ग जिंकल्यासारखा आनंद झाला. 
           घरी आल्यावर स्वरालीनं तिच्या आईला अर्जुनने काढलेलं चित्रं दाखवलं. "आई, हे बघं अर्जुनने किती सुंदर चित्र काढलयं ते, आणि मला दिलयं बघं ना आई." असं स्वराली आनंदान बोलली. "खरंच गं, किती सुंदर चित्र आहे हे, नदीकाठी दोन छोटी मुलं खेळतायं, समोर इंद्रधनुष्याचा सुरेख देखावा, आकाशात उडणारी पाखरं, नदीकाठची हिरवळ, काठाच्या कडेलाच असणारी ही कमळाची फुलं, खरंच खुप छान आहे हे. पण अर्जुन केव्हापासुन चित्र काढायला लागला?" असं तीची आई बोलली. "अगं मला पण काहीच ठाऊक नव्हतं याबद्दल, आज तो दिवसभर यासाठीच घराबाहेर गेला होता, कॉलेजलाही गेला नव्हता, म्हणुन त्याचा सगळा ग्रुप इथे आला होता त्याला भेटायला. अगं आई तुला एक गंम्मत सांगु का? ती तेजाली दिदि आहे ना, तिचा आणि रितेशचा यंदा ५ वा व्हॅलेंटाईन डे होता, २००७ मध्ये ते लग्न पण करणार आहेत. आई, तुझं आणि बाबांच पण लव्ह मॅरेज झालं होतं ना, सांग ना मला कसं झालं?" असं स्वराली बोलल्यावर तिची आई जरा लाजली. 
                         "ईश्श.. काहीतरीच काय स्वराली, जा अभ्यास कर, बाबा आले की त्यांनाच विचार." असं म्हणत स्वरालीची आई लाजतच किचनमध्ये निघुन गेली. "आई, लाजलीस की खुपच सुंदर दिसतेस तु" असं स्वराली तिला हसतच बोलली, आणि मग ती आजीच्या खोलीत गेली. आजीच्या फोटोला अर्जुनचं चित्र दाखवत मनातच बोलली, "आजी हे बघं, अर्जुनने माझ्यासारखंच चित्रं काढलयं, तुला आवडलं ना आजी," नंतर स्वराली तीच्या खोलीत जाऊन अभ्यास करु लागली. 
      अर्जुन घरात आला, आनंदाने त्याला गाणं म्हणावसं वाटत होतं, स्वछंदपणे उड्या मारावसं वाटत होतं, फुलपाखरांसारखं बागडावं वाटतं होतं. आयुष्याच जणु सार्थक झालंय असं त्याला वाटु लागलं. स्वरालीच्या त्या उत्तरानं त्याच्या मनात वसंत फुलवला होता. अर्जुनला आता पटलं होतं की तो स्वरालीच्या प्रेमात पडलायं आणि ती देखील त्याच्या प्रेमात पडलीएं. एकप्रकारे त्यानं त्याच्या पध्दतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केलायं असं त्याचं मन त्याला सांगत होतं. स्वरालीकडे चोरट्या नजरेनं आज त्याला पहिल्यांदाच बघावंस वाटलं होतं, स्वरालीच्या नजरेला नजर भिडवतांना त्याला जाणवत होतं की स्वराली नुसतीच सौंदर्यवती नव्हती तर ती लावण्यवतीही होती. सौंदर्य तर बाह्यरुपावरुन ठरतं तर लावण्य अतंरंगावरुन आणि स्वरालीच्या सौंदर्य आणि लावण्यावर अर्जुन एकदम फिदा झाला होता. 
         रात्री स्वरालीचे बाबा उशीरा आले होते, आल्यावर स्वरालीच्या आईनं त्यांना स्वरालीने विचारलेला प्रश्न सांगितल्यावर त्यांना हसु आलं. "अगं आशु, सांगायच ना तिला, वेडीच आहेस तु, खरंच आपली लव्हस्टोरी किती निराळीच आहे ना?" असं स्वरालीचे बाबा बोलले. मग कसलातरी विचार करुन त्यांनी स्वरालीला बोलवलं. स्वराली आल्यावर तीच्या बाबांनी तिला त्यांची लव्हस्टोरी सांगायला सुरुवात केली. "बेटा स्वराली, तुला आश्चर्य वाटेल की आता आशु जशी आहे ना, कॉलेजमध्ये एकदम वेगळीच होती. सतत अभ्यास, जेव्हा बघावं पुस्तक हाताशीच असायचं, कॉलेजमध्ये जितकी पुस्तक मी चार वर्षात वाचली नसतील तितकी हीनं महिन्याभरात वाचली असतील, मी एकदम मस्तकलंदर बंदा होतो. कॉलेजचा जी.एस. होतो मी, जितका वेळ वर्गामध्ये नसायचो तितका वेळ लायब्ररीच्या बाहेर आम्ही मुलं गप्पा मारायचो. कारण लायब्ररीच्या खिडकीतुन आशुला पुस्तक वाचतांना बघायला मजा यायची. नंतर आशुला कळलं की मी तिच्याकडे बघत असतो, एकदिवशी तीनं धाडस करुन विचारलं मला, "काय रे राहुल, माझ्यासारखा एकटक का बघत असतो?" असं स्वरालीचे बाबा बोलल्यावर स्वरालीनं उत्सुकतेनं विचारलं, "बाबा मग तुम्ही काय उत्तर दिलं?" स्वरालीचे बाबा हसायला लागले. 
            "अगं स्वरा, कॉलेजचे जी.एस. हे, सगळ्या कॉलेजमध्ये वट होती, पण मी असं विचारल्यावर एकदम घाबर्‍या आवाजात म्हणाले, "समोरचा आपल्याकडे एकटक बघतोयं, हे त्याच्याकडे एकटक बघितल्याशिवाय कसं कळणार अश्विनी?" आणि लगेच तिथुन पळुन गेले. असं स्वरालीच्या आईनं स्वरालीला सांगितलं. "बाबा, म्हणजे तुम्ही आईला घाबरले होते?" असं स्वरालीनं तिच्या बाबांना विचारलं. त्यांनीही हसुन तिला सांगितलं, "अगं घाबरलो, म्हणजे काय, एकतर हिच्या हातात जाड-जुड पुस्तक होतं, मनात म्हंटलो, "देवा, वाचवं बरं का, ह्या सरस्वतीची कधी कडक लक्ष्मी होईल, आणि त्या पुस्तकानं मला धडा शिकवेल," म्हणुन  तिथुन पटकन निघुन जाणं पसंत केलं. पण नंतर आम्ही दोघंही एकमेकांशी नजरेनंच संवाद करायला लागलो. जणु मुक्यांची बडबड असावी असंच, हळुहळु आम्ही दोघं एकमेकांशी बोलायला लागलो, मग आमची चांगली मैत्री झाली, मैत्रीच्या झाडाला मग प्रेमाचं फळ लागलं, तुला सांगु, त्यावेळीपर्यंत कॉलेजमध्ये कधीच असं घडलं नव्हतं की कॉलेजच्या जी.एस.च अफेअर असेल, पण माझं झालं होतं. नंतर आमच्या घरापर्यंत हे प्रकरण पोहचलं." असं स्वरालीचे बाबा बोलले. स्वराली त्यांच वाक्यनं वाक्य मनापासुन ऐकत होती.
         "अगं, पहिले तर हिच्या घरातुन खुप कडाडुन विरोध झाला, पण आईनं हिच्या घरच्यांना समजवलं, त्यावेळी आमच्या गावतलं ते पहिलं इंटरकास्ट मॅरेज ठरलं. आणि मग अश्विनी पटेलची आश्विनी मराठे झाली. दोन्ही कुटुंबाच्या परंपरा वेगळ्या, संस्कृती वेगळी, पण तुझ्या आईनं खुप लवकर यांना इतकं सफाईदारपणे जुळवलं की बस्स. म्हणुन मी नेहमी म्हणतो की "मला वाटायचं ही कधीच बदलणार नाही, आणि तिला वाटायचं मी नक्कीच बदलेल, पण आमचं दोघांचं लग्न झाले, आणि दोघांचेही अंदाज चुकले, मी आहे तसाच राहिलो, आणि तुझी आई माझ्यासाठी सर्वस्वी बदलुन गेली. हेच आहे आमच्या प्रेमाचं रहस्य. बेटा प्रेम करणं म्हणजे नुसता एकमेकांबरोबर वेळ घालवणं, एकमेकांसोबत राहण असं नसतं, तर एकमेकांसाठी आपल्या आयुष्यातले प्रत्येक क्षण खास बनवणं, एकमेकांसोबत रहाण्यापेक्षा एकमेकांसाठीच जगणं महत्वाच असतं. स्वराली, तुला सांगु का प्रेम म्हणजे मुलासाठी जणु कॅरमचा खेळ, आणि मुलीसाठी जणु बुद्धीबळाचा डाव. कॅरम खेळतांना सारखं मुलाचा प्रयत्न असतो की राणी त्यालाच मिळावी, त्यासाठीच त्याच्या जीवाचा आटापिटा असतो, तसं खर्‍या जीवनात तो आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतो. तर बुद्धीबळामध्ये होतं असं की राणीच नेहमी आपल्या राजाला वाचवायचा प्रयत्न करते, अगदी त्याचप्रमाणे मुलगी आपल्या प्रेमासाठी सगळ्यात मोठी गोष्ट करायला तयार असते ती म्हणजे त्याग." असं स्वरालीचे बाबा तिला बोलले.
          "चला पुरे झाल्यात गप्पा आता, तिला अभ्यास करु द्या, आपली स्टोरी सांगायला खुप वेळच वेळ आहे, तिचा पेपर आहे उद्या," असं म्हणत स्वरालीच्या आईनं स्वरालीला अभ्यास करायला सांगितलं. स्वरालीला खरंतर तिच्या बाबांकडुन अजुन खुप काही ऐकायचं होतं, पण अभ्यास करणंही महत्वाचं होतं, म्हणुन ती अभ्यासाला बसली. अभ्यास झाल्यानंतर स्वराली स्वरालीला झोप लागली. तिच्या स्वप्नात आजी तिला आवडणार्‍या राजकुमाराची गोष्ट सांगत होती, आणि गोष्ट संपल्यानंतर स्वराली आजीला बोलली, "आजी, तु मला त्यादिवशी तो गोष्टीतला राजकुमार दाखवणार होतीस ना? अगं पण तुला माहितीच नाही की त्याला मी दररोज भेटते, त्याच्याशी बोलते, त्याने आज मला किती छान चित्र भेट दिलयं तुला आवडलं ना?" स्वप्नात आजी स्वरालीला बोलली, "सांग बर बाहुली, कोण आहे तो राजकुमार?" स्वप्नात स्वराली लाजली, तितक्यात आजी तिला बोलली, "स्वराली, त्यादिवशी तुझा राजकुमार भेटवला नव्हता ना? हे बघं मी आज त्याला आणलयं फक्त तुझ्यासाठी," असं आजी बोलली.
                  तिला त्या चित्रातल्या देखाव्यासारखाच देखावा दिसत होता, आणि समोरुन येणारा अर्जुन तिला जणु एखाद्या शुरवीर योद्धाच वाटत होता. तिच्याजवळ पोहचल्यावर अर्जुन तिला म्हणतो, "हे स्वराली, सांग ना त्या चित्रातला तो मुलगा कोण आहे ते?" स्वरालीनं लाजुन मान खाली घातली, तिच्या चेहर्‍यावर अलगद हसु उमटलं होतं, अर्जुनने तिचा चेहरा अलगद आपल्या हातांनी वर केला, "तुच आहेस रे अर्जुन त्या चित्रातला मुलगा, आजीच्या गोष्टीतला मला आवडणारा, हवाहवासा वाटणारा, माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारा माझा राजकुमार." असं स्वराली त्याला बोलली. स्वराली असं बोलल्यावर अर्जुनला प्रचंड आनंद झाला, आनंदाच्या भरात त्यानं तिला उचलुन घेतलं. स्वराली हे सगळं स्वप्नात बघंत होती. पण तितक्यात तीने रात्री ३ वाजता लावलेला गजर वाजला, आणि तीला नाईलाजानं त्या गोड स्वप्नातुन जागं व्हावं लागलं.
         स्वरालीला जसं स्वप्न पडलं तसंच स्वप्न अर्जुनलाही पडलं होतं, पण तो मध्येच दचकुन जागा झाला. वादळापुर्वी येणारी शांततेचा जणु त्याला अनुभव झाला. आपल्या आणि स्वरालीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी विपरीत घडेल या विचारानं त्याचं मन चिंताग्रस्त झालं. "माझ्या आयुष्यात मला जे मिळालं त्यासाठी परमेश्वरानं माझी बरीच परिक्षा बघितलीएं, का मला असं जाणवतयं की स्वरालीचं प्रेम मिळवतांना मला माझ्या आयुष्यातल्या अग्नीपरिक्षेला सामोर जावं लागणारच आहे याची जाणीव का होतेयं मला? मी स्वरालीशी याबाबत बोलायला हवं का? ती नेहमी म्हणते की मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे ते, पण मी तिचा नुसताच बेस्ट फ्रेंड आहे का? स्वराली मला खरंच तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं आहे गं, तुझ्या बरोबर आयुष्याचे प्रत्येक रंग बघायचे आहे गं," असं अर्जुन स्वगतच बोलला. पुन्हा मग त्याने जोपायचा प्रयत्न केला, पण काही केल्या त्याच्या डोक्यातुन तो विचार जातच नव्हता.

Wednesday, November 14, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१६


                     घरी आल्यावर स्वराली अभ्यास करु लागली, रात्री झोपेत ती अर्जुनच्या बर्थ डे ला त्याला काय सरप्राईज द्यायचं त्याचा विचार करु लागली. सकाळी अर्जुन तिला पेपरसाठी शुभेच्छा देण्यासाठी आला. मग मैथिली आणि स्वराली दोघ्याजणी तिथुन निघाल्या. "ऐ मैथिली, तुला एक विचारु का पण तु हसणार नसशील तर?" असं स्वरालीनं तिला विचारलं. "अभ्यासाचं काही विचारु नकोस गं, आधीच जाम टेंशन आलयं," असं मैथिली तिला बोलली. "अगं अर्जुनचा बर्थ डे आहे २२ फेब्रुवारीला, त्याला एकदम छान सरप्राईज द्यायचं आहे," असं स्वराली त्याला बोलली. "अगं स्वराली, मगं काय ठरवलंय तु?" असं मैथिलीनं तिला विचारलं. "अजुन काही सुचलच नाही गं," असं स्वरालीनं तिला सांगितलं. "एक काम करु, आपण पेपर झाला की ठरवुया," असं मैथिलीनं तिला सुचवलं. 
        इकडे कॉलेजमध्येही १४ फेब्रुवारीचे सगळ्यांना वेध लागले होते. व्हॅलेंटाईन डे येणार म्हणुन प्रत्येक जण उत्साहात होता. कॉलेजमधली मोजकीच अफेअर्स सोडली तर एरवी मुला मुलींमध्ये जणु वर्गात कोल्डवॉर चालायचा. पण व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी जणु कोल्डवॉर थांबलेलं असायचं. मुलं-मुली आप-आपसांतलं इंटरएक्शन वाढवु लागायची. कोणाला अचानक त्याच्या जवळ असलेल्या विषयाच्या नोट्स मुद्दाम तीच्याकडुन हव्या असायच्या, एखादी मुद्दाम मग तीला आवडणार्‍याचं जर्नल मागायची, लेक्चरला दांड्या मारणारे हक्कानं लेक्चरला येऊन बसायचे. कॉलेजसुरु झाल्यापासुन ज्यांनी लायब्ररीकार्ड काढायची तसदी घेतलेली नसायची त्यांच दुर्लभ दर्शन कॉलेजच्या लायब्ररीला व्हायचं. लेक्चरला एरवी सरांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करणारे अचानक सरांच्या प्रश्नांना स्वतःहुन उत्तर द्यायची, कुणाला मग कधी न पडायचे असे प्रश्न पडायचे, कॉलेजनंतरही अभ्यासाला काही जण थांबायचे. 
            कॉलेजच्या कॅंटीनमध्ये एरवी मिळणारे पोहे, उपमा, वडापाव, समोसे, मेदुवडे, मिसळ, चहा, कोल्ड्रिंक्स यासारख्या पारंपारिक पदार्थांच्या जोडीला मग इडली, डोसे, व्हेज कटलेट्स, पेस्ट्रीज, आईसक्रीम्स, केक, पावभाजी, पाणीपुरी, कोल्ड कॉफी यासारख्या पदार्थांची रेलचेल असायची. कॉलेजचा युनिफॉर्म घालायचा नाही, त्याऐवजी फाईन भरणारे मग कडक इस्त्री केलेल्या कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये झळकायचे. कॉलेजमधल्या विध्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या श्री बच्छाव सर विध्यार्थीप्रिय शिक्षिका असलेल्या सौ. पोद्दार मॅडमच्या लेक्चरला मुल-मुली हक्कानं ऑफ मागायचे, वर्गात मग प्रत्येकजण आप-आपलं टॅलेंट सादर करायचा, एखादी गाणं चांगल म्हणायची, कुणाला डान्स छान जमायचा, काहीजण मिमिक्री करायचे, कधी अंताक्षरी रंगायची, सर व मॅडमही त्यांच्यावेळचे किस्से वर्गात मुला-मुलींना सांगायचे असं छान हसतं-खेळत वातावरण कॉलेजमध्ये असायचं. जणु श्रावणात धरणी जशी हिरवळीने सजुन जाते आणि वातावरण कसं प्रसन्न वाटतं अगदी कॉलेजमध्ये तसंच वाटत असायचं, एकप्रकारे जणु कोणीतरी जादुची कांडी फिरवलेली असायची व्हॅलेंटाईन डे असला की..! 
             पेपर झाल्यानंतर स्वराली आणि मैथिली दोघीजणी अर्जुनच्या वाढदिवसाला काय खास तयारी करायची याचा विचार करु लागल्या. "हे स्वराली, अर्जुनचा बर्थडे १४ फेब्रुवारीला असता तर तुला तर काही टेंशन घ्यायचीच गरज नसती, व्हॅलेंटाईन डे ला अर्जुनचा बर्थडे, आणि स्वराली त्याला प्रपोझ करतेयं व्वा हाऊ रोमॅंटिक..!" असं मैथिली तीला बोलली. "छे, मैथिली काहीपण डोकं चालवु नकोस तु, अर्जुन माझा बेस्ट फ्रेंड आहे कळलं, तु मला असंच चिडवणार असशील तर मी चालले," असं स्वराली थोडी लाजतच बोलली. "बरं, नाही चिडवतं, पण माझी कल्पना छान होती ना? अगं खरंच त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ना, त्यामुळे तुलाच छान काहीतरी सुचेलच बघं, आणि तु त्याच्यासाठी काही केलं तरी ते त्याला खुप आवडेल बघं, तुला एक गोष्ट मनापासुन सांगते कदाचित तुला वाटेल की मी काहीपण बोलतेयं, पण मला वाटत तु अर्जुनला खुप आवडतेस, मी नेहमी बघते जेव्हा तो तुला बघतो तेव्हा खुप खुष असतो," असं मैथिली बोलली. मैथिलीच्या या बोलण्यानं स्वराली क्षणभर गप्पच होती. मैथिलीच्या त्या वाक्यांनी तीचं मन सुखावलं होतं. 
                 "हे कायं गं स्वराली, रागावलीस का माझ्यावर?" असं मैथिली गप्पच असलेल्या स्वरालीला बोलली, मानेनचं तीनं नकार दिला आणि त्या दोघी घरी परतल्या. कॉलेजमध्ये अर्जुनचा ग्रुप दुपारी कॅंटीनमध्ये गप्पा मारत होता. "दोस्तांनो, तुम्हाला आज एक गुडन्युज देण्याचं मी आणि तेजालीनं ठरवलंय बरं का?" असं रितेश बोलला. "अरे व्वा, सांग की लवकर, शुभ काम में देरी क्यों?" असं शामली बोलली. "०७-०७-२००७ ला आम्ही सात फेरे घेऊन सातजन्माच्या बंधनात अडकणार आहोत.!" असं रितेश बोलला. "अरे म्हणजे तुम्ही कॉलेज पासाआऊट झाल्यानंतर  लगेच लग्न करणार आहात? आईशप्पथ काय सॉलिड गुड न्युज दिलीस रे, खरंच का?" असं हर्षित एकदम एक्साईट होऊन बोलला. "अगं तेजाली खरंच?" असं बाकीच्या मुली तिला बोलल्या. रितेश आणि तेजाली दोघांनी हसतच मान हलवुन होकार दिला. "अरे पण हे असं अचानक घडलं कसं रे?" असं अर्जुन बोलला. "अरे काल हिचा बर्थ डे होता, हिच्यासाठी मला काहीतरी खरचं खुप खास करायचं ठरवलं होतं, तिला घरी गेल्यानंतर मी आई-बाबांना तेजालीशी लग्न करणार असल्याचं सांगितलं, आई-बाबांनी विचार करुन होकार दिला, आणि आम्ही सगळे मग थेट तेजालीच्या घरी गेलो, तिथे माझे आई-बाबांनी तिच्या आई-बांबाशी बोलणी केली, आणि सगंळ जणु स्वप्नासारखं वाटावं असं घडलं." असं रितेश बोलला. "अरे खरचं याला म्हणतात प्रेम, तेजाली- रितेश तुम्ही दोघं मेड फॉर इच ऑदर आहात यात कुठलीच शंका नाही, कॉंग्रॅट्स..!"असं लावण्या बोलली. सगळ्या ग्रुपनं मग त्यांच अभिनंदन केलं. 
              "चला यंदाचा व्हॅलेंटाईन एकदम खास ठरेल तर मगं," असं अर्जुन बोलला. "अरे आमचा तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे पेक्षा काही कमी खास असतो का?" असं रितेश तेजालीकडे  बघुन बोलला. त्याच्या या वाक्यानं तेजाली पुरतीच लाजुन गेली, आणि जमलेल्या सगळ्यांना हसु आलं. थोड्यावेळानं मग ते लेक्चरला गेले. आज लेक्चरला त्यांना अनायसे ऑफ मिळाला, वर्गात मग मुलं-मुली जस्ट-अ-मिनिट खेळु लागले. "अर्जुन, तुला एक गोष्ट सांगतो तुला हसु येईल, बघं ना दरवेळी सोहम असायचा तर या बाकीच्या मुलांचा नुसता जळफळाट व्हायचा ना..! सोहम असं काही सादर करायला लागला की मुली काय खुष व्हायच्या, मागची मुलं त्याला कशी विनवत म्हणायची, "भाई एखादी तरी राहुद्या ना आमच्यासारख्यांवर प्रेम करण्यासाठी, सगळ्या मुली तुमच्याच प्रेमात पडायला लागल्या तर आम्हाला तर या वयात हिमालयात जायची वेळ येईल, कॉलेज लाईफमध्ये एकही गर्लफ्रेंड नाही असं सांगितल्यावर हसतात की बाकीचे..! काहीतरी दया करा तुमच्या भक्तांवर, आम्हाला काही टिप्स द्या," असं हर्षित बोलला. "हो रे, पण नुसतेच मागचे मुलं नाही तर तु सुद्धा असायचाच की त्यांच्याजोडीला विसरलास का?" असं म्हणत अर्जुनने त्याला कोपरखळी दिली, आणि मग ते दोघही हसायला लागले. 
                         वर्गात जस्ट-ए-मिनिटचा खेळ चांगलाच रंगात आला होता, तितक्यात लावण्या उठली आणि हर्षितला बोलली, "कविराज उठा, एखादी कविता म्हणा की..!" तीनं सगळ्यांसमोर त्याला कविता म्हणायला उठवलं हे बघताच वर्गात सगळी मुलं-मुली "कम ऑन कविराज, कविता, कविता," असं म्हणु लागले. हर्षित मग लाजतच कविता सादर करायला समोर आला, "चला मित्रांनो, खास तुमच्या आग्रहासाठी मी माझी नवंकविता सादर करतोय, "तो आणि त्याची ती" असं हर्षित बोलला. तितक्यात वर्गातल्या मुली एकासुरात ओरडल्या, "हर्षित कविता कुणाला डेडिकेट करतोय रे?" आणि सगळे हसायला लागले, लाजतच हर्षित बोलला, "लावण्या फक्त तुझ्यासाठी." सगळ्या मुली परत त्याला बोलल्या, "ऐकु नाही आलं, वन्स मोअर." आणि मग हर्षितने लावण्याकडे बघितलं, तिच्या नजरेला नजर भिडवत तो पुन्हा मोठ्यानं बोलला, "लावण्या फक्त तुझ्यासाठी," आणि त्यानं ती कविता सादर केली. वर्गातल्या प्रत्येकानं मनापासुन त्याला दाद दिली, कविता झाल्यानंतर मिनिटभर वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. लावण्या तर मनोमन सुखावली होती, तर हर्षितला जणु स्वर्गच सापडला इतका आनंद झाला होता. 
               अशीच मजा लेक्चरमध्ये येत असल्याने हल्ली मुलांचा अटेंडन्स १००% असायचा. टिचर्स रुममध्ये सर्व शिक्षक आप-आपसांत गप्पा मारतांना म्हणायचे, "कॉलेजध्ये निदान दोन महिन्यांनतर एखादा इव्हेंट ठेवायलाच हवा, म्हणजे नेहमी मुलांना अटेंडन्सच सांगायची कटकट चालली जाते, लेक्चरला मुलं लक्ष देतात, बरोबर का नाही पोद्दार मॅडम," असं बच्छाव सर बोलले. "हो ना, हेच तर वय असतं त्यांच शिकता शिकता मजा करायचं, कॉलेजचे दिवस परत परत थोडेच मिळतात, यंदाच्या सगळ्या बॅचेस खरच खुप ऍक्टिव्ह आहेत बरं का, आणि त्यातही हर्षित जोशीची बॅच खुपच छान आहे, मला तर माझे कॉलेजचे दिवस आठवतात त्यांच्या वर्गावर लेक्चरला गेलं की." असं सौ. पोद्दार मॅडम बोलल्या. इतर शिक्षकांनाही यानिमित्तानं त्यांच्या आठवणींची आठवण व्हायची.
                    कॉलेज सुटल्यानंतर आज अर्जुन एकटाच घराकडे चालला होता, घरी लवकर जाऊन त्याला स्वरालीला भेटायची ओढ लागली होती. हल्ली त्याला स्वरालीला भेटल्याशिवाय रहावतं नव्हतं, म्हणुनच त्याच्या पायांची गती वाढली होती. तितक्यात त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी त्याला माघुन हाक मारतयं त्याने मागे वळुन बघितलं तर त्याला चिराली दिसली. "अरे अर्जुन थांब ना, केव्हाची हाक मारतेयं रे, पण तुझं लक्षंच नव्हतं," असं ती एका दमात बोलली. "अगं जरा घाईतच होतो, पण तु सांग काय काम आहे?" असं अर्जुनने तिला विचारलं. "अरे तुला कसं सांगु रे, तुला तर सगळं महितीच आहे ना, सोहमला फार मिस करते रे." असं म्हणतांना ती उदास झाली होती. अर्जुनने तिच्याकडे सहानभुतीनं बघितलं आणि बोलला, "तुझ्या इतकचं आम्ही सगळेही त्यालाच नाहीतर बाकीच्या सगळ्यांना मिस करतो गं, आजच जस्ट-ए-मिनिट सुरु होतं त्यावेळीच हर्षितनं त्याची आठवण काढली होती." 
            "तेजाली आणि रितेशला बघितल्यावर मला सोहमच आठवतो रे, मला पुर्ण जाणीव होती की वर्गातल्या बर्‍याच मुली त्याच्यावर जीवापाड प्रेम करायच्या आणि तोही." असं म्हणतांना तिचे डोळे पाणावले. अर्जुनला तिला कसं समजवावं हा प्रश्न पडला. "रस्त्याच्या मध्ये उभं राहुन त्याच्यासाठी खुप मोठ्यानं रडावसं वाटतं, कुणी नाही निदान त्या चंदेरी चंद्रालाच माझ्या आसवांच कारण कळावं रे, त्याला मी कधीच विसरु शकत नाही रे अर्जुन." असं चिराली त्याला बोलली. तितक्यात तिथे मिताली आणि शामलीही येऊन पोहचली. अर्जुनने त्यांना चिरालीच्या दुखाःच कारण सांगितलं, मग त्यांनी तिला समजावलं, आणि मग ते घराकडे परतले.
                घरी आल्यावर अर्जुनला स्वरालीला भेटायचं होतं, दिवसभरात जे घडलं ते तिला सांगायचं होतं, म्हणुन तो तिची वाट बघत अंगणातच थांबला होता. पण रात्रीचे आठ वाजले तरी स्वराली अजुन कशी आली नाही म्हणुन त्याच मन बैचेन झालं होतं, "असं कसं झालं आज, स्वरालीची तब्येत तर बरी नसेल ना? रोज ती मला भेटायला येते आणि आज?" असं अर्जुन स्वगतच बोलला, आणि त्याने स्वरालीच्या घरी जाऊन तिला भेटुया असं ठरवलं. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळालं की स्वराली आज अभ्यासासाठी मैथिलीच्या घरीच रहाणार होती. अर्जुन मग घरी आला, "मैथिली कुठे रहाते, ते विचारायला हवं होतं आपण, निदान तिचा फोन नंबर तरी घ्यायला हवा होता, छे आज काही स्वरालीशी बोलण होणार नाही असं दिसतेयं," असं अर्जुन मनातच बोलत होता तोच त्याच्या घरच्या फोनची रिंग वाजली. 
           "नक्कीच स्वराली असणार..!" असं आनंदाने म्हणत त्याने तो फोन उचलला, आणि समोरुनही स्वरालीच बोलतच होती. "अगं स्वराली तुला माहिती आहे का, केव्हाचं तुझी आठवण काढत होतो बघं, इतक्यात तुझ्या घरी जाऊन आलो आणि कळलं की तु तर आज मैथिलीच्या घरी आहे ते, बरं तुझा पेपर कसा होता?" असं अर्जुन बोलला. "अरे अर्जुन, पेपर तर इतका सोप्पा होता की बस्स, मैथिलीलापण खुप सोप्पा गेला पेपर, आणि सॉरी अर्जुन तुला न सांगताच इकडे आले, उद्या मॅथचा पेपर आहे ना, म्हणुन मी आणि मैथिलीनं एकत्रच अभ्यास करायचं ठरवलं होतं." असं स्वराली त्याला बोलली. "छे गं, त्यात काय सॉरी म्हणतेस, तुझा पेपर महत्वाचा आहे, मन लावुन अभ्यास करा दोघीपण, उद्या येईल तुमचा पेपर झाला की भेटुया, आता फोन ठेवतो तुम्हाला अभ्यासात डिस्टर्ब नको, चल गुड नाईट," असं म्हणुन अर्जुनने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतरही त्याला स्वरालीशी बोलायची इच्छा होत होती. 
                 हर्षित थोड्यावेळानं अर्जुनच्या घरी आला, "हाय अर्जुन, तुझ्याकडे एक काम आहे यार, पण आपल्या दोघांशिवाय लावण्याला कळायला नको," असं हर्षित बोलला. "अरे असं कोणत काम आहे? आणि लावण्यापासुन आत्ताच लपवाछपवी करायला लागलास का?" असं अर्जुन हसतच बोलला. "अरे तसं नाही रे, तुला तर माहिती आहे ना परवा व्हॅलेंटाईन डे आहे ते, माझ्या आयुष्यातला पहिलाच आहे म्हणुन तो एकदम स्पेशल करायचा आहे रे," असं हर्षित बोलतांना उतावीळ झाला होता. "अरे हर्षित, तु तर असं बोलतोयं जसं की तो तुझा पहिला आणि शेवटचा. जाऊदे बरं काही ठरवलयं का?" असं अर्जुन हसतच त्याला बोलला. "नाही रे, हे असलं पहिल्यांदाच आहे ना आपल्या आयुष्यात भाई," असं हर्षित बोलल्यावर अर्जुनला हसु आवरणं अवघड झालं, "तु तर असा म्हणतोय की मला खुप सार्‍या व्हॅलेंटाईन डे चा अनुभव आहे, मी काय तुला मदत करणार? सोहम असता तर नक्की मजा आली असती बघं," असं अर्जुनने त्याला समजावलं. "अरे तु असं का बोलतोयं? म्हणजे तु आणि स्वराली." असं हर्षित बोलला, त्याला मध्ये थांबवतच अर्जुननं त्याला सांगितलं, "हे हर्षित, असं काही मनात विचार करु नको रे, ती आणि मी दोघंही बेस्ट फ्रेंड्स आहोत बस्स..! अर्जुनचं वाक्य मध्येच थांबवत हर्षित बोलला, "यार, तु तर रिलेशन स्टॅटसच क्लियर केल्यासारखं बोलतोयं, पण मला नाही वाटत तुम्ही नुसतेच बेस्ट फ्रेंड्स आहात, तुमच्यात त्यापेक्षाही खास नात आहे असं मला वाटतं रे, तु आणि स्वराली एकत्र का येत नाही तेच आम्हाला कळत नाही बघं, मला माहिती आहे की ती तुला खुप आवडते, मग तु का तिला प्रपोझ नाही करत रे अर्जुन? सोहम म्हणायचं तसं अभी नहीं तो कभी नहीं रे.!" असं हर्षितनं त्याला विचारलं. 
              हर्षितच्या प्रश्नानं अर्जुन निरुत्तरीत झाला, हर्षितला काय सांगावं हे त्याला सुचेना, "अरे माझं जाऊदे रे, आपण ठरवुया ना लावण्या आणि तुझ्या बद्दल," असं अर्जुन बोलला, "विषय बदलु नको अर्जुन, आधी मला सांग तु स्वरालीला सांगणार आहेस की नाही?" असं हर्षितच्या बोलण्यावर अर्जुनने क्षणभर त्याच्याकडे बघितलं, "काळ आला आहे रे, पण अजुन वेळ आली नाही हर्षित..!" असं म्हणत अर्जुनने हर्षितला परत त्याबद्दल बोलायला मनाई केली. थोडावेळानं मग हर्षित तिथुन निघुन गेला, तो गेल्यावर अर्जुन हर्षितच्या बोलण्याचा विचार करु लागला. त्याला एकदा वाटायचं की स्वरालीला सांगावं की तो तिच्यावर प्रेम करतो ते, पण पुन्हा त्याच्या मनानं तो विचार केव्हाच खोडलेला असायचा. आकाशात दाटुन आलेल्या काळ्या मेघांच्या उपस्थितीनं धरणी जशी सुखावते अगदी तसंच अर्जुनच्या मनाचं झालं होतं, स्वरालीच्या नसण्यापेक्षा ती असण्यानेच तो समाधानी होता. 

Saturday, November 3, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१५


              त्या रात्री स्वरालीला झोपच लागत नव्हती. अर्जुन काय बोलला होता, याचाच विचार तिच्या मनात सुरु होता. अर्जुनला मी खरचं इतकी आवडते का? या प्रश्नाचं उत्तर तिला हवं होतं. अर्जुनने फक्त विचारायचीच देरी आहे, असं तिला वाटायचं. अर्जुनला ती तिचा बेस्ट फ्रेंड मानत होती, पण त्या दोघांतलं नातं निव्वळ मैत्रीपुरतच मर्यादित नव्हतं हे तिला जाणवायचं. तिचं मन पहिल्यांदा खुप चंचल होतयं असं तिला वाटलं. नंतर ती अर्जुनला उद्या अलकाकाकुंना भेटवणार होती ते तिच्या लक्षात आलं, अलकाकाकुंना अर्जुन नक्कीच आवडेल असं तिला वाटत होतं. सकाळी आठ वाजता स्वराली अर्जुनच्या घरी आली. "अर्जुन, आत्ता चल ना माझ्या घरी, तुला कोणाला तरी भेटवायचं आहे." असं स्वराली बोलली. "अगं इतक्या सकाळी कोणाला भेटवणार आहेस?" असं अर्जुन बोलला. "तु इथेच बोलत बसणार आहेस का अर्जुन? चल ना पटकन." असं स्वराली त्याला बोलली. मग ते दोघेही स्वरालीच्या घरी आले. "अलकाकाकु, हा बघा हा अर्जुन, अर्जुन ह्या अलकाकाकु, आईची बालपणीची सखी." असं स्वराली एकदम प्रफुल्लित होऊन सांगत होती. 
         अर्जुनबरोबर मग त्यांनी थोडावेळ गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना जाणवलं की त्यांनी अर्जुनबद्दल जे मत मनात तयार केलं होतं ते किती चुकीचं होतं, अर्जुन खरंच खलनायक नाही तर त्यांना नायक वाटायला लागला. थोड्यावेळानं अर्जुनच लक्ष घड्याळाकडे गेलं, "येऊ का काकु मी, कॉलेजला जायचं आहे मला..!" असं अर्जुन बोलला, जातांना तो त्यांचा आशिर्वाद घ्यायला विसरला नाही. अलकाकाकु त्याच्या या वर्तनाने  खुपच खुष झाल्या, अर्जुन गेल्यानंतर त्या स्वरालीला बोलल्या, "स्वराली एकदम छान स्वभावाचा मित्र आहे बघं अर्जुन, अगं या कलयुगात मुलं स्वतःच्या आई-वडीलांच्या पाया पडायला कचरतात, अर्जुनवर खरचं खुप छान संस्कार झालेले आहेत, त्याच्यासारखा विनयशील मुलगा मी आजवर बघितला नाही. आमच्या स्वच्छिलला एकदा अर्जुनला भेटवायलाच हवं.!" अलका काकुंच्या तोंडुन अर्जुनची स्तुती ऐकुन स्वरालीला अर्जुनाचा खुप अभिमान वाटला, ती जाम खुष झाली. "अगं स्वराली, तुझी बारावीची परिक्षा झाली की अर्जुनला नक्की घेऊन ये आमच्या घरी," असं अलका काकु बोलल्या. थोड्यावेळानं अलकाकाकु स्वरालीच्या आईसोबत बसस्टॅंडवर गेल्या, बसमध्ये चढण्यापुर्वी त्या स्वरालीच्या आईला बोलल्या, "अश्विनी, तु काल रात्री बोलली ते खरंच होतं बघं, अर्जुनबद्दल माझ्या मनात अनेक शंका होत्या, पण आज त्याला सकाळी भेटल्यावर एकदम मतपरिवर्तनच झालं बघं, खरचं तुझ्या स्वरालीसाठी अर्जुन खरंच एकदम सुयोग्य जोडीदार ठरेल बघं." स्वरालीच्या आईलाही खुप बरं वाटलं होतं. 
                 कॉलेजमध्ये आल्यावर अर्जुन हर्षितला भेटला, "काय कविराज, काय म्हणत होती लावण्या?" असं अर्जुन बोलल्यावर हर्षित जरासा लाजला. "अरे आपण उगाच तिला मिस. इगो म्हणायचो रे, खरतर ती एकदम मस्त आहे स्वभावाला, पण सोहम म्हणायचा तशी थोडी रिझर्व्ह टाईपची आहे रे. अर्जुन, काल खरचं माझ्या आयुष्यातली सुंदर सायंकाळ होती बघं.!" असं हर्षित बोलला. अर्जुन आणि हर्षित तिथे गप्पा मारत उभे होते, तिथे मग चिराली, शामली, मिताली आणि रितेशपण आले, "अरे अर्जुन आज तेजालीचा वाढदिवस आहे रे, तिला सरप्राईज द्यायचं आहे पण काही सुचतच नाही, एखादी आयडिया सांग ना?" असं रितेश बोलला. "अरे आम्हाला तर काही सुचलंच नाही बघं, तुम्ही काही तरी सुचवा याला, पहिली गोष्ट म्हणजे हा तिचा बर्थडे विसरला, मी त्याला सांगितल्यावर आत्ता कुठे याला भान आलं," असं केतकी बोलली. मग सगळेजण विचार करत बसले होते, तितक्यात चिरालीला तेजाली येतांना दिसली, "अरे तेजाली येतेयं बरं का." असं ती बोलली. "अरे अर्जुन, आज तर माझं ब्रेकअप पक्क आहे यार, ती इथे यायच्या आत चल इथनं," असं रितेश बोलला. मग अर्जुन आणि रितेश दोघही तिथुन हळुच निघुन गेले. 
            "हॅपी बर्थडे तेजाली," असं तेजाली आल्यानंतर हर्षित, शामली, केतकी आणि चिराली एकसुरात बोलले. "थॅंक्स फ्रेंड्स," असं तेजाली बोलली, जरा उदास मुडमध्येच. "काय गं तेजाली, रितेश कुठे आहे? मला वाटलं तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे बरोबर एकत्र येणार आहात? आहे कुठे तो? असं हर्षित मुद्दाम बोलला. "कुठे गेलायं काय माहिती, माझा बर्थडे आहे हे पण त्याच्या लक्षात नसणार, काल रात्रीपासुन त्याच्या फोनची वाट बघत होते, पण साधा एक एस.एम.एस. सुद्धा पाठवला नाही त्याने, सकाळी वाटलं तो घ्यायला येईल पण आलाच नाही," असं म्हणतांना तेजालीचा चेहरा हिरमुसला होता. "येईल गं, अगं एकवेळ तो त्याचा बर्थडे विसरुन जाईल, पण तुझा बर्थडे तो विसरणं शक्यच नाही. त्याला माहिती आहे ना तेजाली रागवेल, असेल कॅंम्पसमध्येच तुला शोधत, कदाचित तुला सरप्राईज देणार असेल तो." असं मितालीनं मग तिला समजावलं. तितक्यात कॉलेज सुरु झाल्याची बेल झाली, लेक्चरला तेजालीचं मन रमत नव्हतं. ती सरांची नजर चुकवुन रितेशला फोन करत होती, पण रितेशने तिचा फोन उचलाच नाही. तासाभरानंतर त्यानं तिला मेसेज पाठवला, "हा मोबाईल नं कोणाचा आहे, मुर्खासारखं केव्हाचा मिसकॉल देतोय?" त्याच्या ह्या मेसेजमुळे तेजालीला रडुच आलं.
                  तेजालीच्या शेजारी बसलेल्या शामलीनं तिला हळुच विचारलं, "कायं गं काय झालं, का रडतेयं?" तेजालीनं तिला रितेशचा मेसेज दाखवला. "येऊ दे त्याला, आज बघतेच त्याच्याकडे." असं ती बोलली. कॉलेज सुटायच्या थोडावेळ अगोदर रितेश आणि अर्जुन दोघंही कॉलेजच्या गेटवर येऊन थांबले. कॉलेज सुटल्यानंतर समोरुन सुप्रिया येतांना दिसताच रितेश कान पकडुन उठबशा काढायला लागला, "हॅपी बर्थडे तेजाली.. सॉरी तेजु.." असं कॉलेजच्या गेटवर रितेश बोलत होता. त्याला बघताच तेजालीच्या डोळ्यांत आनंदाश्रु दाटुन आलं, धावतच ती त्याच्याजवळ गेली. "रितेश, जा कट्टी, किती तरसवलंस.." असं म्हणत तीनं त्याच्याकडे बघितलं, "सॉरी राणीसरकार, अहो तुमच्यासाठी नजराणे आणण्यास गेलो होतो." असं म्हणत रितेशनं अर्जुनला खुणवलं. तेजाली एकवीस वर्षाची झाली होती म्हणुन रितेशनं ’चॉकलेट्स, ग्रिटींग्स, पर्फ्युम, टि-शर्ट, टेडी बेअर, मेक अप किट, तिचा फोटो असलेली फोटोफ्रेम, इयर रिंग्स, ब्रेसलेट, तिला आवडणार्‍या जुण्या पिक्चर्सची सिडी, गुलाबाच्या फुलांचा बुके, घड्याळ, एक छान कादंबरी, डायरी, साडी, पैंजण, ताजमहालाची अप्रतिम प्रतिकृती, बांगड्यांचा सेट, तिचा फोटो असलेला चॉकलेट केक, लेदर पर्स, तिचा आणि त्याचा फोटो असलेलं लॉकेट, असे तिच्यासाठी सुंदर २१ गिफ्ट त्याने घेतले होते, एक एक गिफ्ट तिला तो देत होता, आणि त्यासोबत "हॅपी बर्थ डे टु यु... हॅपी बर्थ डे टु यु.. हॅपी बर्थ डे डियर तेजु हॅपी बर्थ डे टु यु.." असं रितेश म्हणत होता, त्याच्यासोबत त्याच्या ग्रुपनही सुंदर साथ दिली. तेजालीला खुप आनंद झाला, तीनं रितेशला मिठी मारली, "थॅक्स रितेश," असं ती त्याला बोलली. "काय गं भांडणार नाहीस का?" असं त्यानं तिला चिडवलं, "आजपासुन आपण भांडायचं नाही रे." असं तेजाली बोलली. "हे तेजु असं नको करुस गं, तुझ्याशी भांडलो नाहीतर करमत नाही, तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना, हे असंच राहु दे, काही म्हण रडु आलं की खुप सुंदर दिसतेस तु, आय लव्ह यु तेजाली..!" असं रितेश तिला बोलला.
                      "अरे तुम्ही दोघं बोलतच बसणार आहात का? आम्हाला पार्टी हवी तेजाली." असं लावण्या बोलली. "अरे मग वाट काय बघतायं, चला कॅंन्टीनला, आज तेजाली नाही मी देईल पार्टी" असं रितेश बोलला. पार्टी झाल्यानंतर "रितेशने काय छान गिफ्ट घेतले ना रे हर्षित," असं लावण्या बोलली. "हं, तुझा बर्थ डे असल्यावर बघं..!" असं हर्षित बोलला. पार्टी झाल्यानंतर रितेश तेजालीला तिच्या घरी घेऊन गेला. "रितेश आज खरंच तु माझा वाढदिवस अविस्मरणीय केलास रे, कसं काय सुचलं तुला हे सगळं?" असं तेजालीनं त्याला विचारलं. "अगं खरं तर मला काही सुचतंच नव्हतं, आज सकाळी तुला येतांना बघितलं आणि अर्जुनबरोबर मी तिथुन निघुन गेलो. कितीतरी वेळ मी विचार करत होतो, पण काही सुचतच नव्हतं, शेवटी अर्जुनलाच विचारलं, स्वराली जर त्याची गर्लफ्रेंड असती तर त्यानं तीला काय गिफ्ट दिलं असतं? मग त्यानंच सांगितलं की तुला एकवीस वर्ष पुर्ण झालेत म्हणुन २१ गिफ्ट दे..!" असं रितेश बोलला. 
                   "अर्जुन किती रोमॅंटिक आहे ना. खरचं रे मला तर मनापासुन वाटतं की त्याचं आणि स्वरालीचं कमिटेड रिलेशनशिप असावं." असं तेजाली बोलली. "त्याला गरज आहे गं तीची, मैत्री जिथे असते त्यावेळी कसलीच गरज नसते, आणि जेव्हा गरज असते त्यावेळी मैत्री पेक्षाही प्रेमाचीच जास्त गरज असतेच असते. आपला सगळा ग्रुप होता त्यावेळी त्याला आपण त्याच्या एकटेपणाची जाणीवपण होऊ दिली नाही, पण आता आपला ग्रुप नुसताच नावाला राहिला आहे गं, ह्या २२ फेब्रुवारीला त्याचा बर्थडे आहे, होप त्यादिवशी तरी." असं रितेश बोलला. "स्वरालीशी बोलायचं का आपण?" असं तेजाली बोलली. "वेडी आहेस का तेजु तु? अगं तिची बारावीची परिक्षा आहे, आणि असं अचानक कसं तीला सांगणार, गोंधळुन जाईल ती, जे काही करायचं ते अर्जुनलाच करु देऊया.!" असं रितेश बोलला.
            कॉलेजवरुन घरी आल्यानंतर अर्जुनला भेटायला स्वराली त्याच्या घरी आहे. "अर्जुन, अर्जुन आज मी खुष आहे तुझ्यावर.!" असं स्वराली आनंदानं त्याला बोलली. "काय झालं स्वराली?" असं अर्जुनने स्वरालीला उस्तुक्तेनं विचारलं. "अरे आज तु आमच्या घरी आलास ना अलकाकुंना भेटायला, त्या खुप इंप्रेस झाल्यात, तुझा स्वभाव एकदम आवडला त्यांना, आणि त्यांनी तुला त्यांच्या घरीपण बोलवलयं, माझी परिक्षा झाली ना की सुट्टीत जाऊया आपण?" असं स्वरालीनं अर्जुनला विचारलं. "हो जाऊया, पण तुझी परिक्षा तर संपु दे, उद्या तुझा केमिस्ट्री-१चा पेपर आहे ना, झाला अभ्यास?" असं अर्जुन तिला बोलला. "हो रे आज अलकाकाकु गेल्यानंतर दिवसभर अभ्यास करत होते, पुर्ण ३ रिविजन्स करुनच उठले, आता रात्री परत थोडा अभ्यास करेल." असं स्वराली बोलली. "हं अभ्यास करुन दमलीस वाटतं तु? काही करु का खायला आपल्यासाठी? तु सांग तुला काय आवडेल?" असं अर्जुन बोलला. "अरे आता सायंकाळ झाली, आठ वाजता बाबा आले की मग जेवण करायचं असतं, मग भुक कशी लागेल? आणि कशाला माझ्यामुळे तुला कशाला त्रास?" असं स्वराली बोलली. "हे त्रास काय त्यात, तुला मॅगी नुडल्स आवडतात ना? बस आलोच मी दोन मिनीटांत," असं अर्जुन स्वरालीला बोलला आणि किचनमध्ये वळला. 
           अर्जुनच्या पाठीमागे स्वरालीपण त्याच्या किचनमध्ये आली, "अर्जुन तुला सगळा स्वयंपाक येतो का रे?" असं तीनं त्याला विचारलं. "हो गं स्वराली, शिकलोय सातवीपासुनच" असं अर्जुन अभिमानानं बोलला. "किती छान, मला सांगु काय काय बनवता येतं, चहा, रसना, कोकम सरबत आणि मॅगी बस इतकच बनवता येते. पण मी सुट्टीत शिकणार आहे कुकिंग." असं स्वराली बोलली. अर्जुन तिच्याकडे बघुन हसला, तयार झालेली मॅगी मग त्याने छान तिला सर्व्ह करुन दिली, आणि स्वतःलाही घेऊन मग ते दोघंही हॉलमध्ये येऊन गप्पा मारत बसले. अर्जुनने तिला तेजालीच्या बर्थडे ची गंम्मत सांगितली. "अरे अर्जुन, आज तेजालीचा बर्थडे होता, मला सांगायंच ना सकाळी, ए ती फार चांगली आहे रे, तुझी मॅच बघायला आठवणीने घ्यायला आली होती रे मला, चल अर्जुन आपण तिला फोनवरुन बर्थडे विश करुया ना..!" असं स्वरालीनं अर्जुनला आग्रह केला. 
      स्वरालीचा आग्रह मग अर्जुन थोडेच टाळणार होता, मग त्याने तेजालीला फोन केला, "ऐ तेजाली, तुला अजुन एक खास गिफ्ट माझ्याकडुन जरा डोळे बंद कर, हं ऐक आता," असं अर्जुनने तिला म्हणत स्वरालीला फोन दिला. "हॅलो तेजाली दिदी, विश यु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दि डे, हॅपी बर्थ डे..!" असं स्वराली एकदम मंजुळ आवाजात बोलली. "अरे व्वा, स्वरालीच बोलतेय ना तु?" असं तेजालीने तिला विचारलं. स्वरालीनंही फोनवरुन होकार दिला. पाच मिनिट मग त्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या, "हे स्वराली, तुला एक गुपित सांगते बरं का, अर्जुनचा बर्थडे आहे २२ फेब्रुवारीला, आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत तु करशील ना आम्हाला मदत?" असं तेजालीनं तिला विचारलं. "अगं नक्कीच करेल ना," असं स्वरालीनही आनंदाने होकार दिला. फोन ठेवल्यानंतर अर्जुनने तिला विचारलं, "काय गं स्वराली, काय नक्की करणार आहेस?" "आमची गम्मत आहे, तुला कळेल नंतर." असं म्हणत स्वराली हसायला लागली. "तुम्हा मुलींच्या मनात काय चालतं ते कळणं खरच कठीण आहे बरं," असं अर्जुन तिला बोलला.

Thursday, October 4, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१४



रितेश, तेजाली आणि लावण्या गेल्यानंतर अर्जुन हर्षितबद्दल विचार करु लागला. आज त्याला डायरी लिहिण्याची इच्छाच होत नव्हती. आपली डायरी हातात पकडत तो बोलला, "काय लिहु मी आज, हर्षितने आज जे काही केलं, मला तर काहीच सु़चत नाहीए, आज तो किती वेगळाच वाटला. जणु गोठलेल्या बर्फाखालुन वाहणार्‍या नदीसारखाच, त्याच्या मनात काय सुरु आहे, याचा थांगपत्ताच लागत नाहिए. आज जर त्याच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं असतं तर, छे छे कसा विचार करतोय मी. उद्या हर्षितशी याबाबत बोलायलाच हवं. आज रितेश-तेजाली बरोबर लावण्या आलेली बघुन बरं वाटलं. कदाचित हर्षितच्या मनात चालेलेलं विचारांच युद्ध लावण्यामुळे शांत होऊ शकतं. खरचं जर लावण्या त्याच्यावर प्रेम करत असेल तर तीच्या प्रेमामुळे हर्षितच्या बर्फासारख्या गोठलेल्या भावनांना नवी वाट मिळेल. पण एक मन असाही विचार करतं लावण्या कधी आयुष्यात कुणासाठी रडणार नाही, म्हणुन तिला कदाचित हर्षितच्या भावनांची किंमत कळणार नाही, असं झालं तर खुप वाईट होईल."
नंतर अर्जुन झोपी गेला, स्वप्नातही त्याला हर्षित पुन्हा त्याच धबधब्याजवळ उभा असलेला दिसला, त्यादिवशी आलं तसचं वेगानं पाणी त्याच्याजवळ येऊ लागलयं, हर्षितला माघे घेण्यासाठी तो पळतोय, पण पाण्याच्या वेगांपुढे काही चालत नाही, आणि हर्षित त्यापाण्यात वाहत जातो." या स्वप्नानं अर्जुन एकदम खडबडुन जागा झाला. नंतर प्रयत्न करुनही त्याला झोप येईना, केव्हा दिवस उजाडेल आणि हर्षितला भेटेल असं त्याला झालं. सकाळी अर्जुन कॉलेजला लवकरच आला, आणि आश्चर्य म्हणजे हर्षित त्याच्या पहिले तिथे उभा होता. अर्जुनला बघितल्यावर तो हसला, "काय झालं रे, असं का बघतोय?" असं त्यानं विचारलं. "काल जे घडलं त्याचं स्वप्न पडलं रे." असं अर्जुन बोलला. "अरे अर्जुन, मी तुझ्या स्वप्नातही मेलो तरी वाईट वाटुन घेऊ नकोस, अश्रुंना देखील वाट मोकळी करुन देऊ नकोस, माझी तिरडीपण उचलु नकोस, सरळ वरती निघुन ये, आपण मग सगळे पार्टी करु." असं म्हणुन हर्षित हसायला लागला. 
कालपर्यंत जीव देण्याची गोष्ट करणार्‍या हर्षित मधला बदल अर्जुनला न उमजणारा होता. "अरे मी असं का बोलतोय याचाच विचार करतोय ना? जीवन जगण्यातला आणि मरणातलं अंतर काल कळलं, बस दुसरं काही नाही." असं हर्षित बोलला. हर्षितला असं बोलतांना पाहुन अर्जुनला बरं वाटलं, "जीव भांड्यात पडला एकदाचा, मला जर पहिलेच माहिती असतं ना तुला असं अंतर शोधायचं होतं, तुला त्यावेळी वाचवतांना मध्येच बुडण्यासाठी सोडलं असतं." असं म्हणुन अर्जुनला हसु आलं. थोड्यावेळानं रितेश आणि बाकीचा ग्रुप आला; त्यांच्या सोबत लावण्यापण होती. हर्षितला बघताच तिच्या चेहर्‍यावर स्मितहास्य उमटलं. "काय रे हर्षित काल कुठे होतास?" असं तिनं त्याला विचारलं. "काही नाही गं, डायरेक्टरची भुमिका सोडुन हिरोचा रोल करायचा बघतं होतो, नाही जमला म्हणुन ठरवलं आपलं आपलं दिग्दर्शनच बरं." हर्षित असं कोड्यात बोलला. अर्जुनसोडुन बाकी कुणालाच कळलं नाही. नेहमीचा हर्षित बघुन सगळ्यात जास्त आनंद अर्जुनला झाला. कॉलेज संपल्यानंतर हर्षित आणि अर्जुन दोघं चालु लागले.
"अर्जुन, काल मी किती मुर्खासारखा वागलो ना रे? जणु कवटीत मेंदुच नाही असं..!" असं हर्षित बोलला. तितक्यात माघनं लावण्या आली. "काय रे कोणाच्या डोक्यात मेंदु नाहिए?" असं तीने विचारलं. "काही नाही गं, काल मी माझ्या जुण्या कविता जाळल्या म्हणुन बोललो." असं हर्षित बोलला. "अरे, का केलसं असं? किती छान कविता होत्या तुझ्या?" असं लावण्या बोलली. "अगं लावण्या काळजी कशाला करतेस, आता तो आणखी छान-छान कविता करेल बघं, त्याला कविता करण्याला तुझ्या रुपात प्रेरणा मिळालीए ना आता, काय हर्षित? चल मी येतो, मामाच्या घरी जायचंय." असं अर्जुन बोलला. "हे अर्जुन थांब ना यार." असं हर्षित बोलला. "नाही रे खरचं जायचं आहे," असं अर्जुन लावण्याकडे बघुन बोलला आणि ती नुसतीच लाजली. आज पहिल्यांदाच हर्षित आणि लावण्या दोघांना एकत्र बघुन अर्जुनला मनोमनी आनंद झाला. "आयुष्य अनमोल असतं, आता जगुन बघं, हर्षित प्रेमाच्या ही परिक्षा पास करुन बघं." असं मनातच अर्जुन बोलला. 
"हे लावण्या, पहिलं प्रेम म्हणजे नुसतीच उस्तुकताच असते नाही का? म्हणुनच पहिल्या प्रेमाचा आनंद खरा आणि निखळ आनंद पहिल्या प्रेमातच असतो असं मला वाटतं, नाही का?" असं हर्षित बोलला. "हं. अनुभवांवरुन बोलतोयं असं दिसतयं बरं हर्षित." असं लावण्या हसतच बोलली. "अनुभव वैगेरे काही नाही गं, आता तुच बघं ना, आपण असं पहिल्यांदा एकत्र चाललोय, तुला काय सांगु काय नको सांगु याची उत्सुकता, तुला माझ्या गप्पा आवडतील की "खुप पकवतोस रे तु" असं मनातच म्हणशील याची उत्सुकता, रस्त्यानं चालतांना आपल्याकडे बघुन लोक काय म्हणतील याची उस्तुकता. रत्यानं चालतांना मला एखादं छान फुल दिसेल की नाही याची उत्सुकता, ते फुल दिसल्यानंतर मला कदाचित ते तुझ्या केसांत माळायची इच्छा होईल की त्यावर कविता सुचेल याची उत्सुकता, चालता चालता कदाचित एखादा पावभाजीचा ठेला किंवा पाणीपुरीची गाडी दिसेल की नाही याची उत्सुकता. मला अजिबात तिखट सहन होत नाही, आणि कदाचित तु म्हणशील "भैय्या दो प्लेट तिखी पाणीपुरी दो." याची उस्तुकता. घर जवळ येतयं हे लक्षात येताच आपल्या पावलांची गती कमी होईल की नाही याची उस्तुकता." असं सगळं हर्षित एकदम उस्तुकतेनं लावण्याकडे बघुन बोलत होता. "हर्षितचं मन किती सुंदर आहे ना?" असं लावण्या मनातच बोलत होती. आपल्या उभ्या आयुष्यातले सगळ्यात नाजुक क्षण आहेत असंच तिला वाटतं होतं. आज तिला कसलीच चिंता नव्हती, ना अभ्यासाची, ना कुणी तिला हर्षित बरोबर बघितल्यावर चिडवेल याची, इतकं तीचं मन हर्षितवर फिदा झालयं असं तिला वाटलं.
"हर्षित इथे एखादा फोटोग्राफर असता तर किती बरं झालं असतं ना रे? या वेळेची छान आठवण सदैव आपल्यासोबत ठेवता आली असती." असं लावण्या म्हणाली. "काळजी करु नकोस लावण्या, यासारख्या कित्येक आठवणींची ज्योत अशीच तेवत ठेवील, तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण माझ्या कवितांत गुंफुन ठेवील." असं हर्षित बोलला. लावण्याला खुप आनंद झालायं, हे तिचा चेहराच सांगत होता, क्षणभर ती त्याच्याकडेच बघत राहिली. "हे लावण्या, स्वतःचाही मला विसर पडतो जेव्हा तु माझ्याकडे असं रोखुन पहातेस, जणु एका क्षणात या भुतलावरुन स्वर्गात घेऊन जातेस," असं हर्षित बोलला, आणि तिला हसु आलं. "खरचं हर्षित, आजचा ही संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही." असं घर जवळ आल्याच लक्षात आल्यावर लावण्या बोलली. हर्षित नुसताच हसला, "बाय लावण्या." असं तो तिला बोलला. "चला माझ्या कवितांनो, तुम्हाला तुमची सवत मिळलीए बरं, आता तिच्यासाठी तुम्हाला अजुन छान व्हावं लागेल," असं ती गेल्यानंतर हर्षित स्वतःलाच बोलला.
सायंकाळी घरी आल्यानंतर अर्जुनला स्वरालीला भेटायची इच्छा झाली, पण त्याला आठवलं की तिच्या घरी पाहुणे येणार होते, म्हणुन तो घरातच थांबला. स्वरालीनं त्याला दिलेला पेन त्याने समोर धरला, आणि स्वरालीच समोर आहे, असं समजुन तो बोलायला लागला. बोलता बोलता त्याच्या डोळ्यातुन आनंदाश्रु बाह्रेर आलं, त्याने अलगद ते त्याच्या बोटांवर घेतलं, आणि बोलला, "हे स्वराली, बघ तर किती सुंदर आहे ना हा, अगदी त्या दिवशी आपण बघितलेल्या दवबिंदुसारखाच. का रे तु असा अचानक का बाहेर आलास?" असं अर्जुन त्या आसवाकडे बघत बोलला, आणि खुदकन हसला. "हं, आमच्या डोळ्यातच नाही तर ह्रदयातही स्वराली आहेना, मग ती जेव्हा आमच्या डोळ्यांत कधी बघेल तर तीला कळायला हवं ना, जणु तुझी जागा तिने घेऊन टाकलीयं, म्हणुन तु बाहेर आलास ना?" असं अर्जुन बोलला. तो असं बोलण्याच्या नादात असतांना तिथे स्वराली येऊन पोहचली. अर्जुन काय बोलला होता, हे तीनं ऐकलं, मनोमन तिला गगनात मावेनासा आनंद झाला. आज ती स्वतःला जगातली सगळ्यात सुखी मुलगी समजु लागली. अर्जुनच्या डोळ्यात खरचं तिला स्वतःच अस्तित्व शोधावसं वाटलं. ती दारातच असा विचार करत होती. "हे स्वराली, केव्हा आलीस?" असं अर्जुनच तिच्याकडे लक्ष गेल्यावर तो बोलला. 
"अरे इतक्यातच आलीए, काय करतोय तु?" असं तीनं त्याला विचारलं. अर्जुन आपली डायरीकडे बोट दाखवत बोलला, "काही नाही गं, आज डायरी लिहायचा मुडच नाही म्हणुन बसलो होतो. पण तु कसं काय अचानक आलीस?" "अरे अर्जुन, आईची मैत्रिण आलीएं ना घरी, आई बसली तिच्याबरोबर गप्पा मारत, मला तर खुप कंटाळा आला, म्हणुन इकडे निघुन आली." असं स्वराली बोलली. "काय गं, तुला का कंटाळा आला, तु पण त्यांच्याशी थोडंस बोलायचं ना." असं अर्जुन बोलला. "अरे त्या काकु एकदम वेगळ्याच आहे अर्जुन, मला विचारत होत्या तुझं वयं काय, स्वयंपाक वैगेरे येतो का करता ते. असले अनेक प्रश्न विचारुन त्यांनी भंडावुनच टाकलं रे. आई बोलली की त्यांना माझी चित्र दाखवं, मी इतक्या उत्साहानं त्यांना चित्रं दाखवली, पण त्यांना ती उमजलीच नाही रे अर्जुन, हं छान आहेत, बस्स इतक्याच बोलल्या." असं स्वराली त्या काकुंची नक्कल करुन बोलली. अर्जुनला हसु आलं, "हे स्वराली, काही म्हण, मी तर अजुन तुझी पेंटिंग्स बघितली नाहीत, पण तुझी ऍक्टिंग बघुन मला वाटतं अभिनयाचे धडे तुझ्याकडुन घ्यावेत." स्वराली जरा लाजली, "छे, काहीतरीच काय अर्जुन, चेष्टा करतोयस माझी, तुझी ड्रामाची प्रॅक्टिस बघितली आहे मी, हे लक्षात नाही वाटतं तुझ्या?" असं स्वराली बोलली. थोड्यावेळ ते दोघं गप्पा मारत बसले.
अर्जुनच्या घरुन स्वराली घरी आली त्यावेळी स्वरालीच्या आईच्या मैत्रिणीनं तिला विचारलं, "काय गं स्वराली, कुठे होतीस? तुझ्याशी गप्पा मारायच्या राहुनच गेल्यात बघं." "काकु, मी अर्जुनकडे गेले होते," असं स्वराली बोलली आणि तिच्या खोलीत निघुन गेली. स्वरालीची आई आणि त्यांची मैत्रिण दोघ्याही पुढच्याच खोलीत बसलेल्या होत्या. "काय गं अश्विनी, हा अर्जुन कोण? आणि सायंकाळची आपली स्वराली का गेली त्याच्याकडे?" असं तीनं स्वरालीच्या आईला विचारलं. स्वरालीच्या आईनंही अर्जुनबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगितलं. अर्जुनबद्दल ऐकल्यावर स्वरालीच्या आईची मैत्रिण बोलली, "अगं अश्विनी, स्वराली वयात आलेली आहे, हे वयं कसं असतं माहिती आहे ना? भले अर्जुन तु म्हणते म्हणुन मानुया की चांगला मुलगा आहे, पण बाकीच्या लोकांच काय? हाताची पाचही बोटं सारखी नसतात असं उगाच म्हणत नाही. स्वराली अजुन किती नादान आहे तुला सांगायची गरज नकोच, राहुलला पण काही प्रॉब्लेम नाही का?" "अगं अलका, तु उगाचचं काहीपण काळजी करतेस बघं, अगं अर्जुनला मी आणि राहुल दोघही लहानपणापासुन ओळखतो. आणि त्याच्याकडुन काही चुकीचं घडेल असं कधीच होणार नाही बघं." असं स्वरालीची आई बोलली. पण तिच्या मैत्रिणीचं काही समाधान झालचं नाही. 
रात्री जेवण झाल्यानंतर स्वरालीच्या आईची मैत्रिण अलका, स्वरालीच्या खोलीत आली. स्वराली तिच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे चित्र काढत होती. "कसलं चित्र काढतेयं स्वराली?" असं स्वरालीनं ऐकलं, तीनं मागे वळुन बघितल्यावर बघितलं की अलका काकु आहेत, घाई-घाईनं तीनं चित्र काढणं थांबवलं. त्यांच असं अचानक येणं तिला आवडलं नव्हतं. "काय गं, काढ ना चित्र, का थांबवलंस? एक काम कर त्या तुझ्या टेडी बेयरच चित्र काढुन दाखवं ना मला." असं त्या स्वरालीला बोलल्या. "मला फक्त निसर्गचित्रच काढायला आवडतात काकु," असं स्वराली बोलली. "का गं, मघा मी तुला विचारलं तु कुठे होतीस, तुला राग तर नाही आला ना?" असं त्या बोलल्या. "नाही हो, त्यात राग येण्यासारखं कुठे काय होतं, मी थोडीच कुठे भटकत होते, शेजारी अर्जुनकडेच गेले होते. आईला माहिती असतं, त्याच्या घरी नाहीतर मैथिलीचं घर सोडुन मी दुसरीकडे कुठेच आई-बाबांशिवाय जात नाही ते." असं स्वराली बोलली. 
"मला भेटवंशील का अर्जुनला?" असं त्यांनी स्वरालीला विचारलं. अर्जुनचा विषय काढताच स्वराली खुष झाली. "हो नक्कीच भेटवील ना त्याला, आत्ताच जायचं का त्याच्या घरी, फक्त नऊच वाजले आहेत, नको उद्या त्याला आपल्या घरीच बोलवुया ना." असं स्वराली त्यांना बोलली, अलका काकुनं मानेनंच संमती दिली. मग स्वराली कितीतरी वेळ अर्जुनबद्दल त्यांना सांगत बसली होती. अलकाकाकु वरवर तिला दाद देत होत्या, पण त्यांच्या मनानं अर्जुनला खलनायक ठरवुन टाकलं होतं. स्वराली दिसायला इतकी सुंदर, गुणी, चांगल्या स्वभावाची एकुलतीएक मुलगी, म्हणुनच अर्जुन मुद्दाम तिच्याशी चांगल वागत असावा असं त्यांना वाटत होतं.  

Saturday, September 8, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१३


                  "अर्जुन ये ये, अरे तुला माहिती आहे का, आज स्वरालीने मला मदत केलीए बरं का स्वयंपाक करण्यासाठी..!" असं स्वरालीची आई अर्जुनला बोलली. "काय गं आई, जेवण झाल्यानंतर सांगायचं ठरलं होतं, तु आत्ताच सांगुन टाकलसं.!" असं स्वराली लाजतच बोलली. "अगं तुम्ही दोघी बोलतच बसणार का? अश्विनी अगं जेवणाची तयारी कर पटकन," असं स्वरालीच्या बाबांनी स्वरालीच्या आईला सांगितलं. "अरे अर्जुन, तुझ्या मामांचा फोन आला होता थोड्यावेळापुर्वी, अरे उद्या आपल्याला डॉक्टरांकडे परत एकदा फॉलोअपला जायचं आहे बरं का, तुझ्या मामांना कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे, म्हणुन त्यांनी मला सांगितलं. उद्या जाऊ आपण सकाळी साडेनऊ वाजता, तिथुन मग मी तुला कॉलेजला ड्रॉप करेल, आणि तसाच ऑफिसला जाईल." असं स्वरालीच्या बाबांनी अर्जुनला सांगितलं. तोपर्यंत स्वराली आणि तिच्या आईनं डायनिंग टेबलवर सगळी तयारी करुन ठेवली. "अर्जुन लाजु नकोस बरं का," असं स्वराली मुद्दाम बोलली. अर्जुन नुसताच तिच्याकडे बघुन हसला. "अरे, खरचं बोलतेयं ती, आपलं स्वतःच पुर्ण नाव सांगायला, आणि जेवण करायला कधीच लाजु नये बेटा. समोरच्याला स्वतःचं नाव सांगितलं नाही तर त्याला आपली ओळख कशी होणार आणि जेवतांना लाजलं की  मग उपाशीच राहावं लागतं नाही का..!" असं स्वरालीचे बाबा हसतच बोलले. 
     "काकु, स्वयंपाक खरचं खुप छान झाला होता, अगदी आईच्या जेवणाची आठवण झाली." असं अर्जुन स्वरालीच्या आईला जेवण झाल्यानंतर बोलला. "अर्जुन, मला खुप बरं वाटलं, पण हो, नुसतच माझं कौतुक केलं, तर स्वराली रुसेल बरं का, आज तीने मला छान मदत केली," असं स्वरालीच्या आईनं आपल्या लेकीच्या डोक्यावरुन मायेन हात फिरवत अर्जुनला सांगितलं. "स्वराली तुम्हाला स्वयंपाकात मदत करते नक्कीच कौतुकाचीच गोष्ट आहे, नाहितर आजच्या मुलींनी या वयात स्वयंपाक करणं म्हणजे दुर्मिळच होत चाललेलं दिसतयं." असं अर्जुन स्वरालीकडे बघुन बोलला. थोड्यावेळ गप्पा मारल्यानंतर अर्जुन घरी आला. त्यानं त्याची डायरी लिहिण्यासाठी घेतली. या वर्षी त्याच्या डायरी लिहिण्यात सातत्य राहिलं नव्हतं. त्या डायरीच्या कोर्‍यापानांकडे बघुन त्याच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. त्याच्या डोळ्यातुन अश्रुंचे दोन थेंब त्या कोर्‍या पानांवर पडले. त्यानं पेन उचलला, आणि डायरी लिहिण्यास सुरुवात केली. 
         "आज ५ फेब्रुवारी, जिवनचक्राच्या समुद्रात माझ्या नावेला, कोणत्या वादळात अडकवलयं कोण जाणे? आजवर फक्त दुखःच्या असंख्य लाटांचे तडाखे झेललेल्या या नावेला कधी सुखाचा किनारा मिळेल का? हे नवं वर्ष खरचं खुप वादळी ठरलयं. वर्षाच्या सुरुवातीस देवीसमान असलेल्या स्वरालीच्या आजीचं निधन झालं, आणि माझ्या एका चुकीमुळे किती मोठा अनर्थ घडला. ज्याच्या त्याचा मृत्यु ठरलेलाच असतो असं म्हणतात, मग प्रत्येकाच्या मृत्युला कुणीतरी कारणीभुत ठरलेला असायलाच हवा नाही का? हर्षितला वाचवतांना, तो किती याचनेनं बोलला, "अर्जुन मला मरायचं नाहिए रे..!" त्याच्या डोळ्यात बघुन मला आईची आठवण झाली. "भाऊ, मला काही करुन वाचवा हो, माझ्या अर्जुनसाठी, माझं लेकरु घरीच राहिलयं," असं मरणापुर्वी आई बोलली होती, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. सोहमचं निचपत असलेलं शरीर जेव्हा पाण्यातनं बाहेर काढलं, एकवेळ खरचं मला डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता, की तो मेलायं, त्याचं शरीर उचलुन आणतांना शरीराला जेवढं कष्ट झालं नसेल, त्याच्या कैक पटींनी जास्त यातना मनाला होत होत्या. 
          नव्या जन्मासारखी सुंदर आणि सुखकारक गोष्ट कुठलीच नसते, त्याच प्रमाणे मृत्यु सारखं भयावह आणि दुखःकारी काहीच नसतं हेच आयुष्याच सार आहे. असं मला त्या ऑपरेशन थिएटरकडे नेतांना जाणवलं. वादळात फसलेलं जहाज बुडायला टेकावं, आणि तोच वादळ शांत व्हावं, अगदी तसचं झालं. डॉक्टर म्हणतात, माझ्या शरीरानं माझी साथ दिली, पण त्यापेक्षा माझ्या मनाला जगायचं होतं, हर्षितप्रमाणेच माझं मनही मला सांगत होतं, "अर्जुन मला अजुन मरायचं नाहिए..! मृत्युशी मैत्री अजुन करायची नाहिए, अर्जुन तुला जगायचं आहे. या वादळातनं मला बाहेर पडायचंय, आयुष्याच्या नौकेला किनारा मिळवायचा राहिलायं..!" 
          बेशुद्ध होण्यापुर्वी माझ्या तोंडुन स्वरालीचं नाव बाहेर पडलं, नकळतच नव्हतं ते, माझ्या आयुष्यातील तर जे अखेरचे क्षण असते तर खरंच त्याक्षणी ती मला जवळ हवी होती, तिच्यामुळेच जगायची एक प्रबळ इच्छाशक्ती तयार झालीए, खरचं स्वतःच्या नशिबावर विश्वास कसा ठेवु तेच कळत नाही? मी शुद्धीत येईपर्यंत तीनं अन्न-पाण्याला स्पर्श केला नव्हता, माझं ऑपरेशन झालं ती अख्खी रात्र स्वरालीनं माझ्यासाठी प्रार्थना केली, का करते ती माझी इतकी काळजी? का वाटतं मला ती नेहमी माझ्यासोबत असावी? याप्रश्नाच उत्तर मला शोधायलाच हवं. "अर्जुन तु लवकर बरा हो" असं म्हणतांना तिने माझा हात पकडला, तीन तो कधीच सोडु नये असं वाटत होतं.
           रात्रीचे साडे अकरा वाजले असतील, अर्जुनच्या घराची डोअरबेल वाजली, अर्जुन गडबडीनं उठला, दरवाजा उघडुन बघतो तर समोर हर्षित उभा होता. "अर्जुन मला झोपु दे रे इथे, खुप अस्वस्थ वाटतयं रे, सारखं त्या दिवशी घडलं ते आठवतयं," असं म्हणुन हर्षित रडु लागला. अर्जुनने त्याला घरात घेतलं. अर्जुन काहीच बोलला नाही. "जमलं तर माफ कर यार मला," असं म्हणतच हर्षित झोपी गेला. सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन लवकर उठला. स्वरालीची आजपासुन बारावीची परिक्षा सुरु होणार होती, हे त्याला माहिती होतं. सकाळी सकाळीच तो हनुमान मंदिरात जाऊन तिच्यासाठी प्रार्थना करुन आला. हर्षित तोपर्यंत तयार झाला होता. हर्षित त्याला काही बोलणार हे लक्षात येताच, अर्जुनने त्याला नजरेनंच खुणवलं. त्याला प्रसाद दिला, आणि मग हर्षित तिथुन गुपचुप निघुन गेला. जातांनाही त्याच्या डोळ्यात आसवं होती. "कसं समजवावं याला, असं बघवत नाही याला," असं अर्जुन स्वगतच बोलला. दरम्यान त्याला बाहेर मैथिलीचा आवाज ऐकु आला, अर्जुन घाई-घाईनं घरा बाहेर आला. मैथिली स्वरालीला घेण्यासाठी आली होती, त्या दोघींचे नंबर एकाच केंद्रात आले होते.
              "हे स्वराली-मैथिली, ऑल दि बेस्ट, आज तुमचा पहिला पेपर आहे ना..!" असं अर्जुन स्वरालीला बोलला. परिक्षेला जाण्याच्या घाईत असलेल्या स्वराली त्याच्याकडे बघुन हसली, "थॅंक्स अर्जुन..!" असं म्हणत त्या दोघी तिथुन निघुन गेल्या. मग अर्जुन आणि स्वरालीचे बाबा डॉक्टरांकडे फॉलोअप साठी गेले. नंतर स्वरालीच्या बाबांनी अर्जुनला कॉलेजच्या गेटजवळ सोडलं. आज कॉलेजमध्ये प्रवेश करतांना त्याला खुप अवघडल्यासारखं वाटत होतं. नेहमीप्रमाणे तो आज त्याचा ग्रुप असायचा तिकडे गेला. "हाय अर्जुन, जर्नल पुर्ण झालं का?" असं त्याला विचारतांना आपल्या गर्लफ्रेंड कडे हसत बघणारा सोहम आज नव्हता. "माझी फ्रिडम फायटर दिसली का अर्जुन?" असं विचारायला ध्रुव नव्हता. मितालीला बघुन दंड थोपटुन गुड मॉर्निंग करायला नचिकेत नव्हता, शामलीला बघताच करंगळीवर वही फिरवायला शार्दुल कुठे होता. त्याच मन्न खुप उदास झालं. "तब्येत बरी आहे ना अर्जुन?" असं त्याला मितालीनं विचारलं. तिच्याकडे बघुन त्याने नुसतीच मान डोलावली. अर्जुन काहीतरी बोलेल असं तिला वाटलं पण तिचा हिरमुड झाला. दोन मिनिटं ती त्याच्याकडे बघत होती. अर्जुनच्या डोक्यात विचारांच काहुर उठलं होतं, त्याचं मितालीकडे अजिबात लक्ष नव्हतं. 
              थोड्यावेळानं तिथे रितेश आणि तेजाली येऊन पोहचले. "अरे हर्षितला बघितलं का कोणी?" असं रितेश बोलला. रितेश च्या वाक्यानं अर्जुनचं लक्ष वेधलं. "अरे काय झालं?" असं त्यानं विचारलं. "अरे त्याच्या घरुन फोन आला होता, सकाळी तो तुझ्या घरुन त्याच्या घरी गेला, त्यावेळी घरात शिरल्यावर त्याने एका एक त्याच्या कविता, नाटकं, त्याने लिहिलेले लेख फाडुन टाकले. त्याच्या आईला काही कळायच्या आत, त्यानं ते सगळे तुकडे पेटवुन दिले. रडतच कॉलेजला येण्याची तयारी केली, आणि घराबाहेर पडला, असं त्याच्या बाबांनी सांगितलयं" रितेश असं बोलला. अर्जुनच्या काळजात एकदम धस्स झालं, "हा हर्षितपण ना.." असं म्हणत तो तिथुन त्याला शोधायला निघाला. सगळ्या कॉलेजमध्ये त्यानं हर्षितला शोधलं, पण तो कॉलेजमध्ये नव्हता. अर्जुनच्या डोक्यात नको-नको ते विचार यायला लागले. कॉलेज सुरु झाल्याची बेल झाली, नाईलाजानं त्याला प्रॅक्टिकलला जावं लागलं. त्याच्या मनात हर्षितचा विचार सुरु होता. दुपारी लंच ब्रेकमध्येही त्याने त्याच्या घरी फोन करुन तो घरी आला आहे का ते विचारलं, पण हर्षित घरीच आला नव्हता. सायंकाळी तो हर्षितच्या घरी आला.
               "काकु आला का हर्षित घरी?" असं दारातच हर्षितची वाट बघत असलेल्या त्याच्या आईला अर्जुनने विचारलं. अर्जुनला बघताच त्याच्या आईचा कंठ दाटुन आला, "नाही रे, सकाळचा कुठे गेलायं काही पत्ता नाही, घरी आला तसा त्याच्या रुममधुन त्याच्या कवितांच्या वह्या, त्यानं लिहिलेले नाटकं, आणि बरच काही त्यानं फाडायला सुरु केलं, त्याला मी विचारतच होते तोपर्यंत त्यानं त्या फाडलेल्या पानांना काडी लावली. रडत रडत कॉलेजला जायला बाहेर पडला. एकशब्द बोलला नाही माझ्याशी.." असं म्हणत हर्षितच्या आईला अश्रुंना रोखनं अनावर झालं. त्यांना धीर कसा द्यावा हे अर्जुनला सुचेनास झालं. "काका कुठे गेलेत?" असं त्यानं त्यांना विचारलं. "पोलिस स्टेशनला पाठवलयं मी त्यांना, हर्षितला शोधायला मदत होईल म्हणुन." असं हर्षितची आई बोलली. अर्जुनही मग हर्षित कुठे कुठे जाऊ शकतो याचा विचार करु लागला. सुमारे पाऊन तासांनी हर्षित, त्याचे वडिल, आणि दोन पोलिस समोरुन येतांना दिसले. 
         "जीव द्यायला गेला होता गं," असं म्हणत हर्षितचे बाबा रडु लागले. "याचे चार मित्र जिथुन बुडाले तिथंच गेला होता हा, पाण्यात उडी मारली, पण नेमकं तिथल्या एका शेतकर्‍याला दिसलं, त्यानंच याला वाचवलं आणि त्यानं आम्हा पोलिसांना फोन लावला. नेमके जोशीसाहेब हर्षितसाठी तिथे आले होतो. फोनवरुन आम्ही त्याला हर्षितच वर्णन सांगितलं, "हो साहेब, तुम्ही या, तोपर्यंत याला ठेवतो इथं, असं त्यानं सांगितलं," आम्ही तिथे जाऊन याला घेऊन आलो." असं एक हवलदार बोलला. हर्षितची आई ताडकन उठली, पळतच हर्षित जवळ गेली. हर्षित खाली मान घालुन उभा होता. त्याच्या आईनं एक जोरदार चपराक त्याला लगावली, तसा तो जमिनीवर पडला. "नवस बोलुन तुला यासाठी जन्माला घातला होता का रे हर्षित? स्वतःचा जीव द्यायला निघाला, आम्हा दोघा आई-बापाचा विचारही तुझ्या डोक्यात डोकावला नाही का रे? या अर्जुनने स्वतःचा जीव धोक्यात घालुन तुला वाचवलं, त्या लेकराचाही तु विचार केला नाही का रे? काय चुक झाली रे आमची हर्षित? असं म्हणत त्याची आई समोर असलेल्या तुळशी वृंदावर डोक आपटायला लागली. त्याच्या बाबांनी धावत जाऊन त्याच्या आईला पकडलं, "तुला मरायची इतकी हौस आली होती तर, पहिले आम्हाला मारुन टाकलं असतं रे लेकरा," असं म्हणुन त्याच्या बाबांनी टाहो फोडला. 
            हर्षित तसाच जमिनीवर पडुन रडत होता. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्याजवळ जाऊन तो बोलला, "का हर्ष्या, कशासाठी असलं माथेफिरु काम करायला गेला?" "मला जगायचीच इच्छा राहिली नाही रे अर्जुन, सारखं त्यादिवसाचं चित्र माझ्याडोळ्यासमोर उभं राहतयं. मला तर वेड लागायची पाळी आली आहे असंच वाटतयं बघं?" असं हर्षित बोलला. "जे झालं ते जाऊ दे, एक वाईट स्वप्न म्हणुन बघ त्याच्याकडे, आणि तुझा जीव दिल्यानं कुठे आपले जीवाभावाचे मित्र परत येणार आहेत का? हर्षित माझी शप्पथ आहे तुला, परत जर असं काही करायचा विचार जरी मनात आणशील तर बघं, जा तुझ्या आई-बाबांची माफी माग." असं म्हणत अर्जुनने हर्षितला उठवलं. हर्षित त्याच्या आई-बाबांजवळ गेला, त्यांच्या पायावर डोक ठेवुन त्यांन त्यांची माफी मागितली, आणि पुन्हा असं काही करणार नाही याचं वचन दिलं. हर्षितला त्यांनी आपल्याजवळ घेतलं, आई-वडिलांनी पण त्याला माफ केलं. थोड्यावेळानं पोलिसही तिथुन निघुन गेले, अर्जुनने हर्षितला परत समजवलं आणि तो आपल्या घराकडे जाउ लागला.
         घराकडे जातांना अर्जुनच्या डोक्यात हर्षितचाच विचार सुरु होता. "का हर्षितला जगायची इच्छा वाटत नाहिए? जेव्हा मी त्याला पाण्यातुन बुडतांना वाचवत होता, तेव्हा जिवाच्या आकांतानं तो मला म्हणत होता की त्याला मरायचं नाही, मग असं अचानक का त्याला वाटतयं? का झाल्या प्रकराला तो स्वतःला दोषी मानतोय? हर्ष्या खरचं असं काही करु नको यार, आधीच मी चार जीवाभावाचे मित्र गमवुन बसलोय रे, आणि तुच जर असं काही केलं तर कसं चालेल रे, मला मोठ्या भावासारखा मानतोस तु, एकदा तुझ्या मोठ्या भावाचं म्हणन ऐकुन घे रे." असं अर्जुन रस्त्यानं जातांना मनात बोलत होता. घरी आला तेव्हा अंगणातच स्वराली उभी होती. "हे अर्जुन, आजचा पेपर एकदम सोप्पा गेला रे, तु जे जे सांगितलं होतं ना त्यातलं जवळ-जवळ ८०% तसचं होतं, प्रश्नपत्रिका हातात पडली आणि मी इतकी खुष झाले ना, थॅंक्स अर्जुन..!" असं ती अर्जुनला बोलली. 
          स्वरालीला बघताच अर्जुनच्या डोक्यात चाललेलं विचारांच मंथन थांबल. अलगद त्याच्या चेहर्‍यावर हसु उमटलं. "अरे वा, चला तुझ्या परिक्षेची सुरुवात तर चांगली झाली म्हणायची तर, किती मार्क्सचा अटेम्प्ट केलास? आणि मैथिलीला कसा गेला पेपर?" असं अर्जुनने तिला विचारलं. "अरे फुल्ल ८० मार्क्सचा अटेम्प्ट केला, आणि वेळ होता म्हणुन सेक्शन टु चे दोन प्रश्न एक्स्ट्रा सोडवलेत, मैथिलीला तसा पेपर बरा गेला, तिला सेक्शन वन जरा टफ गेला रे, म्हणुन ती जराशी उदास होती." असं स्वराली त्याला बोलली. थोडावेळ ते तिथेच अंगणात गप्पा मारत बसले, "अरे अर्जुन चल मी निघते आता, आई बरोबर जायचं मला बसस्टॅंडवर, आईची बालमैत्रिण येणार आहे आज आमच्या घरी." असं स्वराली बोलली, आणि ती तिथुन निघुन गेली. 
               अर्जुन घरात आला, सायंकाळचे सात वाजले असतील, त्यानं आई-वडीलांच्या, आणि हनुमानाच्या मुर्तीपुढे दिवा लावला, आरती करुन मग तो अभ्यासाला बसणार तोच रितेश, तेजाली आणि लावण्या तिथे येऊन पोहचले. "अरे अर्जुन, तु गेला होतास ना हर्षितच्या घरी, काय झालं? हर्षित आला का घरी?" असं रितेशनं विचारलं. अर्जुनने मग झाला प्रकार थोडक्यात सांगितला. लावण्याला बघुन त्याला आश्चर्य वाटलं. "अगं लावण्या तु कशी काय यांच्या सोबत?" असं हर्षितने तिला विचारलं. "अरे अर्जुन मला दुपारी समजलं हर्षितबद्दल, मला तर खुप काळजी वाटत होती रे, पण कुणाला सांगावं म्हणुन गप्पच बसले. सायंकाळी रहावलं नाही म्हणुन तेजालीला सांगितलं, आणि मग आम्ही इथे आलो," असं लावण्या बोलली. "हर्षितला नक्की काय झालयं ते मलाच नक्की उमजलं नाहिये गं, पण एक गोष्ट विचारु का लावण्या तुला, तुला राग तर नाही ना येणार ?" असं अर्जुन तिला बोलला. "हो विचारना, त्यात कसला राग येणार?" असं लावण्या बोलली. "जाऊदे, नंतर सांगेन, आत्ता ती वेळ पण नाहिये," असं म्हणुन अर्जुन गप्प बसला. थोडावेळ मग कुणीच काही बोललं नाही. "तेजाली, रितेश आपण जायचं का हर्षितच्या घरी?" असं लिलीनं विचारलं. "आत्ता नका जाउ तुम्ही." असं अर्जुन बोलला. नंतर ते तिघेही अर्जुनच्या घरुन निघाले.

Wednesday, August 8, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१२

      सकाळी स्वरालीचे बाबा, स्वराली आणि तिची मैत्रिणी मैथिली तिघही अर्जुनला भेटायला गेले. अर्जुन त्यावेळी जागाच होता. स्वरालीला बघताच त्याचा चेहरा आनंदानं फुलला. स्वरालीच्या बाबांनी डॉक्टरांशी भेट घेऊन अर्जुनच्या तब्येतीविषयी विचारपुस केली. त्याच्या मामांना त्यांनी घरी जायला लावलं, ते घरुन जाऊन येईपर्यंत स्वराली आणि तिचे बाबा तिथेच थांबणार होते. स्वराली आणि मैथिलीनं अर्जुनसाठी खुप छान फुलं आणली होती. त्या दोघी थोडा वेळ तिथेच होत्या, मग नर्सने त्यांना आय.सी.यु. मधुन बाहेर जायला लावलं. बाहेर आल्यावर मैथिली स्वरालीला हे नक्की घडलं कसं हे विचारु लागली. स्वरालीला जेवढं माहिती होतं तितकं तीने तिला सांगितलं. थोड्यावेळानं ज्या ट्रक ड्राईव्हरने अर्जुन आणि त्याच्या मित्रांना हॉस्पिटल पर्यंत पोहचवलं होतं, तो तिथे आला होता अर्जुनला भेटायला. "कसा आहे अर्जुन?" असं त्यानं डॉक्टरांना विचारलं. नंतर त्यानं त्यादिवशी आपण रागाच्या भरात त्यांना अपशब्द वापरले म्हणुन माफी पण मागितली. डॉक्टरांनी देखील त्याला मोठयामनानं माफ केलं. अर्जुनच्या तब्येतीत आता सुधार होत होता. दरम्यान गावचे सरपंच त्याला भेटण्यासाठी आले. त्यांनी त्याच्या साहसाचं कौतुक करतांना यंदाचा ग्रामपंचायतीकडुन दिला जाणारा विशेष शौर्य पुरस्कार त्याला देण्याचं ठरवलं. अर्जुनची तब्येत बरी झाल्यानंतर तो पुरस्कार प्रदान करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तसेच रक्तदान शिबिराचही आयोजन करण्यात आलं होतं.
                दहा दिवस अर्जुन हॉस्पिटल मध्येच ऍडमिट होता, त्याच्या प्रकृतीत पुर्ण सुधारणा झाल्यानंतर त्यांनी अर्जुनला डिस्चार्ज दिला. तोपर्यंत रोज स्वराली नित्यनियमानं त्याला भेटायला यायची. हर्षित आणि रितेशदेखील त्याला भेटण्यासाठी येत असत, पण स्वरालीला जेव्हा कळलं की अर्जुनने ज्यावेळी हर्षितला वाचवलं, त्यानंतर हर्षित बसुनच राहिला होता, अर्जुनची त्यानं मदत केली नव्हती, त्यामुळे स्वरालीला हर्षितचा राग यायला लागला. बुद्धीबळात आपल्याच प्याद्यांमुळं राजा अडचणीत सापडावा, असंच अर्जुनच्या अवस्थेचं तिला वाटलं. त्यामुळे ती कटाक्षानं हर्षितशी बोलणं टाळत असायची. अर्जुनला त्याच्या बहादुरीबद्दल पुरस्कार त्याच्या कॉलेजमध्ये प्रदान करण्याचं ठरलं होतं. दुपारी चार वाजता कॉलेजचा सभागृह मुलांनी, गावतील प्रतिष्ठित व्यक्तींनी, पालकांनी भरुन गेला होता. स्वराली तिचा पेपर झाल्यावर आई-बाबांसोबत तिथे आली होती. खानसरांनी स्वरालीला ओळखलं, त्यांनी तिला आणि तिच्या आई-बाबांना स्टेजच्या समोरच असलेल्या पहिल्या रांगेतच बसण्याची व्य्वस्था केली. सव्वाचारच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली. प्राचार्यांनी आपलं मनोगत मांडलं, आपल्या मनोगतात त्यांनी अर्जुनचं कौतुकही केलं तसेच त्याच्या चार मित्रांना श्रद्धांजली पण दिली. नंतर सरपंचांच्या हस्ते अर्जुनला पुरस्कार देण्याची विनंती सुत्रसंचालकांनी केली. "एक मिनिट थांबा सर, मला पहिले काही बोलायचं आहे," असं म्हणत अर्जुन व्यासपीठावर असलेल्या माईककडे जातांना बोलला.
                "आपल्याला मला एक गोष्ट सांगायची आहे, मी हा विषेश शौर्य पुरस्कार स्विकारण्यास मी अजिबात पात्र नाहीए, ज्या मित्रांचे जीव वाचवण्यासाठी मला हा पुरस्कार दिला जातोय, आणि ज्या मित्रांना मी वाचवु शकलो नाही त्या माझ्या मित्रांना मीच तो धबधबा दाखवला होता. डॅम बघायला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी तिथल्या शिपायानं कटाक्षानं आम्हाला मनाई केली असतांनाही आम्ही दुसर्‍या रस्त्यानं तिथे गेलो. जातांना एका वडिलधार्‍या शेतकर्‍यानंही आम्हाला सावध केलं होतं, पण त्याकडे दुर्लक्ष झालं, अगदी विनाशकाले विपरीत बुद्धी अशीच अवस्था झाली. सुमारे दिड तास त्या शांत वाटणार्‍या पाण्यानं जेव्हा विक्राळ रुप धारण केलं त्यावेळी आमच्या काळजाचा ठोका चुकला. माझ्याशिवाय कुणालाच पोहता येतं नव्हतं, आणि म्हणुनच मी त्यांना वाचवलं, मी जर तो धबधबा त्यांना दाखवला नसता तर आज हा बिकट प्रसंग ओढावलाच नसता. माझ्या चारही मित्रांच्या मृत्युला मीच जबाबदार आहे, आणि त्यामुळेच मी हा पुरस्कार स्विकारु शकत नाही." असं म्हणत अर्जुनचे डोळे भरुन आले. उपस्थितांचही मन हेलावुन गेलं. मग स्वतः सरपंच उठले, त्यांनी अर्जुनला सावरलं.
          "जे झालं ते नियतीला मंजुर होतं, त्यात तुझी चुक नव्हती मुला, आपला जन्म कोणत्या रुपात असावा, केव्हा व्हावा, हे जसं आपल्या हातात नसतं, त्याच प्रमाणं मृत्यचंही आहे. कोणत्या क्षणी, कोणत्या रुपात मृत्यला अलिंगन द्यावं लागेल हे सांगता येत नाही. शेवटी जन्म होणं हे जर सत्य असेल, तर जन्माला आलेला प्रत्येक जण एकदिवशी मरणार हे अटळ सत्यच आहे ना. तु दाखवलेल्या असिम बहादुरी, प्रसंगावधाना मुळेच तुला हा पुरस्कार हा देण्यात येतोय अर्जुन." असं सरपंच बोलले. "तु खरचं त्या पुरस्काराच्या लायक आहेस रे अर्जुन.." असं खाली बसलेला हर्षित व्यासपीठाकडे येतांना बोलला. त्याच्या डोळ्यातनं अश्रु वाहत होते, तरी त्यानं सगळ्यांना त्या दिवशी अर्जुनने कसं त्याचे आणि रितेशचे प्राण वाचवले, खुप दुरुन वाहत चाललेल्या सोहमचं शव आपल्या खांद्यावर उचलुन आणलं, रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता भरधाव वेगानं येतं असलेल्या ट्रक समोर आडवं झोपुन मदत आणली, हे सगळं हर्षितनं सांगितलं. उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा अश्रुंनी पाणवल्या. रितेशही मग व्यासपीठावर आला, त्यानं आणि हर्षितनं तो पुरस्कार त्यांच्या हातांनी अर्जुनला दिला. 
  "आमच्या आयुष्यात आलेला हा सगळ्यात कठीण प्रसंग होता, जमलं असतं तर अर्जुनला एकट्याला सुखरुप राहता आलं असतं, पण त्यानं तसं न करता आमचे जीव वाचवले. मैत्रीचा खर्‍या अर्थ त्याने त्याच्या कृतीतुन दाखवुन दिला. एकवेळ सख्खा भाऊ असता तरी त्या भावाने वेगानं वाहणार्‍या पाण्यात उडी मारण्याआधी एकवेळ विचार केला असता, पण अर्जुनच्या मनात हा विचार सुद्धा आला नसेल. प्रवाहाविरुद्ध पोहत जाऊन त्यानं जेव्हा सोहमला पकडलं असेल, त्याला तिथंच समजलं असावं की तो मेला आहे, पण तरी त्याचं शरीर त्यानं जिद्दीनं काठापर्यंत आणलं, देव कोणत्या रुपात दर्शन देतो, असं मला विचाराल तर मी क्षणाचाही विलंब न लावता या माझ्या मित्राकडे बोट दाखवेलं," असं म्हणत रितेशनं अर्जुनला मिठी मारली. 
  मग प्राचार्यांनी, सरपंचांना विनंती केली, "सरपंच साहेब, एक प्राचार्य म्हणुन नाही, तर एक पालक म्हणुन मला सांगावंस वाटतं की धरणाचे पाणी जेव्हा सोडण्यात येईल त्याच्या निदान दहा मिनिट पुर्वी तशी सुचना करणारा अलार्म तिथं बसवण्यात यावा. आपल्या गावातल्या रक्तपेढीचं सक्षमीकरणं करावं, त्यासाठी रक्तदानचं महत्व गावकर्‍यांना पटवुन द्यावं, म्हणजे भविष्यात चुकुन असा दुर्देवी प्रसंग घडणार नाही, आणि घडलाच तर यावेळी आज अर्जुनला जशी रक्ताची वाट बघावी लागली, तशी वाट बघावी लागणार नाही. आपलं हे पाऊल या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माझ्या चारही विध्यार्थ्यांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल." सरपंचानी देखील प्राचार्यांची विनंती मान्य केली. नंतर अर्जुनला मदत करणार्‍या ट्रक ड्राईव्हरचा, अर्जुनला विपरीत परिस्थितीतही वाचवणार्‍या डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सोहम, नचिकेत, ध्रुव आणि शार्दुलला दोन मिनिट मौन ठेवुन श्रद्धांजली देवुन झाली.
               कार्यक्रम झाल्यानंतर स्वराली अर्जुनला भेटली, "खरचं अर्जुन तु खुप ग्रेट आहेस," असं ती बोलली. हर्षितनही प्रामाणिकपणे जे घडलं ते सर्वांसमोर सांगितल्यामुळे तिला बरं वाटलं होतं. सायंकाळी अर्जुन घरी आला, स्वरालीही त्याच्याबरोबर होती. अर्जुन थोडावेळ काहीच बोलला नाही, आणि नंतर तो रडु लागला. "देवानं नेहमी माझ्यासोबत असं का करावं गं? लहानवयात माझं कुटुंब माझ्यापासुन हिरावुन घेतलं, त्यातुन सावरण्यासाठी मला चांगले मित्र दिलेत, पण माझ्यामुळेच त्यांच्यावर जीव गमवायची वेळ आलीए, स्वराली..! माझा ज्यांच्यावर जीव जडतो, विधाता लगेच त्यांना माझ्यापासुन असं का गं दुर करतो, आयुष्याला गरजेचं असणारं पाणी असं विसंगत का वागतं गं, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याला बुडवतं, आणि मेलेल्या प्रेतांना तरंगत ठेवतं? कधी कधी तर मला वाटतं." असं म्हणत त्यानं स्वरालीचा हात पकडला. त्याच्या डोळ्यातील अश्रु तिच्या नाजुक हातांवर एकसारखे पडत होते. "अर्जुन असं काहीच घडणार नाही रे, तु रडु नकोस रे, तुला असं रडतांना नाही बघवत रे माझ्याकडुन, मला पण रडायला येतं," असं म्हणत स्वरालीनं त्याच्या डोळ्यांतले अश्रु पुसले. थोडावेळ ती तिथेच थांबली, "जेवायला ये रात्री घरी.." असं सांगुन ती बाहेर पडतच होती तोच अर्जुन बोलला, "अन्नावरची इच्छाच मेलीए गं.." "मला काही कारण नको सांगु, तु रात्री जेवायला यायचं म्हणजे नक्की यायचं. तु जोपर्यंत येणार नाहीस तोपर्यंत मी पण जेवणार नाही." असं म्हणत स्वराली निघुन गेली.
अर्जुन थोडावेळ तसाच उभा राहिला, मनात चाललेल्या विचारांच्या वादळातुन त्याला बाहेर पडता येत नव्हतं, कोणीतरी खुप उंचावरुन त्याला ढकलुन दिलयं, आणि अजुनही त्याचं शरीर खाली कोसळलं नाहीए, आकाशातुन पडणार्‍या उल्केला असलेल्या वेगाप्रमाणं आपण खाली येतोयं असं त्याला वाटतं होतं. या विचाराच्या तंद्रीत असतांना त्याला चक्कर आली, आणि तो खाली पडला. कितीतरी वेळ तो तसाच पडुन राहिला. रात्री साडे आठच्या सुमारास, "अरे अर्जुन, काय झालं तुला? अर्जुन..अर्जुन.." अशा स्वरालीच्या हाकेनं तो जागा झाला. "स्वराली, खुप थकल्यासारखं वाटतयं गं." असं अर्जुन स्वतःला सावरत बोलला. "थकवा जाणवरणारच ना अर्जुन, आज सकाळी किती दगदग झाली तुझी, चल जेवण करायला, आई-बाबापण वाट बघतायं तुझी. जेवण केलं की तुझा थकवापण दुर होऊन जाईल." असं स्वराली त्याला बोलली. मग ते दोघही तिच्याघरी गेले.

Tuesday, July 31, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.११

              "माझं रक्त घ्या," असं म्हणत ड्राईव्हर पुढे आला, "तुमचा पण तोच ब्लड ग्रुप आहे का?" असं तीनं विचारलं, "ठाउक नाही, पण मनं सांगतयं की त्याला रक्त द्याव," असं तो म्हंटला. नर्स घाईनं त्याला आत घेऊन गेली, सुदैवानं त्याच्या ब्लड ग्रुप तोच निघाला, "तुमचा ब्लड ग्रुप मॅच झालायं, तुम्हाला काही आजार वैगेरे, तुम्ही दारु वैगेरे पितात का?" असं त्या नर्सने विचारताचं ड्राईव्हर कपाळाला हात लावुन खाली बसला. "आई जगदंबे, काय ह्या लेकराच्या नशीबाची थट्टा केलीस तु, व्हय मी दारु पितो सिस्टर." असं तो खिन्न होऊन बोलला. "सॉरी, तुमचं रक्त नाही चालणार त्याला." असं सिस्टर त्याला बोलल्यावर तो डोळ्यातल्या आसवांनिशी तसाच बाहेर आला. गावातल्या रक्तपेढीत ए.बी. निगेटीव्ह ब्लड ग्रुपचा काहीच साठा नव्हता, तालुक्याच्या ठिकाणी तो उपलब्ध होता, पण तिथुन येण्यासाठी सुमारे अर्धा तास लागणार होता. 
पोहतांना काचेचा एक छोटा तुकडा अर्जुनच्या तोंडातुन पोटात गेला, धावपळीमुळे त्याला इंटरनल ब्लिडींग झालं होतं, अर्जुनला आता वेळेवर रक्त मिळण्याची नितांत गरज होती. "त्याच्या मामांना फोन लावा इंन्सपेक्टर," असं हर्षित बोलला. थोड्यावेळानं त्याचे मामा मामी तिथं येऊन पोहचले. त्याच्या मामी तर धाय मोकलुन रडायला लागली. त्याच्या मामाचा ब्लड ग्रुपही वेगळाच होता. तालुक्याच्या ठिकाणाहुन रक्तपेढीतुन रक्त येण्यासाठी सुमारे अजुन वेळ होता. डॉक्टर निलेश छाजेड यांनी शर्थीचे प्रयत्न करुन सगळ्या जखमांतुन होणारं ब्लिडींग थांबवण्यात यश मिळवलं, पणं त्याला आता रक्ताची जास्त गरज होती. बाहेरचे सगळे देवाचा धावा करत होते. पोलिसांच्या पथकानं तोपर्यंत नचिकेत आणि शार्दुलचे मृतदेह आणले, पण ध्रुवचा मृतदेह अपुर्‍या प्रकाशामुळं शोधता आला नाही, पुन्हा एकदा सगळीकडे त्यांच्या पालकांच्या रडण्याने वातावरण शोकसागरात बुडालं. थोड्यावेळानं एक नर्स बाहेर आली, "अर्जुन कसा आहे?" असं त्याच्या मामानं विचारलं. "ऑपरेशन सुरु आहे अजुन, ब्लिडींग खुप झालयं, आत्ताच काही सांगता येणार नाही, असं तीने ऑपरेशन थिएटरमध्ये पुन्हा प्रवेश करतांना सांगितलं, आणि मग त्यांच्या दुखःला पारावार राहिला नाही. त्यांना धीर तरी कसा द्यावा हे कुणालाच सुचत नव्हतं. थोडयावेळानं रक्ताच्या पिशव्या घेऊन रक्तपेढीची गाडी तिथं आली. डॉक्टर छाजेड यांनी आपलं सगळ कसब पणाला लावुन अर्जुनचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. "तुमच्यापैकी स्वराली कोण आहे? बेशुद्ध होण्याच्या पुर्वी त्याच्या तोंडुन तिचं नावं आलं होतं." असं ऑपरेशन करुन बाहेर आलेले डॉक्टर निलेश छाजेड बोलले. 
स्वरालीचं नाव ऐकताच हर्षित घाई-घाईनं उठला, त्याने पोलिसांना स्वरालीचे बाबा जिथे काम करायचे त्या कंपनीचं नाव सांगितलं, मग त्यांनी तिथुन तिच्या बाबांना फोन करुन सांगितलं. थोड्यावेळानं स्वराली, तिची आई, आणि तिचे बाबा तिघंही तिथे पोहचले. "डॉक्टर मी स्वराली आहे, अर्जुन कुठे आहे, कसा आहे तो?" असं म्हणत स्वराली रडु लागली. "बेटा काळजी करु नकोस, त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालयं, पण आजची रात्र महत्वाची असेल त्याच्यासाठी, त्याला खुप इंटरनल ब्लिडींग झालं, शिवाय रक्तही वेळेवर मिळालं नाही म्हणुन असं झालं, उद्या सकाळीच काय ते सांगता येईल." असं डॉक्टरांनी तिला सांगितलं, "मला त्याला एकदा बघु द्या ना डॉक्टर" असं म्हणत स्वराली रडु लागली. नर्सने बाहेरुनच तिला अर्जुनला दाखवलं. तिच्या डोळ्यांतनं आसवं थांबत नव्हती. तिला आवरणं तिच्या आईलाही कठीण जाऊ लागलं. तिला कसंतरी बाहेर आणल्यावर तीने हर्षितला विचारलं, काय झालं ते? हर्षित आणि रितेशचे प्राण वाचवणारा अर्जुन स्वतः आता मृत्युशी झुंज देतोयं असं जेव्हा तिला कळालं तेव्हा तर ती अजुनच रडु लागली. "गणपती बाप्पा, माझ्या आजीला तुम्ही माझ्यापासुन दुर नेलतं, प्लीज अर्जुनच नका ना तसं करु, त्याला वाचवा बाप्पा," असं म्हणणार्‍या स्वरालीचं दुखः इतरांना बघवलं जात नव्हतं. दरम्यान पोलिसांनी नचिकेत, शार्दुल आणि सोहमचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. 
स्वराली रात्रभर त्या आय.सी.यु.च्या बाहेर बसुन होती. तिची आई सुद्धा तिथं होती. हर्षित, आणि रितेशही तिथंच होते. आपल्यामुळेच अर्जुनवर ही वेळ आली होती, हे त्यांना कळालं होतं, त्यांना स्वतःला स्वतःची लाज वाटु लागली. त्यांना जगणं नकोसं होऊन गेलं. "आई अर्जुनला बघं ना काय झालयं, का गं देवबाप्प्पानं त्याच्या सोबतं असं केलं? इतरांचे प्राण वाचवणार्‍यालाच अशी प्राणांची झुंज देण्याची अग्नीपरिक्षा द्यावी लागतेय? मुसळधार पावसात एका मोठ्या झाडानं आपल्या फांद्यांखाली सर्वांना आसरा द्यावा, आणि नेमकी त्याच झाडावर वीज कोसळावी, असंच झालयं अर्जुनचं.!" असं म्हणत स्वराली रडु लागली. "राहुल." असं तिच्या बाबांना आवाज देत तिच्या आईनं तिला समजवण्याचं खुणवलं. "स्वराली रडु नको गं, बरा होईल तो नक्कीच, डॉक्टर काका करताय ना प्रयत्न, बेटा मला खात्री आहे तो लवकरच बरा होईल बघं." असं म्हणत त्यांनी तिला आपल्या छातीशी धरलं, तिच्या डोक्यावरनं त्यांनी मायेनं हात फिरवला, तिच्या चेहर्‍यावरुन वाहत असलेले अश्रु पुसले. 
सकाळ झाल्यावर डॉक्टर छाजेड प्रसन्नमुखाने बाहेर आले, "आमच्या प्रयत्नांना आणि आपल्या प्रार्थनांना यश आलयं, अर्जुनच्या जीवाचा धोका टळलायं, आज सायंकाळपर्यंत शुद्धीवर येईल तो," असं डॉक्टरांनी सांगितलं. "काही विपरीत तर घडणार नाही ना डॉक्टर?"असं अर्जुनच्या मामानं विचारलं. "नक्कीच नाही, त्याची जगण्याची इच्छा जबरदस्त दिसतेयं. कारण इतक्या प्रमाणात ब्लड लॉस झाल्यानंतर पेशंट वाचेलच याची खात्री नसते, पेशंट कोमातच जाण्याचे ८०% चान्सेस असतात, पण त्याच्या शरीरानं त्याची साथ दिलीए." असं डॉक्टर निलेश छाजेड धीर देत बोलले. "त्याला मोठ्या दवाखान्यात हलवण्याची गरज तर नाही ना?" असं स्वरालीच्या बाबांनी विचारलं. "नाही, तुम्ही काळजी करु नका. तसं काही असतं तर रात्रीच मी तसं पाऊल उचललं असतं. आणि जिल्ह्यातील विख्यात गॅस्ट्रो-इंट्रोलॉजिस्ट डॉ. अष्टेकर येतीलच आज, त्यांना मी रात्रीच फोन करुन बोलावुन घेतलयं." असं डॉक्टर बोलल्यावर त्यांची थोडी चिंता मिटली. 
"स्वराली आज तुझी परिक्षा आहे ना आज?" असं आईनं विचारलं, तीनं होकारार्थी मान हलवली. "मी इथचं थांबणार आई, अर्जुन जवळ." असं ती बोलली. "बेटा, तुझं बारावीचं वर्ष आहे ना, आणि अर्जुनने तुझी किती तयारी करुन घेतली होती, आणि आता तु परिक्षा देणार नाही असं म्हंटल्यावर त्याला किती वाईट वाटेल ना. स्वरा, तुला कळतयं ना मी काय म्हणतेयं ते?" असं आईनं विचारलं, "बेटा, तुझं प्रॅक्टिकल झालं का लगेच आई बरोबर इकडे ये तु." असं बाबा बोलले, मग त्यांच्या सोबत ती घरी निघुन गेली. सकाळी कॉलेजमध्ये ही बातमी समजताच कॉलेजमध्ये शोककळा पसरली. प्राचार्यांनी तीन दिवस सुट्टी दिली, कॉलेजचा स्पोर्ट्स वीक, आणि गॅदरिंग त्यांनी रद्द केलं. आपल्या सगळ्या अध्यापकांसह ते तिथं येऊन पोहचले. दरम्यान प्रमुख वर्तमानपत्रांत ती बातमी छापुन आल्यानं सगळ्या जिल्ह्यात या घटनेची चर्चा होऊ लागली. ज्यानं ज्यानं ती बातमी वाचली होती, मृत्यशी लढा देणार्‍या अर्जुनला बरं करावं यासाठी नकळत मग त्यांचे हाथ देवापुढे प्रार्थनेसाठी जोडले गेले. 
सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांना शेजारच्या गावातील पोलिस स्टेशनमधुन फोन आला, एक शव नदीच्या पाण्यात तरंगत असल्याचं एका गावकर्‍यानं बघितलं, ते नक्कीच ध्रुवचं शव असेल, जे वाहत्या पाण्याबरोबर शेजारच्या गावात वाहतं गेलं असणार, याची पोलिसांना शंका वाटली. त्या शवाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांबरोबर मग हर्षित, आणि ध्रुवचा मोठा भाऊ गेला. तो ध्रुवच होता याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.  स्वराली तिची प्रॅक्टिकलची परिक्षा झाल्यानंतर ती थेट अर्जुनला भेटण्यासाठीच निघाली. वाटेत तिला हनुमानाचं मंदिर दिसलं, अर्जुन हनुमानभक्त होता हे तिला माहिती होतं, ती मंदिराच्या बाहेर थांबली. "हे बजरंगबली, मी मुलगी आहे म्हणुन मंदिरात येतं नाहिए, पण अर्जुन तुमचा भक्त आहे ना, आपल्या भक्ताची रक्षा करा देवा, त्याला लवकर शुद्धीत आणा, हे बजरंगबली कृपा करा त्याच्यावर, इतकी परिक्षा नका बघु त्याची." असं म्हणुन तीनं त्या मुर्तीला बाहेरुनच मनोभावे वंदन केलं, आणि ती हॉप्सिटलमध्ये आली. "डॉक्टर कशी आहे अर्जुनची तब्येत? ते दुसरे डॉक्टर येणार होते ते आलेत का?" असं स्वरालीनं त्यांना विचारलं. "हो ते येऊन गेलेत, घाबरायची चिंता नाही. त्याला लवकरात लवकर बरं करण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही, आपल्या मातृभाषेत एक सुंदर म्हण आहे, "लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, इथं तर यानं दोन अनमोल जीव वाचवलेत, म्हणुन याला लवकरात लवकर बरं करण्यासाठी माझी पुर्ण टिम शर्थीचे प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नसावी, पण तुम्ही धीर सोडु नका." असं डॉक्टर स्वरालीला समजवतांना बोलले. तीच्या मनाचं त्यांनी समाधान करायचा प्रयत्न केला, पण अर्जुन जोपर्यंत शुद्धीत येत नाही तोपर्यंत तिच्या मनातली काळजी थोडीच कमी होणार होती.  
सायंकाळी पाचच्या सुमारास सोहम, नचिकेत, ध्रुव आणि शार्दुलवर अंतिमसंस्कार करण्यात आले. चार तरुण मुलांच्या त्या धडधड पेटलेल्या चितेकडे बघुन सगळ्यांना शोक अनावर होत होता. सोहम आणि शार्दुल दोघही एकुलते एक होते, त्यांच्या पालकांचा आक्रोश तर बघवल्याच जात नव्हता. हर्षित आणि रितेश कितीतरी वेळ आपल्या जीवलग मित्रांच्या चितेकडे बघत रडतं होते. आपण उगीच त्या डॅमवर गेलो, यार आपल्याला त्या गेटवरच्या शिपायानं टोकलं, त्या शेतकर्‍यानंही मनाई केली, धबधब्याकडे जाण्याआधी सोहमपण घाबरला होता, नियतीनं तीन इशारे दिले होते, पण आपल्या मनाचीच ऐकली, त्याचीच किती मोठी शिक्षा आपल्याला मिळाली. चार मित्रांना प्राण गमवावा लागला, आपल्या दोघांचे प्राण वाचवणारा, सख्या भावापेक्षाही जास्त जीवलग असलेला अर्जुनही मृत्युशी एकटाच झुंज देतोयं. असा ते दोघं विचार करु लागले. "हर्ष्या, आपल्यामुळे अर्जुनवर ही वेळ आली ना रे, तो चांगला धबधब्याच्या वर थांबला होता, त्याला आपण उगीच खाली बोलवलं, तो वरतीच असता तर वेळ असतांनाच त्यानं आपल्याला सावधं केलं असतं. पाहिजे असतं तर तो एकटा सुखरुप राहिला असता, पण जीवावर खेळुन त्यानं आपला जीव वाचवला. आणि त्याच्या जीवावरच आता बितलीएं" असं रितेश बोलला. 
"माझा तर जगुन काहीच उपयोग नाही रे, मला पाण्यातुन वाचवतांना मी त्याला म्हणत होतो, मला मरायचं नाहिए, पण मला वाचवतांनाच तो खुप दमलेला वाटत होता. तुला बाहेर काढल्यावरही मी तसाच हातपाय गाळुन तसाच बसुन राहिलो, तो बाकीच्यांना शोधण्यासाठी किती दुरवर पळत गेला काहीच ठाऊक नव्हतं. सोहमच्या मृतदेहाला खांद्यावरुन तो जेव्हा घेऊन येत होता तरी मला का काहीच झालं नाही? मदत आणण्यासाठी त्यानं किती खटाटोप केला असेल रे, का मी त्याला थांबवुन मदत आणण्यासाठी का गेलो नाही? त्याच्या या धावपळीला सर्वांत जास्त मीच जबाबदार ठरलो. आणि त्याच्यासाठी काहीच करु शकत नाही रे, याचंच दुखः होतयं. मला तर जगायची इच्छाच राहिली नाही रे..!" असं म्हणत हर्षित लहानमुलांसारखा हुंदके देऊन रडायला लागला.
"अरे असं नको म्हणु हर्षित, अर्जुनने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, आणि आता तुच काहीतरी वेड्यासारखं करुन बसला तर त्याच्या मनाला काय वाटेल रे?" असं म्हणत रितेशही रडायला लागला. आपल्या मित्रांच्या चितेची आग विझेपर्यंत ते त्या स्मशानत तसेच बसुन राहिले होते. नंतर ते तिथुन हॉस्पिटलला आले. रात्री ८ वाजता डॉक्टर आय.सी.यु. मधुन बाहेर आलेत, "अर्जुनच्या तब्येतीत सुधारतेयं आहे, तो मघा पाच मिनिटांसाठी शुद्धीवर आला होता, पण लगेच त्याची शुद्ध हरपली, काळजी करु नका एक-दोन तासांत तो येईल पुर्ण शुद्धीवर." असं डॉक्टरांनी सांगितलं. मग तिथे असलेल्या त्याच्या मामा-मामी, स्वराली आणि तिच्या बाबांची चिंता जरा कमी झाली. स्वराली मनातच हनुमानाचे आभार मानत होती. दरम्यान काही वेळानं हर्षित आणि रितेश तिथे आले, त्यांनीही अर्जुनच्या तब्येतीची चौकशी केली. 
स्वरालीची आई जेवणाचा डबा घेऊन आली होती, अर्जुनच्या तब्येतीची विचारपुस केल्यानंतर, "वहिनी-भावोजी, या दोन दोन घास खाऊन घ्या, कालपासुन तुम्ही काहीच खाल्लं नाही, चला बेटा स्वराली तु पण खाऊन घे थोडसं, प्रॅक्टिकल झाल्यानंतर तु इकडेच आली आहेस ना," असं म्हणत तिच्या आईनं त्यांना जेवायचा आग्रह केला. "थांबा वहिनी, डॉक्टर बोलले तो येईल शुद्धीत लवकर, तोपर्यंत घास उतरायचा नाही गळ्याखाली, ए बेटा, तु जेऊन घे, दुपारी आली तसं साधं पाणी पण पिलं नाहिये तु, परिक्षा आहे ना तुझी, आजारी पडशील," असं म्हणत अर्जुनच्या मामांनी स्वरालीला जेवण करायला सांगितलं. "मी पण तुमच्या बरोबरच अर्जुन शुद्धीवर आल्यावर जेवणार" असं स्वराली बोलली. "बरं जशी तुझी मर्जी बेटा, पण पोटभरं जेवायचं बरं का." असं तिची आई बोलली. स्वरालीनं हलकेच मान डोलावली. 
रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अर्जुनला शुद्ध आली. "अर्जुनला शुद्ध आली आहे, आपण भेटु शकतात त्याला, फक्त त्याला काहीच हालचाल किंवा बोलु देऊ नका," असं नर्सनं बाहेर आल्यावर सांगितलं. त्याचे मामा-मामी, स्वराली, तिचे आई-बाबा, हर्षित आणि रितेश हे सर्व त्याला बघायला आत गेले. त्याच्याकडे बघुन त्याच्या मामीला रडु आलं, "काय काय सोसावं लागतयं लेकराला," असं त्या बोलल्या. "अर्जुन बेटा आता बरं वाटतयं ना?" असं मामा त्याच्याकडे बघुन बोलले. नजरेनंच त्यानं होकार दिला. हर्षित आणि रितेशकडे त्यानं बघितलं, "सोहम, ध्रुव, नचिकेत आणि शार्दुल यांपैकी कुणीच वाचलं नाही, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करुनच आलोयं," असं रितेश बोलला आणि अर्जुनचे डोळे पाणावले. स्वराली त्याच्या जवळ गेली, आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या डोळ्यांतले आसवं तिने पुसले. नजरेनंच तीनं त्याला रडु नकोस असं खुणवलं. "बेटा अर्जुन, हे लेकरु खुप काळजी करतयं रे तुझी, काल रात्री इथं आय.सी.यु.च्या बाहेर अख्खी रात्र जागुन तिनं तुझ्यासाठी प्रार्थना केली, आजही दुपारची आली तशी तु शुद्धीवर केव्हा येशील याचीच वाट बघत होती. अजुन तीनं अन्न-पाण्याला स्पर्शही केला नाही." असं अर्जुनचे मामा बोलल्यावर अर्जुन सुखावला. स्वरालीकडे त्यानं एकदम प्रेमळ नजरेनं बघितलं, तीनं त्याचा हात हळुच पकडला, "अर्जुन तु लवकर बरा हो,"असं ती त्याला बोलली. तिच्या आई-बाबांनाही अर्जुन शुद्धीत आल्यामुळे आनंद झाला होता. "चला, आता पेशंटला आराम करु द्या, लवकर बरं व्हायचं ना त्याला, असं म्हणत डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जाण्यास विनंती केली. 
"चला दादा आता जेवण करुन घ्या, असं स्वरालीचे बाबा अर्जुनच्या मामांना बोलले. "हो हो, पहिले तुमच्या लेकीला घास भरवुनच सुरुवात करुया, काय बेटा ठरल्याप्रमाणं आता जेवण करु या ना?" असं त्याचे मामा स्वरालीकडे बघुन बोलले. जेवण झाल्यानंतर अर्जुनचे मामा बोलले, "मुलांनो आता रात्रीचे १०.३० झालेत, तुम्ही घरी जा आता, मी थांबतो अर्जुन जवळ, काळजी करु नका. सकाळी या." मग स्वराली, तिचे आई-बाबा, अर्जुनची मामी, हर्षित आणि रितेश हॉप्सिटलच्या बाहेर आले. "वहिनी, तुम्ही चला आज आमच्या घरी, इतक्या रात्रीचं तुम्ही एकट्या कुठे तुमच्या घरी जाणार," असं स्वरालीची आई अर्जुनच्या मामींना बोलली. रात्री घरी आल्यावर स्वरालीला दिवसभराच्या थकव्यामुळे लगेच झोप लागली. "तुमची मुलगी फार गोड आहे स्वभावानं, आणि खुप गुणी सुद्धा. आमच्यापेक्षाही अर्जुनची जास्त काळजी करते ती हे बघुन मन खरचं खुप सुखावलं ताई, अहो इतक्या लहान वयातही तिचा समजुतदारपणा बघुन समाधान वाटतं," असं अर्जुनची मामी स्वरालीच्या आईला बोलली. "अहो, हे सगळं ती अर्जुनला बघुनच तर शिकते, माघे साडे-तीन आठवड्यांपुर्वी माईंच, म्हणजे माझ्या सासुबाईंच निधन झालं, त्यावेळी स्वरालीला खुप मोठा मानसिक धक्का बसला. त्यांच्यावर फार जीव होता तिचा, या धक्क्यातुन तिला सावरण्यासाठी आम्हाला अर्जुनचीच सगळ्यात जास्त मदत झाली." असं स्वरालीची आई बोलली. "अगं आशु, गप्पाच करणार आहेस का, अगं त्या दमल्या असतील त्यांना बिछाना लावुन दे, काल रात्रीपासुन त्या एक मिनिटसुद्धा झोपल्या नाहीत त्या." असं स्वरालीचे बाबा स्वरालीच्या आईला बोलले.