Monday, February 13, 2012

म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!

हल्ली निवडणुकीचं धुमशान चांगलच पेटलयं, त्यानिमित्ताने केलेला हा छोटासा प्रयत्न, तसं प्रेमकविता हा विषयाला बगल देऊन हा नवा विषय कवितेच्या माध्यमातुन मांडायचा प्रयत्न केलायं, आशा करतो तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडेल..!

आयुष्यभर हक्कांसाठी भांडत आलो,
वाटलं आज हक्क बजावुन बघावं,
एका बदलाच्या आशेपुरतं तरी
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतादान करावं..!

आश्वासनांच्या त्या भुलथापांना,
यंदा ठरवलंय पायदळी तुडवावं,
मतदारांना गृहीत धरणार्‍यांना आज आस्मानच दाखवावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!

पाणी, घरं, रस्ते, आरोग्य, सुरक्षा यासाठी अजुन किती झगडावं,
हेच मुद्दे समोर करुन राजकारण्यांनी अजुनही राजकारण करावं?
यांच्या विचारांना जरा आता ठरवलं सुरुंग लावावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!

पैशे आणि चिकन-मटनांच्या तुकड्यांपुढे का लाचार व्हावं,
गैरमार्गानेच निवडुन यायचं तर मग मतदारांना का ह्यांनी एक दिवसाच राजा करावं?
टक्केवारीचा मेवा नाही तर जनतेची सेवा करणार्‍यांनाच निवडुन आणावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित जितकं माझं घरं, तितकं शहरही व्हावं,
तरुणांनीच काय पण जनताजनार्दनाचे आता हिरीरीने पुढे व्हावं,
अनमोल असं आपलं मत योग्य त्या उमेदवारालाच द्यावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!

  तुम्हा सर्वांचाच,
स्वप्निल सुरेश गरुड

Sunday, February 12, 2012

"वाट पहात असलेल्या प्रेमाची गोष्ट..!"

        "प्रत्येकाचं स्वतःवर प्रचंड प्रेम असतं, पण तरीही प्रत्येकाला अशी एक जण हवीए जी दाखवुन देतो की आपण चुकीचे आहोत, कारण आपल्यापेक्षाही ती आपल्यावर जास्त प्रेम करते, अशीच प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेम करणारी मिळु दे, ह्याच माझ्या आजच्या दिवसाबद्दल असलेल्या शुभेच्छा..!" असं शेवटचं वाक्य सांगुन तो मंचावरुन टाळ्यांच्या गजरातच खाली उतरला, तब्बल तीनतास रंगलेल्या कार्यक्रमात बाकींच्यापेक्षा शार्दुलच्या प्रेमावरील कविता आणि विचारांनी उपस्थित तरुणाईला प्रेमाचा वेगळाच रंग दाखवला होता. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी शार्दुलचं खुप कौतुक केलं, बाकीच्या उपस्थितांनी त्याला तितकीच मनापासुन दाद दिली. उपथित तरुणाई तर त्याचीशी बोलायला उतावीळ झाली होती. "शार्दुल सर, प्लीज आम्हाला तुमची लव्ह स्टोरी सांगा ना, आम्हाला नक्कीच आवडेल ती ऐकायला..!" असं म्हणत तिथे जमलेल्या तरुण-तरुणींनी त्याला  आग्रहानं विनंती केली. कार्यक्रम संपला होता तरी मग आयोजकांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर आणखी वेळ वाढवला. उपस्थितांच्या मध्ये शार्दुल बसला, त्याच्या चेहर्‍यावर जणु लाजेची लाली आली असं जाणवत होतं. आणि त्याने त्याची प्रेमकथा सांगायला सुरुवात केली. 
        "आज तब्बल पाच वर्ष होऊन जातील त्या गोष्टीला, माझ्या आयुष्यातला पहिला व्हॅलेंटाईन डे होता तो..! त्यादिवशी कॉलेजमध्ये आल्यावर जणु माझ्या मनावर प्रेमाची गुलाबी धुंदी पसरलेली होती, प्रेमाच्या वसंताने माझं सर्वांग रोमांचित झालं असं वाटतं होतं, वळिवाच्या पावसात भिजल्यासारखाच मी दिसत होता, चहुकडे भिरभिरणारी माझी नजर आज खुपच चंचल असल्यासारखी वाटत होती, समोरुन येणार्‍या प्रत्येकाकडे बघुन मी आज स्मितहास्य करत होतो, जणु प्रत्येकात त्याला तिचाच चेहरा बघत होतो, कुठुनतरी तिचा मंजुळ आवाज येईल आणि तो टिपण्यासाठी माझे कान आसुसलेले होते, अगदी हळुवारपणे श्वास घेत होतो, जणु प्रत्येक श्वासाआधी तिचीच आठवण काढत होतो. माझा जिवलग मित्राला माझ्या शेजारीच होता, त्याला सर्व काही कळत होतं, कारण माझ्या प्रेमाचं गुपित फक्त त्यालाच तर माहित होतं."
        "भाई, श्वेताली आली," असं अक्षय बोलल्यावर माझं लक्ष तिच्याकडे गेलं, "खरंच श्वेताली शिवाय दुसर्‍या कुणावर मी प्रेम करुच शकत नाही रे," असं मी अक्षयला बोललो. "अरे पण मितालीचं काय शार्दुल?" असं अक्षयच्या बोलण्याला कल्पनेच्या आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारं माझं मन वास्तवाच्या जमिनीवर येऊन कोसळलं. मिताली ही अकारावी पासुन माझ्या प्रेमात पडलेली होती, आमच्या कॉलेजमधला मी पहिलाच असा मुलगा होतो ज्याला स्वतःहुन एका मुलीने प्रपोझ केलं होतं, त्यामुळे आमच्या प्रेमाबद्दल सगळ्या कॉलेजच्या मुलांमुलींनाच काय पण शिक्षकांनाही माहिती होतं. मला त्यावेळी नेहमी वाटायचं की मितालीला माझ्याबद्दल प्रेम नाही तर त्यावयात आल्यावर स्वाभाविकपणणे वाटणारं नुसतच आकर्षण आहे, त्यामुळे मी  नेहमी तिला टाळायचा प्रयत्न करायचो, तिच्याशी बोलतांना कुणी बघितलं की दिवसभर मुलं मला तिच्या नावानं चिडवत बसायची, यामुळे मला कधी मजा यायची, तर कधी हीच गोष्ट नकोशी वाटायची. कधी कोणी मितालीबद्दल वाईट बोललं की मला चिडही यायची, पण तिच्याशी काही घेणंच नाही असं नकळतं कित्येकदा माझ्या वागण्यावरुन तिला वाटायचं."
        मिताली मात्र त्यावेळी माझ्यासाठी काहीही करायला तयार असेल अशीच मला नेहमी वाटायची. पण कदाचित त्यावेळी मितालीच्या भावना मी समजु शकत नव्हतो, कारण हळुहळु मी श्वेतालीच्या विचारात गुंतत चालला होतो. एकदा आमच्या कॉलेजमध्ये सायन्स एक्सिबिशन होतं, आणि पहिल्यांदा धाडस करुन मी श्वेतालीशी बोलायचं ठरवलं. पण तिच्या टेबल जवळ नेहमी एकतर प्रदर्शन बघायला आलेल्या शाळेतल्या मुला-मुलींची गर्दी असायची, नाहितर शिक्षक जवळच असायचे, अशातच थोडा एकांत मिळण्यासाठी मी दिवसभर वाट बघायचो, प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या वाट बघण्याला यश आलं, मितालीची नजर चुकवुन मी आणि अक्षय श्वेतालीच्या टेबलवर गेले आणि तिला तिच्या प्रोजेक्टची माहिती विचारु लागले, श्वेताली आम्हाला माहिती सांगण्यात गुंग झाली होती, आणि माझी नजर तिच्यावरुन हटत नव्हती, आयुष्यात पहिल्यांदाच मी जणु तिला डोळे भरुन बघत होतो. ती अशीच बोलत रहावी असं मला वाटतं होतं. पण नंतर अक्षय मला तेथुन घेऊन गेला. त्यादिवसा पासुन मनात ठरवलं होतं की श्वेताली बरोबर किमान एकदा तरी बोलायचा प्रयत्न करायचा. मिताली आणि मी एकाच बॅच मध्ये होते, तर श्वेताली दुसर्‍या बॅच मध्ये असायची त्यामुळे दररोज बोलायचा मला प्रयत्न करताच येत नव्हता.
        बॅचमध्ये मिताली माझ्याशी बोलत असली की जणु माझ्या डोक्यातुन श्वेतालीचा विचार बाजुला जातोय असं मला वाटायचं, म्हणुन मी मितालीला सोडुन बाकीच्यांशी बोलायचो. मितालीचं मन यातुन खुप वेळा दुखवलं जायचं. कितीतरी दिवस असंच चाललेलं असायचं, दहा पंधरा दिवसातुन एकदा एखादं दोन शब्द माझं आणि श्वेतालीचं बोलणं व्हायचं. यादरम्यान श्वेतालीची मैत्रिण शामली अक्षयला आवडायला लागली होती. अक्षयाच्या मनाची स्थिती मला कळाली होती. आम्हा दोघांची पण कमालाच होती, दोघांनाही अशा मुली आवडल्या ज्या दोघीही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स होत्या. त्यावेळी एकदम खुल्लम-खुल्ला प्रपोझ करणं म्हणजे खुपच रिस्की काम होतं, त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणींच्या मार्फत प्रेम व्यक्त व्हायचं. मितालीने सुद्धा अक्षयला सांगुनच मला प्रपोझ केलं होतं. अशातच मितालीचा जेव्हा वाढदिवस आला त्यावेळी मी कटाक्षाने तिला बर्थ डे विश करायचं टाळलं होतं, त्यादिवशी तिला माझा नक्कीच खुप राग आला असणार हे मला माहिती होतं. पण श्वेताली शिवाय मला दुसरं काही सुचतच नसायचं. माझ्या अशा वागण्यानं मिताली दुखावली जायची हे मला कळायचं, पण मी मितालीला श्वेताली बद्दल सांगु शकत नव्हतो, कारण इतक्या दिवसांनतर श्वेताली माझ्याशी बोलायला लागली होती, आणि मितालीमुळे कदाचित श्वेताली आपल्याशी बोलणार नाही असं मला वाटायचं.
        कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता, इकडे माझ्या आणि अक्षय दोघांच्या मनात प्रेमाच्या इंद्रधनुष्य खुलत चालला होता. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अक्षयने शामली साठी एक ग्रिटींग घेतलं होतं, त्याच्या मनाच्या सगळ्या भावना त्याने त्यात लिहिल्या होत्या, आणि ते ग्रिटींग शामलीला देण्यासाठी तो खुप आतुर झाला होता. मी पण अक्षयसारखं ग्रिंटींग घेतलं होतं, शेवटी आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स होते ना, साला दोघांनीही एकसारखंच प्रपोझ करण्याचं ठरवलं होतं. त्यादिवशी दिवसभर मिताली माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती पण मी तिला दिवसभर टाळलं, त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर मिताली लगेच निघुन गेली, मला तर जणु रान मोकळचं असल्यासारखं वाटलं. श्वेताली आणि शामली निघाल्यावर मी आणि अक्षय दोघंही त्यांच्या माघुन निघाले, कॉलेजजवळ असलेल्या सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ येताच अक्षयने शामलीला आवाज दिला. शामली थांबल्यानंतर अक्षयच्या मनातल्या भावना उचंबळुन आल्या. त्या भावनेच्या भरात त्याने तिला प्रपोझ करुन टाकलं, अक्षयच्या शेजारी मी आणि शामली सोबत असलेली श्वेताली आम्ही दोघंही अक्षयकडे आवाक होऊन बघत होतो.
        अक्षयचं बोलणं संपल्यानंतर शामली अक्षयला म्हणु लागली, "अरे हे वय काय प्रेम करायचं असतं का? बारावीचं वर्ष आहे हे, करियचा विचार करायला पाहिजे ना,.." असं बरंच काही शामलीनं अक्षयला सुनावलं होतं. अक्षयची तर बोलतीच बंद झाली होती. शामलीचा तो आक्रमक पवित्रा बघुन माझी श्वेताली साठी घेतलेलं ग्रिटींग तिला देण्याची हिम्मतच झाली नाही. कदाचित त्यावेळी श्वेतालीला नक्कीच जाणवलं असावं की मीसुद्धा तिला प्रपोझ करणार होतो ते..! शामलीनं अक्षयला चांगलच फैलावर घेऊन टाकलं, बिचार्‍याची जणु ऐन वयात प्रेम करायची मस्तीच तीनं जिरवुन टाकली होती असं म्हंटलं तरी चालेलं. त्या दोघी गेल्यानंतर अक्षयचा चेहरा तर केविलवाणा झाला होता. समोरच्या बिल्डींगमधुन एक काकांनी घडलेला सगळा प्रकार बघितला होता, अक्षयला बघुन ते त्याला बोलले, "काय यार, एका मुलीला प्रपोझ करता आलं नाही तुला?" अक्षय त्यांच्याकडे बघुन नुसताच हसला. मला काय बोलावं हेच सुचेनासं झालं होतं, जणु श्वेतालीच्या नाव मी जरा मनात जास्तच जपले होते, म्हणुन की काय देवही त्याच्यावर रुसले होते असं मला वाटु लागलं.
        "शार्दुल, मला टेंशन यायला लागलं रे, यार आपलं ठरलं होतं ना की त्या दोघींना प्रपोझ करायचं ते, मी प्रपोझ केलं आणि जणु बळीचा बकरा झालो रे, तुझ्यासाठी मी तीचं इतकी बोलणं ऐकुन घेतलं, मला वाटलं तु श्वेतालीला प्रपोझ करशील, बाकीच्यांना मुलींना प्रपोज कसं करायचे सक्सेस फुल सल्ले तुम्ही दिले, पण भाई तुम्ही मला दगा दिला. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा..!" असं अक्षय बोलला होता. मलाही अक्षयबद्दल वाईट वाटलं होतं, माझ्या एका शब्दाखातर त्याने शामलीला प्रपोझ करायचं डोळे झाकुन ठरवलं होतं. त्यावेळी श्वेतालीसाठी मी स्वार्थीच होऊन गेलो असं अक्षयला वाटलं असतं तर नवल नव्हतं. मी अक्षयला समजावलं, अक्षयला माझ्या मनाची स्थिती माहिती होती तो माझा बेस्ट फ्रेंड होता, माझ्यासाठी अगदी सख्ख्या भावापेक्षाही अक्षय जवळचा होता.
        दुसर्‍यादिवशी वर्गात मग अक्षय आणि शामली जेव्हा समोरासमोर आले त्यावेळी काही घडलं नाही असंच त्या दोघांकडे बघुन जाणवलं. शामलीला प्रपोझची स्थिती पाहिल्यानंतर श्वेतालीला प्रपोझ केलं तर काय होईल याच्या कल्पनेनंच माझं डोकं सुन्न होऊन जायचं. पुढचे काही दिवस मग श्वेतालीचा विचार माझ्या मनातुन मावळत असल्यासारखं होतं होतं, त्याला कारण होतं मिताली. मितालीवर आमच्याच वर्गातलाच एक मुलगा प्रेम करु लागला, आणि या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, इतके दिवस मितालीची पर्वा न करणार्‍या माझ्या मनाला आता तिची काळजी वाटायची, मितालीवरच मी प्रेम करु लागलोयं हे जणु त्या गोष्टीमुळे अक्षयला जाणवायचं.
        कॉलेजमधली काही मुलं मला मितालीबद्दल नको नको त्या गोष्टी सांगत असायचे, एक दिवस मला मितालीपासुन दुर करायचं या हेतुन मला मारायला मुलं पण आली होती, त्यावेळी मी आणि अक्षय दोघंच होते, मी त्यांच्याशी बोलुन वेळ मारुन नेली, एकप्रकारे जीवावर जे आलं ते, आता फक्त धमकीच्या रुपात राहिलं असं झालं. त्या दिवसापासुन माझ्या मनात मितालीबद्दल असलेल्या भावना पेटुन उठल्या. पण मितालीलाच आता माझ्यामध्ये काही रस नव्हता, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी तिच्यावर खुप चिडलो होतो, तिला खुप घालुन पाडुन बोललो होतो. काय करणार शेवटी माणुस होतो ना, ती कशी का असेना माझ्यावर प्रेम करायची, आणि प्रेम करणारी माणसं अशी निघुन गेली की दुखः होणारचं..! असो, तेल गेले तुपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी माझी अवस्था झाली असं अक्षय म्हणायचा. बोर्डाच्या परिक्षेमुळे अभ्यासावरही लक्ष देणं गरजेचं असायचं, पण आयुष्यात अशी एकामागुन एक वादळं आली आणि मी यात केव्हा कोलमडेल याची मलाच खात्री नव्हती.
        बारावीची परिक्षा झाल्यानंतर सी.ई.टी.च्या क्लासला देखील मी आणि मिताली एकाच क्लासला होतो, जणु मनाला लागलेली जखम दररोज उघडी पडायची, मिताली आणि आपल्यात हे असं कसं का झालं याच्या विचारानं मला नेहमी वाईट वाटायचं. अक्षयही त्याच्या आयुष्यातील त्या धक्क्यातुन सावरुन गेला होता. बारावीचा आणि सी.ई.टी.चा निकाल लागल्यानंतर वर्गातील मुला-मुलींचा एक-मेकांशी संपर्क तुटुन गेला होता, अक्षय कडुन मला कळालं की मिताली अजुनही आपल्याच शहरात आहे, पण श्वेतालीचं काय झालं याची त्याला माहिती नव्हती. करियरसाठी मी सगळ्यांपेक्षा वेगळीच वाट निवडली होती, मी ज्या कॉलेजला होता, त्याच्या शेजारच्या कॉलेजच्या कॅंम्पसमध्ये रोज मला कितीतरी प्रेमी युगुलं दिसायची, आणि त्यांना बघितलं की मला श्वेतालीची आठवण यायची. कॉलेजमधले कोणी मित्र-मैत्रीण भेटली की मी आठवणीनं श्वेतालीची चौकशी करायचो, आणि एक दिवस मला श्वेताली कोणत्या फिल्ड मध्ये आहे, कोणत्या गावात आहे ते कळालं, तिच्या आठवणींची आठवण काढण्याच्या सवयी मुळे मला कविता करण्याचा छंद जडला. प्रेमात पडला की माणुस नक्की कवी होऊन जातो, हे मला बघितलं की खरंच वाटायचं, असं अक्षय म्हणायचा.
        माझ्या कॉलेजमध्ये हळुहळु मी त्या कवितांमुळे विध्यार्थीवर्गात लाडका बनला होतो. शार्दुलची नक्कीच गर्लफ्रेंड असणार असं कॉलेज मधल्या प्रत्येकाला वाटायचं, मीसुद्धा नेहमी त्यांना तसंच भासवायचो, कारण मी अजुनही मनानं श्वेतालीला माझी गर्लफ्रेंड मानायचो. त्यावेळी कॉलेजमध्ये श्वेतालीसाठी कविता करण्यात मी पुरताच रमुन जायचो, हळुहळु माझ्या कविता करण्याच्या छंदा बरोबर मला नाटकं लिहायचा छंद लागला, लिखानाच्या वेडाने मला पुरतच झपाटुन टाकलं होतं, त्यावेळी माझ्याकडे ना तिचा फोटो होता, ना तिचा कॉंटॅक्ट नंबर, फक्त कॉलेज मधल्या तिच्या आठवणींची शिदोरी घेऊन मी माझं कॉलेज लाईफ जगत होतो. एक दिवस श्वेताली त्याला भेटेलच या आशेनं माझं मन अजुनही तिची वाटच बघत होतं. अक्षयनेही शामलीशिवाय दुसर्‍या कुणाचा कधी विचार केला नव्हता. मी रोज प्रार्थना करायचा की एक दिवस श्वेतालीची आणि माझी भेट होऊ दे, पण कॉलेजच्या चार वर्षात एकदाही तसा प्रसंग आलाच नाही.
        मी शेवटच्या वर्षाला असतांना एकदिवस मला मितालीला भेटावसं वाटलं, मी तिच्या मावस बहिणीकडे मितालीची चौकशी केली, मितालीने पण मला भेटण्याची तयारी दाखवली, मितालीच्या वाढदिवसाच्या चार दिवस आधी माझी आणि मितालीची भेट झाली. साधारण एक अर्धा तास आम्हीदोघं एकमेकांशी बोलत होते, कॉलेजमधल्या गमती जमती एकमेकांसोबत शेअर करत होते, पण दोघांपैकी कुणीच एकमेकांना आमच्या रिलेशनशिप बाबत विचारलं नाही. मितालीच्या वाढदिवशी यावेळी पहिल्यांदाच मी तिला विश केलं, तीनं तिच्या बर्थ डे पार्टीसाठी मला बोलावलं होतं, पण काहीतरी कारण सांगुन मी नाही गेलो. त्या दिवसानंतर पुन्हा मी मिताली सोबत कॉंटॅक्ट ठेवलाच नाही, श्वेतालीवर असलेल्या प्रेमासाठी तसं केलं होतं.
        चार वर्षांचा कालावधी खुप मोठा होता, पुलाखालुन बरंच पाणी निघुन गेलेलं आहे याची मला चांगलीच कल्पना होती, पण अजुनही श्वेतालीसाठी माझ्या मनात असलेली प्रेमाची ज्योत अजुनही तितक्याच उमेदीनं जळतं होती. चार वर्षांपासुन मी तिची वाट बघत होता, ह्याच नवल अक्षयला वाटायचं. माणुस प्रेमासाठी काहीपण करायला तयार होतो, म्हणुन प्रसंगी देवही त्याच्यापुढे झुकतो असं मी म्हणतो ते चुकीचं नाही, कारण  तब्बल चार वर्षांनंतर मला श्वेतालीने मेसेज केला होता, एका सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातुन तिला माझा नंबर मिळाला. माझ्या जीवनाला तर नवी संजिवनीच मिळाली होती. आता मला तिच्याशी केव्हाही बोलता येण्यासारखं होतं, मी तिच्यावर प्रेम करतो हे सांगता येणार होतं, पण तरीही मी अजुनही तिच्याशी बोलला नव्हतो. तिच्यावर प्रेम करतो हे आजही तिला सांगण्याच धाडस माझ्यात नव्हतं, कारण नुसत्या शब्दांनी मला माझं प्रेम व्यक्त करायचं नव्हतं.
        माझं पदवीचं शिक्षण पुर्ण झालं होतं, पण श्वेताली पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. पुढच्या शिक्षणासाठी मला माझ्या फिल्डमधलं सर्वोत्तम कॉलेज मिळालं होतं, त्यादिवशी मी खुप आनंदात होता, त्या आनंदाच्या भरातच मी श्वेतालीला मेसेज करुन मी तिच्यावर प्रेम करतो असं घाबरत का होईना सांगितलं, पण तिचा प्रेमावर विश्वासच नाही, आणि तसल्या भानगडीत तिला पडायचं नाही असं तीने मला सांगितलं. माझ्या हृदयाची किती शकले झाली होती हे मलाच माहिती होतं, त्यासुमारास मी एकाएकी खुप आजारी झाला, त्यामुळे मी मला मिळालेल्या कॉलेज मधुन प्रवेश माघे घेतला. दोन महिने आजारपणात काढल्यानंतर मी वर्षभर घरीच बसण्यापेक्षा जॉबला जाऊ लागलो, मी मुद्दाम नाईट शिफ्ट निवडली होती.
        आता मी आणि श्वेताली रोज एकमेकांशी रात्री तासन-तास बोलु लागली होतो, दररोज घडलेल्या दिवसभरातील गप्पांत आम्ही गुंतुन जायचो, मी तिला माझ्या कॉलेजची जॉबची मजा सांगायचो, ती मला तिच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगायची. माझं जीवन आता पुर्णपणे श्वेतालीमय झालं होतं, आज रात्री श्वेतालीला काय सांगाव याचाच दिवसभर विचार करत माझ्या मनात असायचा. दरम्यान दिवाळीच्या सुट्टीत श्वेताली तिच्या घरी आली, आणि साडे चार वर्षांनंतर माझी आणि तिची भेट झाली, पण ती सुद्धा काही क्षणांसाठीच, श्वेताली सोबत तिची मैत्रीण होती, आणि तिला घरी जायचं होतं त्यामुळे ती पटकन निघुन गेली. पण इतक्या दिवसानंतर ती मला दिसली होती त्यामुळे मी त्यादिवशी खुप खुष होतो. कधी कधी श्वेताली तिच्या कॉलेजच्या गमती जमती सांगात असायची आणि मलाही तिलापण खुप काही सांगायला असायचं, त्यामुळे मी तिचं बोलणं मध्येच थांबवायचो आणि मग श्वेताली माझ्यावर रागवायची, आणि फोन कट करायची. मग मी तिला कितीवेळा सॉरी म्हणायचो, तिला मनवण्यासाठी नको नको ती शक्कल लढवायचो. काय करणार शेवटी माझं मन अजुनही तिच्याकडे गहाण होतं ना, आयुष्यात कुणापुढे झुकला नाही पण तिच्यापुढे तर माझा इगोही झुकायचा. चुक झाली तर मान्य करायची आणि बरोबर असलं तरी गप्प राहयचं हे त्यावेळी मला गरजेचं वाटायचं, कारण अशानचं तर नाती टिकतात..!
        एक दिवस मी कामात व्यस्त असतांना श्वेतालीचा मिसकॉल आला, त्यावेळी मी तिला मेसेज म्हणुन त्याची एक चारोळी पाठवली. तशी चारोळी का पाठवली असं श्वेतालीनं विचारलं आणि जोश जोश मध्ये येऊन मी सांगितलं की तिच्यासाठी लिहिलेल्या कादंबरीतलं वाक्य आहे ते. श्वेतालीला आनंद झाला की मी कादंबरी लिहितोय. पण त्यावेळी खरं सांगायचं तर मी कादंबरीचा ’क’ पण लिहिला नव्हता. त्यादिवशी अख्खी रात्र मी जागाच होतो, श्वेतालीला सांगितलंय कादंबरी लिहितोय, पण आपण तर एक शब्द अजुन लिहिला नाहिये, हा विचार मला स्वस्थ बसु देत नव्हता. शेवटी प्रेमासमोर देवही झुकला असं मला वाटलं कारण त्याच रात्री कादंबरीची स्टोरी सुचली, आणि शब्दही तितक्याच तत्परतेने सुचत गेले, शेवटी माझ्याच आयुष्याचीच तर कथा होती ती..!
        दुसर्‍या दिवशी मी तिला त्या कादंबरीची सुरुवातीचे काही पाने वाचुन दाखवली, त्या कादंबरीचा नायक तिला हवाहवासा वाटला, तसं ती त्याला बोलली सुद्धा..! त्यावेळी तिला कोण समजावणार होतं की तो कादंबरीचा नायक मीच होतो ते? असेच मग एक एक दिवस सरत होते, मी श्वेतालीसाठी ती कादंबरी पुर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होतो. कादंबरीची एक एक ओळ लिहितांना समोर श्वेतालीच आहे असं समजुन मी लिहित गेला, मी आणि श्वेताली जर आज सोबत असते तर मी तिच्यासोबत कसा जगला असतो, तिच्यासाठी काय काय केलं असतं, हेच मला त्या कादंबरीत दाखवायचं होतं. एक दिवस ती मला म्हणाली की, "शार्दुल माझ्यावर एक कविता कर ना..!" त्यादिवशी मी माझ्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रेमकविता जाळल्या होत्या, जणु त्या कवितांच्या राखेतुन अशी कविता बाहेर यावी ज्यातुन तिला माझ्या मनाच्या भावना कळतील असं वाटायचं, पण आजही तिच्याशिवाय मला काही दिसतच नाही, म्हणुनच की काय तिच्या बद्दल असलेल्या भावना लिहायला शब्दंच सुचत नाही."
        "शार्दुल सर, मग हे सगळं तुम्ही त्यांना का सांगत नाही? तुमच्या कविता आणि विचार ऐकले की आम्हाला नवी उमेद मिळाली, आणि प्रत्यक्षात तुम्हीच एकप्रकारे एकतर्फी प्रेमात आहात? सरप्राईजिंग आहे सगळं..?" असं एक मुलगा शार्दुलला बोलला. बाकीच्यांच्या नजराही जणु शार्दुलला तोच प्रश्न विचारत होत्या असं जाणवतं होतं. एका श्वेतालीसाठी काहीही करायला तयार असलेला शार्दुल तिला तिच्यावर प्रेम करतो हेच सांगु शकत नव्हता ह्या गोष्टीवर जमलेल्यांचा विश्वास बसत नव्हता. प्रश्न विचारणार्‍या मुलाकडे शार्दुलने एकक्षण बघितलं, आणि तो हलकेच हसला.
        "मित्रा, मी जिच्यावर प्रेम करतो ती श्वेताली तिच्या आई वडीलांसाठी अनमोल अशी राजकुमारी आहे, आणि तिच्या आई-वडील तिच्यासाठी नक्की तिचा परफेक्ट राजकुमार शोधतीलच. मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे, मग तिचा प्रियकर का बणु शकत नाही तिच्या स्वप्नांतला राजकुमार का नाही बनु शकत हे मी तिला कधीच विचारणार नाही कारण मला माहिती आहे की मी अजुन तिच्यासाठी परफेक्ट नाहिए..! म्हणुनच मी  तिच्यावर असंच निस्वार्थ प्रेम करत होतो, करत आहे आणि करत राहिल, तिच्यासाठी परफेक्ट होईपर्यंत माझं प्रेम असंच आयुष्यभर तीची वाट बघंत राहिलं..! माझ्या या प्रेमाला तुम्ही शोकांतिका ठरवु नका, त्याला नुसतं  निस्वार्थ प्रेमंच असु द्या..! कसं आहे आयुष्यात प्रत्येकाला त्याचं खरं प्रेम मिळेलच असं नसतं, पण कुणावर तरी आपलं प्रेम असावं इतकच जगण्याला कारण पुरेसं असतं..!" असं शार्दुल बोलुन गप्प झाला. एकमिनीट सगळेच शांत होते, आणि मग सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला, आणि जणु शार्दुलच्या भावनांचा आपण आदर करतोय असं दाखवुन दिलं.
        आजही आपल्या सभोवताली कित्येक असे शार्दुल असतील ज्यांना बघितलं की खरंच कुणाच्या तरी प्रेमात पडावं असं वाटतं नाही का? कदाचित आयुष्यात शार्दुलला त्याची श्वेताली भेटेलही वा भेटणारही नाही पण श्वेतालीवर असलेलं त्यांच प्रेम सदैव असंच राहु दे हीच देवाकडे प्रार्थना..! प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस म्हणुन हल्ली व्हॅलेंटाईन डेचं महत्व वाढतयं. पण आजकाल जितक्या लवकर मेक अप होतं, तितक्याच लवकर ब्रेक-अप सुद्धा होतं, डोकं वापरुन वाट्टेल तितक्या मुलींबरोबर अफेअर करण्यापेक्षा जी आपल्यावर मनापासुन प्रेम करते तिच्यावरच सर्वार्थाने प्रेम करायला शिका हेच मला सांगायचं आहे. आशा करतो की तुम्हाला ही कथा आवडली असेल..! पुन्हा लवकरच भेटेल एका नव्या विषयासह, माझ्या मनात लपवलेल्या आणखी काही शब्दांसहं..!
 तुम्हा सर्वांचाच,
स्वप्निल सुरेश गरुड

१०) जनसामान्यांबरोबर आलेले काही अनुभव..!

        फार्मसीत विध्यार्थांचा प्रवेश कसा होतो, हे तर तुम्हाला आता कळलंच असेल. गेल्या साडे-तीन वर्षांत फार्मसी शिकतांना मला जनसामान्यांबरोबर बरेच अनुभव आले, काही वाईट, काही चांगले, काही निराशाजनक तर काही प्रेरणादायी..हे सर्व मी अनुभवलं कधी बस स्टॉपवर, कधी बसमध्ये, कधी एखाद्या समारंभात तर अगदी इंडस्ट्रियल ट्रेनिंग करतांना. गेल्या साडे-तीन वर्षाच्या या प्रवासात मला एक गोष्ट सातत्याने जाणवतं होती की खरचं फार्मसी या फिल्डबद्दल सामान्यलोकांच्या मनात असलेलं वलयं फारच छोटं आहे. कदाचित मेडिकल, इंजिनियरींग, किंवा आय.टी. सारखी लोकप्रियता ह्या फिल्डच्या वाटेला त्याप्रमाणात कमीच आली.
        फस्ट इयरला असतांना प्रॅक्टिकलच्यावेळी आम्हाला एका बॉक्स मध्ये आवशक्यत्या वस्तु घेऊन जाव्या लागतं, सहाजिकच बसमध्ये असलेल्या सहप्रवाश्यांना त्याचं नवलं वाटायचं, असंच एकदा एक वृध माझ्याशेजारी येऊन बसले, माझ्याजवळच्या त्या वस्तु पाहुन ते बोलले, "काय शिकतोस?" मी त्यांना सांगितलं की मी बी.फार्म करतोय, त्यावर त्या आजोबांनी दिलेल्या उत्तरावर कित्येकांचा विश्वास बसणार नाही, कारण ते बोलले, "काय मग आता यानंतर डी.फार्म करणार का?" मी त्यांना बी.फार्म अन डी.फार्म यांतला फरक सांगत होतो, पण त्यांच्यानुसार बी.फार्म नंतरच डी.फार्म करता येतं. पुढे ते सांगत होते की त्यांच्या गावाकडे डी.फार्म झालेला त्यांचा कोणीतरी नातेवाईक राहतो, त्याला तिथले लोक "अर्धा डाक्टर" म्हणतात, "बी.फार्म नंतर डी.फार्म पण कर बरं का म्हणजे तुला  पण लोक अर्धा डाक्टर म्हणतील, नाहीतर कंपाऊंडरच राहशील आयुष्यभर..!" असा सल्लादेखील द्यायला ते विसरले नाही.
        एकदा माझा अकरावीतील मित्र भेटला, इंजिनियरींगला होता तो, "यार आपण काय पुढच्यावर्षी झालो, इंजिनियर, लगेच प्लेसमेंट.." त्यावर मी देखील त्याला बोललो, "मी पण तर होतोय ना फार्मसिस्ट..." त्यावर तो बोलला, "तुला तर मेडिकलला जायचं होतं ना, कशाला फार्मसी घेतलयं. साधा आयुर्वेदिक डॉक्टर झाला असला तरी चाललं असतं ना, फार्मसी काय शेवटी मेडिकलचं दुकानच ना. झालच शेवटी डॉक्टरांचे पाय चाटायचे काम.." त्यावेळी त्याची चांगला समाचार घ्यावा की त्याला फार्मसी बद्दल अधिक सांगावं असा प्रश्न मला पडला होता.
        एकदा मावस बहिणीच्या लग्नात असतांना आईचे मामा मी सध्या काय करतो ते आईला विचारत होते, आईने त्यांना मी फार्मसीला आहे असं सांगताच, "बरं झालं गरुड सरांची रिटायरमेंट नंतरची सोय मुलाकडुन करुन घेतली, ते सांभाळतील मेडिकलचं दुकान अन लेक बनेल एम.आर." खरचं आपल्या लोकांना आजही फार्मसी म्हणजे नुसतं मेडिकलचं दुकान किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच यापलीकडे सुचतचं नाही. फेम केयर फार्मा-अंबड या इंडस्ट्रित मी ट्रेनिंग साठी गेलो होतो. कंपनीचं वातावरण चांगलं होतं, तेथे काम करणार्या वर्करपासुन ते मॅनेजर यांच्याशी मला चांगलं जुळवुन घेता-घेता खुप काही शिकायला मिळालं होतं. तिथे काम करत असलेले वर्कर सांगायचे, "तु फार्मसीत जास्तीत जास्त शिक बरं का..वेळ लागेल पण नंतर इंजिनियरींग अन मेडिकल असलेल्यांच्या बरोबरीनं कमवशील.." त्यांच्या त्या बोलण्याला मी त्यावेळी हसतच उत्तर द्यायचं टाळलं होतं, पण तिथल्या माझ्यापेक्षाही कमी शिकलेल्या त्या वर्करांनी ती लाख मोलाची गोष्ट सांगितली होती.
        "वेळ लागेल पण नंतर इंजिनियरींग अन मेडिकल असलेल्यांच्या बरोबरीनं कमवशील.." या गोष्टीचा मी नंतर विचार केला, अन विचारांती निर्ष्कशावर आलो की आज फार्मसीची क्रेज कमी आहे ती फक्त याच गोष्टीमुळेच. इंजिनियरींग, मेडिकल झालेल्यांना लगेच कुठेही प्लेसमेंट किंवा जॉब मिळतो, स्वतःच क्लिनीक टाकल्यावर हवी तेवढी प्रॅक्टिस करता येते. पण फार्मसीतल्या मुलांसाठी एवढं सगळं सोप नसतं. साधा डी.फार्म झालेला विध्यार्थी मेडिकल टाकतो किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणुन काम करतो..यात लठ्ठ पगार मिळत नाही, बढतीसाठी शिक्षण कमी अशा अडचणी त्याला येतात. बी.फार्म केलेला विध्यार्थ्याला प्रोडक्शन या विभागात काम करता येतं पण तिथेही पगाराची समस्या असतेच. कारण बी.ई. झालेल्या मुलांचा पगार बी.फार्म असलेल्या मुलांच्या तुलनेत जास्तच असतो. फार्मा इंडस्ट्रित अनुभव असेल तर चांगला पगार मिळतोच मिळतो, पण तो अनुभव येण्यासाठी लागत असलेला वेळ हा इतर फिल्ड्सच्या तुलनेत जरा जास्तच आहे असं मला वाटतं. आणि सध्या प्रत्येकाला कमी वेळात जास्त पगाराची नोकरी पाहिजे असल्याने फार्मसीतुन वेळ खर्च करण्यास सहाजिक नापसंतीच दर्शवली जाते.
    दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनियरींग झालेल्यांना अंतिमवर्षाच्या मुलांच कॅंपस सिलेक्शन होतं, आता बी.फार्मच्या मुलांचं होत नाही यातला भाग नाही, पण इंजिनियरींगची मुलं तो जॉब करतात. पण फार्मसीचे मुलं आलेला जॉब न स्विकारता एम.फार्म करण्याच्या मनस्थितीत असतात, त्यामुळे फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शनसाठी आलेल्या फार्माकंपन्यांच्या पदरी उपेक्षाच येते. त्यामुळे पुढच्यावेळी त्या बी.फार्मच्या मुलांच सिलेक्शन करायला तयार नसतात.
    एम.फार्म केलेल्यांनाही सुरवातीचे एक-दोन वर्ष कमी पगाराच्याच नोकरीत समाधान मानावं लागतं, त्यामुळे त्यांचाही अजुन उच्च शिक्षणाकडे म्हणजे पी.एच.डी. करुन चांगल्या पगाराची नोकरी करण्याकडे कल असतो, पी.एच.डी नंतर त्यांना उत्तम पगार मिळतोच पण त्यासाठी त्यांनी मोजलेल्या वेळची किंमतही मोठीच आहे. त्यामुळेच फार्मसी कडे वळण्याचं प्रमाण हे इंजिनियरींग अन मेडिकल कडे वळणार्यांच्या तुलनेत कमी आहॆ असं मला जाणवलं. यात थोडाफार दोष फार्मसीसाठी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचादेखील आहेच. पण यावर टिका किंवा भाष्य करणं म्हणजे लहान तॊंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. मला ठाऊक आहे की मलाही अजुन फार्मसीतलं एवढं काही कळतं नाही, मलासुद्धा अजुन बराच प्रवास केल्यानंतरच यातील खाच-खळगे अन मखमली गालिचे दिसतील. पण आजवर जगलेल्या वस्तुस्थितीतुन मिळालेल्या अनुभवांची साक्षीनेच मी हे सर्व लिहिलं आहे. कदाचित यातल्या काही गोष्टी पटतील किंवा काही मुळीच पटणार नाहीत पण फार्मसीबद्दल विचार करण्याची नजर नक्कीच बदलेल अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

९) आमच्या प्रत्येक सरांकडुन काय शिकावं..!

        मित्रांनो, सम्राट चंद्रगुप्त मौर्य संबधीची एक गॊष्ट आपल्यातील पुष्कळ जणांना ठाउक असेल वा नसेल तरी सांगतो.आर्य चाणक्य सम्राट चंद्रगुप्तांचे गुरुवर्य, आपल्या शिष्याची त्यांनी एकदा चाचणी घ्यावयाचे ठरवले. "माझ्या जवळ जे काही होतं ते मी सर्व तुला शिकवलेलं आहे चंद्रगुप्त, तु यावर समाधानी आहेस का?" असा प्रश्न आर्य चाणक्यांनी विचारला. त्यावर चंद्रगुप्तांचं उत्तर लक्षणीय आहे; "गुरुवर्य तुम्ही जे काही मला शिकवलयं त्याबद्दल मी नक्कीच तुमचा मनस्वी आभारी आहे. एखादी दैवी योजनाच असावी की मला तुमच्या हातातुन घडण्याचं भाग्य मी माझ्या ललाटवर घेऊन आलो. आपण शिकवल्या प्रमाणे मला ठाउक आहे की मनुष्याने आपल्याकडील असलेल्या गोष्टींवर समाधानी असावेच, पण त्याची शिकण्याच्या भुकेबद्दल तो कधीच समाधानी नसावा. त्याला जितकी शिकण्याची संधी मिळेल आयुष्यभर त्याने त्या संधीचं सोन करावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो ज्यांपासुन शिकत गेला त्या गुरुंना तो विसरता कामा नये."
        सम्राट चंद्रगुप्तांचे उत्तर ऎकुन आर्य चाणक्य सुखावलेत. त्यांनी चंद्रगुप्तांना आशिर्वाद दिला आणि बोलले "तुझ्या साठी मी आता काय करु?" चंद्रगुप्तांनी मोठ्या समाधानाने उत्तर दिले "गुरुवर्य माझी फार दिवसांची ईच्छा होती, तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची, आज तो क्षण आला आहे असं मला वाटतयं!" आर्य चाणक्य त्यावर उत्तरले, "मला तु मी कल्पनाही करु शकणार अशी गुरुदक्षिणा देऊ शकशील तर हे शिष्या अशी गुरुदक्षिणा घ्यायला मला नक्कीच आवडेल." चंद्रगुप्तांनी आर्य चाणक्यांना दिलेली  गुरुदक्षिणा ही एकलव्याने जशी द्रोणाचार्यांना दिली अगदी तशीच मोलाची होती. चंद्रगुप्तांनी आर्य चाणक्यांकडुन काय अवगत केलेली सर्व विद्देची त्यांना नुसती प्रचितीच दाखवली नाही तर आपल्या गुरुंची त्याला चक्रवर्ती सम्राट बणवन्याचं स्वप्नही साकार केली. अशी अनोखी गुरुदक्षिणा आपल्या शिष्याकडुन मिळाल्याने आर्य चाणक्य समाधानाने बोलले," एखाद्या गुरुला चंद्रगुप्ता सारखा शिष्य लाभावा हीच त्याची सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा होयं, दैवी योजना चंद्रगुप्तासाठी नाही तर माझ्यासाठीच असावी, ज्यानुसार त्याचा गुरु होण्याचा भाग्यलाभ मला झाला!"
        आपणही मित्रांनो चंद्रगुप्तांप्रमाणे आप-आपल्या गुरुंकडुन विद्यार्जन करत असतोच नाही का? असं म्हणतात शिष्य किती मोठा हे त्याच्या गुरुच्या किर्तीवरुन ठरत असतं. बालावाडीपासुन ते पदवी वा पदवीत्तर शिक्षण घेतांना आपल्याला अनेक शिक्षकांचा सहवास लाभतो, यानेच आपल्या आयुष्याची जडण-घडण होते नाही का? माझ्या C.P.N. मध्येही मला चांगल्या प्राध्यापकांचा सहवास लाभलाय. असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीकडुन काहीतरी मनुष्याने शिकावं आणि स्वतःला परिपुर्ण बनवायचा प्रयत्न जरुर करावा.
        C.P.N. मध्ये मी अभ्यासाव्यतिरिक्त तो विषय शिकवत असलेल्या शिक्षकांचा एक-एक चांगला गुण स्वतःच्या अंगी बाळगण्याचा प्रयत्न करत गेलो. सुरुवात तर आमच्या प्राचार्यांपासुनच व्हायला हवी नाही का? श्री संजय वाघ सर, जणु C.P.N.चे सरकार, Organic chemistry या विषयाचे महामेरु, प्रचंड बुद्दिमत्ता. Organic chemistry च्या एक एक रिऍक्शन्स एतक्या किचकट पण सरांच्या लेक्चरला नीट लक्ष देउन ऎकलं की exam मध्ये चिंता करायची गरज नसायची. असं सिनियर्स सांगायचे, अन प्रत्यक्षात आम्ही देखील याचा अनुभव घेतला आहे. एखाद्या विषयाचीच किती सखोल माहिती असावी हे शिकावं तर वाघ सरांकडुनच.!
        "जब फार्माकोग्नोसी हो आऊट ऑफ कंट्रोल, तो होंठ घुमा, सिटी बजा, सिटी बजा के बोल-पाल इज वेल, पाल इज वेल..!" असंच वर्णन योग्य पडेल आमच्या श्री पाल सरांची महती सांगण्यासाठी. फार्माकोग्नोसीसारखा रटाळ विषय सर इतक्या सोप्या शब्दांत सांगतात की परत फार्माकोग्नोसीची काय बिशाद की मुलांना कंटाळा आणेल. आपलं आयुष्य हसतं खेळतं चिंतामुक्त होऊन जगावं हेच आपल्या प्रत्येक कृतीतुन दरवेळी आम्हाला पाल सर जाणवुन देतात. "वाचाल तर वाचाल" ही गोष्ट आम्ही शिकलोय ती श्री गुडसुरकर सरांना बघुनच.सर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठलं ना कुठलं पुस्तक वाचतच असतात. "नरकातही मी पुस्तकांच्या मदतीने स्वर्ग निर्माण करीन," असाच आनंद सरांच्या श्रीमुखावर एखादं पुस्तक वाचत असतांना दिसतो.
        प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य १००% देऊनच करायचं असं जे आम्ही शिकतो ते श्री बेलसरे सरांकडुनच. सर लेक्चर म्हणा की प्रॅक्टिकल त्यांचा नेहमी मुलांना जास्तीत जास्त चांगलं कसं शिकवता येईल यावर भर असतो. श्री डेरले सर, आम्हाला थर्ड इयरला फार्मास्युटिक्स-3 हा विषय शिकवणार होते. परंतु AICTE च्या डायरेक्टरपदी निवड झाल्याने त्यांच्याकडुन आम्ही तो विषय काही शिकु शकलो नव्हतो. परंतु, सरांकडुन आम्ही एक गोष्ट शिकलो होतो ती रेफरंसिंग कशी करायची अन रेफरंसच मह्त्व काय असतं. पुढे या गोष्टीचा फायदा आमच्या मुलांना एम फार्म करतांना थेसिसच्या वेळी नक्की होईल असं आम्हाला वाटतं.
        एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करायला शिकवणं हे धनेश्वर सरांइतकं प्रखरतेनं आमच्या कॉलेजमध्ये दुसर्या कोणत्याच सरांना जमणार नाही. Asking "Why?" is simple but asking "Why not?" is difficult. याची प्रत्येकवेळी सर जाणीव करुन देतात. आम्हाला कधी-कधी वाटायचं की जर सर वकील असते तर आज नक्कीच उज्वल निकम यांच्यासारखे नावारुपास आले असते. आपलं स्वतःचं खाजगी आयुष्य जगतांना आपण समाजाचंही भान ठेवावं आणि आपल्या समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करावं अशी शिकवण आम्हाला श्री  मिलिंद वाघ सरांच्या कृतीतुन मिळते. कारण सरांचा प्रोफेशनल अन सोशियल या दोन्ही फिल्डवर त्यांनी स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचातुन त्यांनी फार्मसीच्याच नव्हे तर इतर विध्यार्थ्यांसाठी जणु चळवळच उभी केली आहे.
        श्री पिंगळे सरांची साथ तशी आम्हाला कमीच लाभली, कारण मविप्र संस्थेच्या राजकारणात सरांचा सक्रिय सहभाग होता. माणसं कशी जोडावी ते सरांच्या दांडग्या जनसंपर्कातुन आम्हाला कळायचं. सौ. फरांदे मॅडम, नगरसेविका, नाशिकच्या विद्यमान उपमहापौर अन जोडीला मायक्रोबायोलॉजी शिकवण्यात तरबेज असणार्या फरांदे मॅडम आम्हाला आई-वडीलांचे कष्ट विसरु न देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायच्या. स्वामी तिन्ही जगांचा आई-वडिलांविना भिकारीच असतो ही गोष्ट त्यांनी सेकंड इयरला असतांना त्या आमच्या मनावर बिंबवत असत. श्री अनंतवार सर, आमच्या कॉलेजमध्ये सरांना "Mr. Perfection" म्हणुन ओळखतात. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी, जशी सांगितली अगदी तशीच पुर्ण करुन आणायची असं त्यांनी पहिल्या प्रक्टिकलाला सांगितलं. "कल करे सो आज कर आज करे सो अब" अशी सरांची भुमिका आम्ही वर्षभर अनुभवलेली. अगदी लहान-लहान गोष्टींमधील सरांची सुसुत्रता बघण्य़ा सारखीच, वाख्याणन्याजोगी नव्हे तरे ते शिकण्यासारखं होतं. यामुळेच तर पुढे कॉलेजचं जास्तीत जास्त काम कॉलेजमध्येच पुर्ण करायची सवय लागली, आणि उरलेला वेळ मग बाकीच्या स्पर्धा-परिक्षांची तयारी करण्यात सार्थकी लावता आला.
        आता श्री सावकारे सरांबद्दल, सरांचा उल्लेख पुर्वी मॅनेजमेंट गुरु म्हणुन केलेलाच आहे. मुलांमध्ये पॉझिटीव्ह अँटिट्युड डेव्हलप करण्यात सावकारे सरांचा हातखंडा होता. फार्मसीचा अभ्यासक्रम तसा भरपुर..त्यातच आमच्या कॉलेजमधील बरेच मुलं गेट या स्पर्धापरिक्षेसाठी तयारी करत असतात. त्यांचं टेंशन जरा कमी करुन पुन्हा त्यांच्यात नवी उमेद जागवण्यासाठी सर नेहमी प्रयत्नशील असायचे. मुलांना दरवेळी छोटी-छोटी उदाहरणे सांगुन सर मुलांचाचा अभ्यास करायण्याचा जोश वाढवायचे. आमचे सिनिर्यस जसे "जीव तोडुन अभ्यास करा, अन जीव जाईपर्यंत मजा करा" असं सांगायचे, सावकारे सरांचही तसचं फक्त शब्दांमध्ये फरक.! सरांकडुन हा सकारात्मक दृष्टिकोन घेण्यासारखा होता.
        जरा आमच्या बेले मॅडम विषयी, आमच्या कॉलेजमधील सगळ्यात विध्यार्थीप्रिय शिक्षिका. बेले मॅडम ह्या आमच्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या असल्याने कॉलेजमधील प्रत्येक गोष्टींची त्यांना जाण होती. विध्यार्थीवर्गाचा त्यामुळे त्यांच्या बरोबर असलेला बॉंड हा सिनियर-ज्युनियर सारखा बहुतेकवेळा वाटे. काळानुसार वागायची शिकवण आम्हाला बेले मॅडमकडुन मिळाली. पारंपारिक अभ्यासक्रमामध्ये गुरफटतांना विध्यार्थी बाहेर चालु  असलेल्या चालु घडामोडींशी स्वतःला जुळवुन घेत नाही, जणु अभ्यासक्रमामधील पुस्तकी विश्वातच आमच्या कॉलेजमधली मुलं धन्यता मानतात. ह्याची जाणीव बेले मॅडम नेहमीच आमच्या फिल्ड मध्ये घडत असलेल्या नवीन गॊष्टींची माहिती सांगत करवुन देत असत."काळाला अनुसरुण काळाची गरज ऒळखुन वागलात तर काळ तुम्हाला तुमचा वर्तमान भविष्याला सहायक बनेल, नाहीतर तुम्हाला इतिहास जमा करायचं औषध काळाने करुनच ठेवलयं" ही गोष्ट बेले मॅडम पोरांना वारंवार समजवण्यात प्रयत्नशील असतं.
        Honesty is best policy..! असं आम्ही शिकतो ते श्री कावळे सरांकडुनच. कावळे सरांना विध्यार्थ्यांतला प्रामाणिकपणा आवडतो. थर्ड इयरच्या मेडिकेमच्या वार्षिक प्रॅक्टिकलला माझा प्रोडक्ट आलाच नव्हता, मी प्रामाणिकपणे रिकाम्या पॉलिथिनबॅगलाच लेबल लावुन सबमिट केला. पहिले वाटलं की आता आपल्याला मेडिकेमला ए.टी.के.टी लागणार, पण जणु माझ्या प्रामाणिकपणामुळेच मला प्रॅक्टिकलला चांगले मार्क्स मिळाले होते. आपल्या जवळ असलेली माहिती आपल्याला हव्या त्या वेळी सांगता आली पाहिजे अगदी झोपेतदेखील, ही गोष्ट तर शिकावी सौ. कावळे मॅडम यांच्याकडुनच. कारण कावळे मॅडम यांना कोलॉजीच्या सिलॅबसची जणु प्रत्येक गोष्ट तोंडपाठच असं आम्हाला त्या शिकवायला यायच्या त्यावेळी जाणवायचं.
        संयम अन शांती या दोन गोष्टी कुणासारख्या असाव्यात तर त्या श्री अहिरे सरांसारख्या असं आमच्या कॉलेजचा प्रत्येक विध्यार्थी सांगेल. "यार भाऊंकडे एखाद्या रिसर्च सायंटिस्टला लाजवेल इतका संयम भरलेला आहे." असंही मुलं सांगायला कमी करणार नाहीत. आपण काय शिकतो, कशासाठी शिकतो हे समजल्याशिवाय घेतलेलं शिक्षण म्हणजे नुसतं पाट्या टाकण्यासारखं आहे ही गोष्ट आम्हाला शिकवली ती सौ. हरक मॅडम यांनीच. "रिझल्ट महत्वाचा नाही, पण तुम्ही प्रॅक्टिकलला किती समजुन घेतल्यावर परफॉर्म करता हे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठीच महत्वाचं आहे." असं त्या आम्हाला सांगत. डुंबरे सरांची, आम्ही फस्ट इयरला असतांनाच शिक्षकरुपात नवी लाईफ सुरु झाली होती. कर्म करत जा फळाची चिंता करु नका असंच त्यांच्याकडे बघुन आम्हाला वाटतं. आणि हो राहुल शिरोळे सर राहिलेच की, त्यांना समराईज न केल्याशिवाय कसं काय चालेल. आयुष्यात माणसाने नेहमी सिंहावलोकन करावं असंच त्यांच्याकडुन आम्ही शिकलोय खरं. गेले २२ वर्ष ज्यांनी या कॉलेजची शिस्त आणि घडी बसवली होती, ज्यांच नाव ऎकता क्षणीच आमचा इंट्रो घेत असलेले सिनियर्स निघुन गेले होते त्या शेटे सरांना कसं विसरावं, कारण आपल्यावर कोणाचा तरी धाक असावा, आपण स्वतःच स्वतःला शिस्त लावावी ही गोष्ट शिकालोय ते शेटे सरांकडुन.
    असो, ही होती आम्हा फार्मसीच्या विध्यार्थ्यांना घडवणारी शिक्षकांची मजबुत फळी. आमच्या कॉलेजमध्ये सिनियर्संच्या शब्दांना मान आहे, पण त्या सिनियर्संना घडवणारे हात या सर्व शिक्षकांचेच आहेत. कधी आमच्या कडुन एखादी कृती घडते त्यातुन यांच मन दुखावलंच असेल पण काय करणार सर, आम्ही मातीचेच गोळे, तुम्हीच द्या आकार..!

८) अखेर फार्मसी कॉलेजमधील लाईफ संपत आलं..!

        तृतीयवर्षाचा निकाल लागला मागील दोन वर्षाप्रमाणं यंदाही सर्वांना फस्ट क्लास मिळाल्याने आमचा गृप समाधानी होता. संपदा कोरान्ने यंदाही वर्गात पहिली आली होती, सलग ३वर्षी प्रथम येण्याचा तिने मान मिळवला होता जणु फार्माहॅट्रिकच, आणि आता कॉलेजचं जी.एस. पद ही तिला मिळणार होतं, खरचं कौतुकास्पदच गोष्ट होती. इकडे भाऊला बेस्ट सेमिनार झाल्याचं सांगुन देखील ५० पैकी फक्त ३२ गुणचं मिळाल्याने बाकीची मुलं त्याची खेचतं होते. आमच्या सिनियर्सची जणु गोची झाली असं आम्हाला वाटत होतं, कारण GATE , GPAT,& NIPER या परिक्षांमध्ये म्हणावं तसा रिझल्ट लागला नव्हता. दरवर्षी निदान २-३ विध्यार्थी तरी या परिक्षेत पहिल्या दहा मध्ये असायचे पण यंदाचा रिझल्ट आमच्या कॉलेजकडुन अपेक्षित नव्हता. गेल्यावर्षी गॅदरिंगल्या झालेल्या राड्याचे परिणाम थर्ड इयरच्या मुलांनी चांगलेच भोगले होते. त्यांचे १८ विध्यार्थी बायोकेमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्सला नापास झाले होते, त्यामुळे यंदा त्यांचा वर्ग खुपच शिस्तीत वागतोय असं जाणवायला लागलयं.
        असो, एखाद्यावर्षी होतं असं, पण आमच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे आमच्या वर्गातील काहींनी थर्ड इयरला असतांनाचा GPAT देण्याचा निर्णय घेतला होता अन त्यात सर्वच जण क्वॉलिफाय झाले होते. GPATच्या तयारीला आता जय्यत सुरुवात झाली होती. प्राचार्यांनी देखील सर्व शिक्षकांची आणि आम्हा अंतिमवर्षाच्या विध्यार्थ्यांची बैठक बोलवली. कारण सोपच होतं, नेहमी प्रमाणे कॉलेजला GPAT मध्ये चांगला रिझल्ट खेचुन आणन्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं होतं. त्या बैठकीत प्राचार्यांनी विध्यार्थ्यांना लायब्ररीचा वेळ वाढवुन देऊ, ओपन बुक टेस्ट, शिक्षकांनी मुलांसाठी M.C.Q. Question bank तयार करणं, अशा प्रमुख बाबींचा समावेश होता. पण त्या बैठकीत एक गोष्ट सतत सलत होती की आमच्या कॉलेजमधल्या शिक्षकांचा मुलांनी फक्त GPAT वरच लक्ष केंद्रित करावं यावर भर जास्त होता. ट्रेंड बदललाय सर..असं सांगायला आम्हा मुलांची हिम्मतही होतं नव्हती, कारण आमच्यातील कित्येक जण M.B,A./ U.P.S.C-M.P.S.C. साठी थर्ड इयरपासुनच अभ्यासाला लागले होते. भाऊ, प्रियंका, संपदा यांचा G.R.E. चा चांगला स्कोर आल्याने ते परदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्याकरता प्रयत्नशील होते. त्यामुळे साधारण ४०-४५ मुलंच GPAT देणार होते.
        Keep the best for the last या प्रमाणेच आमच्या शिक्षकांची वर्गवार विभागणी केली असावी, कारण आम्हाला अंतिमवर्षासाठी शिकवायला संजय वाघ सर, बेलसरे सर, मिलिंद वाघ सर, कावळे सर, कावळे मॅडम, अहिरे सर, बेले मॅडम यांच्याबरोबर पाल सर आणि गुडसुरकर सरही शिकवणार होते. पाल सर आमच्या कॉलेजमधले सर्वांत विध्यार्थीप्रिय शिक्षक, तर गुडसुरकर सर सर्वांत आदरणीय.पाल सर आम्हाला Pharmacognosy-3 हा विषय शिकवणार होते. सरांची शिकवायची पद्धत एकदम हटके..सर वर्गात येतात ते प्रसन्न चेहर्यानेच..मुलंही मग हसतच त्यांना गुड मॉर्निंग करणार, जणु आदरणीय बाळासाहेब ठाकरें प्रमाणे सर हात समोर करुन मुलांना बसायला लावणार. आणि मग सुरु करणार शिकवायला फार्माकोग्नोसी-3.
        तसं पाहिलं तर फार्माकोग्नोसी हा विषयचं आम्हा फार्मसीच्या मुलांचा नावडता. अमुक अमुक क्रुड ड्रग त्याची सिननिम, त्याचा बायोलॉजिकल सोर्स, जियोग्राफिकल सोर्स, कल्टिवेशन मेथड, त्याचे मॅक्रो अन मायक्रोस्कोपिकल कॅरॅक्टर्स, केमिकल कॉन्सटिट्युएन्ट्स, अडल्टट्रंट्स, केमिकल टेस्ट आणि त्याचा उपयोग, असं लक्षात ठेवावं लागतं असं एकाच नाही तर जवळ-जवळ १५०-२०० ड्रग्स आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी गोंधळ अन शेवटी कंटाळाच येतो, पणं पाल सरांची कंपॅरिझन करुन शिकवायची पद्धत या सर्वांना इंटरेस्टिंग बनवते, शिवाय सरांचा प्रत्येक ड्रग साठी खास कमेंट तयार असतोच, त्यामुळे शिकवलेली प्रत्येक गोष्टी लक्षात राहण्यास मदतच मिळते.
        गुडसुरकर सर एकदम शांत स्वभावाचे सर आहेत, तसेच वेळेच्या बाबतीतही ते एकदम पक्के आहेत. वेळच्या वेळी लेक्चरला येणं, अण वेळेतच लेक्चर पुर्ण करनं ही गोष्ट आम्हाला फायनल इयरला आल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच जाणवली. सर लेक्चरला जेव्हा शिकवायला येतात तेव्हा आम्हा मुलांसाठी ते काय शिकवतात यापैकी काय लिहु अन काय लिहु नको असं होतं कारण प्रत्येक गोष्ट महत्वाची असतेच G.P.A.T. & N.I.P.E.R.च्या दृष्टीने. प्रॅक्टिकलला देखील सरांनी को-ऑर्डिनेटर नेमुन दिलेला असतो..त्यामुळे प्रॅक्टिकलची चिंता करायचं टेंशन नसतं. आमच्या A-बॅचचा मी अन अतुल को-ऑर्डिनेटर्स आहोत.
        तीन वर्ष हातात होते तेव्हा काही केलं नाही अन आता आमच्या वर्गात कित्येकांच्या मनात प्रेमकळी खुलायला सुरु झाली. A small hope is sufficient to cause a birth of love,याच प्रमाणे आमच्या वर्गात सध्या अभ्यासाच्या टेंशन बरोबर प्रेमाचा रंगही उधळला जातोय. त्यातल्या त्यात प्रसाद माळी अन विशाल गुरव यांना सोडलं तर बाकी सुशिलरत्न साळवे (शायर), राहुल साठे, अनुप छतवानी, रमेश गोरड यांसारखे बरेच एकतर्फी प्रेमवीर आमच्या वर्गात तयार झाले आहेत. शंतनुच्या मनातही यंदा वसंत फुलु लागलाय, असं त्यानं आम्हाला सांगितलं अन मुलींनाही त्याची भनक लागली. पण गेले तीन वर्ष "स्वतः भाऊ" असं म्हणवुन घेत असलेल्या शंतनुला तीने भाऊ म्हंटल्यावर शंतनुचं कसं व्हायचं, यावर आम्ही त्याला जेवतांना चिडवतं असतो, तर दुसरीकडे तीला सुद्धा शंतनुच्या नावानं खुल्म-खुल्ला चिडवलं जातयं बरं का!.
        अमेय तीन वर्ष आहे तसा आजही वर्गात झोपतचं असतो, कावळे सरांना कधी-कधी अनावर होतं, पण "रोज मरे त्यामागे कोण रडे" याप्रमाणे मग सर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. नित्याच्या पदरी ह्यावर्षी देखील उपेक्षाच पडल्याने, निदान आता तरी मुलींवर लक्ष न देता अभ्यासावर लक्ष दे असं त्याला  निळकंठ, नितीश, हितेश ही मुलं समजवतांना दिसतात. अमेयने हल्ली जणु वर्गात प्रवचन करायचा साइड बिझनेस सुरु केलायं असं आम्हाला वाटायला लागलयं अन त्यातल्या त्यात नितीन आखाडे, रोहिणी चव्हाण, उज्वला देसाई, अनुप छतवानी हे तर त्याचे आवडते भक्त गण झाले. उज्वला आणि रोहिनी यांच्याशी तो प्रॅक्टिकलला गप्पा मारत बसतो, आणि नंतर मग आम्हाला जेवतांना त्याचा सारांश सांगत असतो.
        आधी अमेय मुलांना गुंडाळतोय असं वाटायचं, पण ज्यादिवशी त्याने त्याच्या कामगिरीचा व्हिडियो आम्हाला दाखवला होता, त्यादिवसा पासुन मग मुलं."अमेय बाबा की जय.." असंच म्हणायला लागली. हितेशला तर तो लव्हगुरुच वाटायला लागला. शंतनुच्या मते अमेय मुलांच्याच काय पण मुलींच्या अन शिक्षकांच्या डोळ्यातही धुळ फेकण्यात यशस्वी झालायं (बेळे मॅडमच्या डोळ्यांत जरा जास्तच). त्यामुळे आम्ही त्याला आता अमेय कमी अन वाळु माफिया म्हणुनच आम्ही हाक मारतो. काही म्हणा फस्ट टु फायनल इयरच्या मुलींना अमेय एकदम आयडियल"..."वाटतो. पण आम्हाला माहिती आहे की अमेय किस भवंडर का नाम है..! आमच्या फार्मसीच्या शब्दांत सांगायचं तर अमेयनं कित्येक मुलांच्या पोटावर पाय देऊन टाकलाय.
        हल्ली निखील दिवाकरही कविता करायला लागलायं, पण कोणत्या मुलीवर करतोय हे सांगायला तो तयार नाही. निळकंठला तर पक्क वाटतं की त्याला ओवीच आवडते. सेकंड इयर पासुन आमच्या वर्गातली ओवी पहिले हितेशला आवडायची, पण नंतर हळुहळु या यादीत स्वप्निल येवले, नितीन आखाडे, अनुप छतवानी, विशाल गुरव, ओबेद उल्ला यांचा समावेश झाला. त्यातही विशाल गुरवने चार दिवसांसाठी यांच्या पोटावर पाय दिला, पण नंतर जणु, "चार दिनोंका प्यार ओ रब्बा, लंबी जुदाई..लंबी जुदाई." अशी स्थिती तयार झाली. कारण अनुप छतवानी आणि ओबेदने पावडरमॅनला म्हणजे विशाल गुरवला चोपलं होतं. नितीनने थर्ड इयरच्या शेवटी ओवीला प्रपोझ केलं असं त्याने नितीशला सांगितलं होतं, आणि नितीश कडुन आम्हाला कळणार नाही हे तर शक्यच नव्हतं. पण ओवीनेही मोहिनीप्रमाणे त्याला आपण मित्रच ठिक आहोत असं जेव्हा सांगितलं तेव्हा नित्या डिप्रेस झाला होता. त्याचा सहारा झाला होता आमचा वाळु माफिया अमेय.
        नितीन त्याला त्याचं सगळं काही सांगत बसला, आणि अमेयला तो ओवीला समजवण्यासाठी काहीतरी कर असं सांगत होता, पण अमेयनंच जेव्हा उज्वलात इंट्रेस्ट घेतलायं, अशी बातमी आमच्या वर्गातल्या मुलांमध्ये पसरली त्यावेळी मग ओवी ज्यांना आवडायची त्या यादीत फक्त अमेयचच नाव राहिलं, आणि बाकीच्यांनी मग, "मरना है तो देश के लिए, इन लडकियोंमे रखा क्या है..!" याप्रमाणे अभ्यासाला जोरदार सुरुवात केली. होस्टेलाईट मध्ये लक्ष्मीकांतला जणु टेंशन यायला लागलं असं वाटतयं कारण नितीश अन हितेश हे दोघही करियरच्या टेस्ट सिरीजमध्ये बाजी मारयचे. सिनियर्सच्या सांगण्यानुसार जे मुलं करियरच्या टेस्ट सिरीजमध्ये चांगले मार्क्स पाडतात, त्यांना GATE मध्येही चांगले मार्क्स मिळतात.
        घनकर गल्लीत राहणारे विजय, अनिकेत, येवले, M.B.A. च्या अभ्यासात चांगलेच गुंतलेले आहेत. आमच्या वर्गातल्या काही मुलींनी बोचरे या सिनियर्सचा क्लास लावलाय, तर दुसरीकडे आमच्याच काही सिनियर्सनेही "पायोनियर" यानावाने कोचिंग क्लास उघडले. आमच्या लोकलाईट्सची जी.एस.फार्माचं लोन देखील अल्पावधीतच आमच्या कॉलेजमध्ये नाहीच तर भुजबळ नॉलेजसिटीतही पसरलयं. दिवाळीची सुटी संपली, आणि सुटीनंतर कॉलेज सुरु झालं त्याच दिवशी म्हणजे २२-नोव्हेंबर-२०१०ला, "स्वप्निल तु तयार केलेले M.C.Q. खरचं खुप अवघड होते बरं का..!" असं काव्या बोलली. सेकंड इयरच्या गॅदरिंगनंतर पहिल्यांदाच आता ती माझ्याशी बोलली होती, तब्बल पाऊने दोन वर्षांनंतर. सेकंड इयरच्या गॅदरिंग नंतर तिला सांगायचं होतं काही, पण कधी नंतर हिम्मत केली नाही. दरम्यानच्या काळात पुलाखालुन बरचं काही वाहुन गेलं, पण त्यावेळी ज्या भावना होत्या, आजही त्या तशाच मनाच्या एका कोपर्यात जपुन ठेवल्या आहेत, कामी येतात कधी तरी माझ्या कवितांना प्रेरणा देण्यासाठी.
        बेलसरे सरांच्या लेक्चरला नेहमी प्रमाणे शिकायला मिळतंच पण "Don't talk in front of my back, I mark any one of you absent " असं ऐकल्याशिवाय आता लेक्चरला मजाच येत नाही. सरांची नोट्सची डायरी जर आपल्याला मिळाली तर मजा येईल यार असा विचार आमच्या मनात सर जेव्हा S.A.R. शिकवतात त्यावेळी वाटतं असतं. सर IUPAC name सांगायला वर्गात ऊठवतात, त्यामुळे मुलांना टेंशन असतं. जो तो त्याच्यासाठी सेफ जागा निवडत असतो. मुलींना सर कधीच प्रश्न विचारत नाहित त्यामुळे त्यांना काळजी करायचं कारण नसतं. नितीशला मात्र सर नेहमी ऊठवतात, आणि आज आपण वाचलो या हेतुनं आम्ही मोकळा श्वास घ्यायला मोकळे असतो.
        वाघ सर आम्हाला N.M.R. हा टॉपिक शिकवायला येतात. सरांच्या तोंडातुन जे रुल्स बाहेर पडतात ते कोणत्याच पुस्तकात नसतात, त्यामुळे आम्हाला ते लिहुनच घ्यावे लागतात. प्राचार्य असल्याने सरांना आमच्या वर्गावर सहसा येता येत नाही, त्यामुळे कधी कधी सौ. हरक मॅडम आमच्या वर्गावर शिकवायला येतात, पण त्यांनी शिकवत असलेल्या आणि वाघ सरांच्या N.M.R. चे problems शिकवण्यात फरक दिसतो तो अनुभवाचा. कावळे मॅडम तीन महिने रजेवर असल्याने त्यांच्याऐवजी एम.फार्मचे तोडमल सर आम्हाला शिकवण्यासाठी येत, पण आम्ही ऑफ माघुन घ्यायचो, अन आम्हाला ऑफ मिळायचा. अहिरे सर आणि बेळे मॅडम आम्हाला Pharma-jurisprudence हा विषय शिकणार होते. अहिरे सर मुलांना थोडावेळ शिकवतात अन उरलेला वेळ मुलं मग त्यांचा त्यांचा अभ्यास करत बसतात, नाहीतर वेगवेगळ्या गप्पांना रंग येतो.
        बायोफार्मास्युटिक्स हा विषय शिकवण्यासाठी आम्हाला श्री मिलिंद वाघ सर येतात. मिलिंद वाघ सर देखील याच कॉलेजचे माजी विध्यार्थी आहेत. शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचात ते सक्रिय कार्यकर्ते म्हणुन कार्य करत आहेत. नुसत्या फार्मसीच नव्हे तर इतर फिल्डमधल्या विध्यार्थ्यांसाठी ते या मंचाच्या सहाय्याने मदत करतात. सरांची शिकवण्याची पद्धत एकदम निराळी, मुलांमध्ये मिसळुन मुलांकडुन मुलांना शिकवण्याची पध्दत आम्ही गेल्या तीन वर्षानंतर पहिल्यांदाच अनुभवत होतो. सहाजिक एखादी नवीन चांगली गोष्ट होत असली की तिला सुरवातीस थोडा विरोध होतोच. सर एखादा टॉपिक वाचयचे आणि त्यावर मुलांना कमेंट करायला लावायचे, आता भाषेचं बंधन नसलं तरी आमच्या कॉलेजच्या मुलांना सहाजिकच ते आवडत नव्हतं. मग सहाजिकच मुलांना ते लेक्चर "टेरर" वाटायचं.
        मिलिंद वाघ सर आमच्या वर्गाकडे येतांना दिसली की मुलं टेरर-टेरर असं ओरडत वर्गात शिरायची अन सरांची नजर आपल्यावर येऊ नये म्हणुन अंग चोरुन बसायची. ३,७,२०,२२,२५,२७,३३,३६,४३,४७,५३,५५,६३ हे जणु सरांचे आवडते रोल नंबर असावेत कारण ह्याच रोल नंबरवाल्यांना सर कमेंट करायला किंवा उत्तर द्यायला सांगत. पण हळुहळु आमच्या वर्गातील मुलांना एका गोष्टीची जाणीव व्हायला लागली, आपण आपलं मत तर मांडायला शिकतोय, आणि महत्वाचं म्हणजे उत्तर आलं नाही की मेडिकेमच्या लेक्चरला जसं बाहेर जावं लागतं तसला प्रकार तर या लेक्चरला मुळीच होत नाही. मग तेव्हापासुन ते टेरर वाटणारं लेक्चर आम्हाला टेरिफिक वाटु लागलं ही गोष्ट विशेष करुन मला इथे नमुद कराविशी वाटते.
        पाल सरांच्या प्रॅक्टिकलला जाम मजा येत असते. सर आम्हाला जो एक्सपेरिमेंट करायचा त्याची माहिती देतात आणि थोड्यावेळाने सर लायब्ररीत निघुन जातात. अमेयला मग रोहिणी अन उज्वला यांच्याबरोबर गप्पा मारण्याशिवाय दुसरं काम नसतं. बाकी मुलं त्याला "आरे आज किती पाट्या धुळ घेऊन आलासं?" असं म्हणुन चिडवत असतात. माझा तर जर्नल पुर्ण करायचा दणका असतो. फायनल इयरला आल्यावर मला सिंसियर असल्याचा घमेंड नाही तर माजच आलायं असं काहींना हल्ली वाटतं. दिवाकर त्याचा त्याचा टी.एस. काढण्यात रमलेला असतो कधी कधी निलेशही त्याच्याजोडीला असतो. रमेश खाली मांडी घालुन हातातल्या पुस्तकाला वाचत असतो, जमलंच तर कधी कधी आम्ही त्याला श्रद्धाच्या नावाने त्याला चिडवत असतो.
        अतुल काय गेल्या तीन वर्षांप्रमाणे आजही मुलींशी फारच कमी बोलतो. पंक्या सांगितलेल्या गोष्टी विसरुन जातो, हे माहिती असल्याने अनुप छतवानी त्याला त्याची दर्दभरी "दास्तान" सांगत असतो. विश्वजीत दाडगे केव्हा लॅबच्या आत राहिल आणि केव्हा लॅबच्या बाहेर याचा कुणालाही थांग पत्ता नसतो. विशाल गुरव(पावडर मॅन) त्याचे पाणचट जोक्स अम्रिता, अनामिकाला सांगत असतो, हिना जाधवला त्यातलं काही कळतच नसावं अशी आम्हाला पक्की खात्री आहे, कारण त्याच्या जोक्सवर जेव्हा त्यादोघी हसतं असतात, हिचा चेहरा एक्सप्रेशनलेसच असतो. राहिला नितीन, तर तो विकासला घेऊन जरनल लिहीत बसतो. गेल्या तीन वर्षात मिळालेल्या धक्क्यातनं नित्या आता जरा स्वतःला सावरायचा प्रयत्न करतोय, त्यात कितपत यश येतं हे त्यालाच ठाऊक. एखादा तास झाला की मुलं चहा प्यायला बाहेर जातात, सरांनी पकडलं तर काय होईल, ह्याचा विचार करुन आम्ही कॉलेज सुटल्यावरच दानशुर संपत पगारे चौकातच चहा पिऊ असं पंक्याला सांगत असतो.
        आमच्या ए बॅच मध्ये जशा गमती जमती घडतात तशा बाकीच्या बॅच मध्येही घडत असतात. बी बॅचमध्ये तीन-चार ग्रुप पडलेले आहेत असं त्या बॅचच्याच मुलांच म्हणनं आहे. एक आहे मोनाली जगतापचा, एक के गॅंग, आणि एक मुलांचा. बी बॅच मध्ये जणु गॅंगवॉर चालु आहे असं राहुल नारखेडेचं पक्क मत आहे. मोनाली आणि युवराज दोघही को-ऑर्डिनेटर असल्याने, ते के गॅंगच्या मुलींना जास्त काम वाटुन देतात असं नेहमी होत असतं. आता के गॅंग ही काही मुलांची नाही तर मुलींचा ग्रुप आहे बरं का. त्यांना तसं नाव दिलं कारण त्यांच्यातल्या प्रत्येक मुलीचं आडनाव हे "के" या अक्षराने सुरु होतं, जसं, मनाली कोरंगळेकर(मना), प्रियंका कुलकर्णी (पी.के.), संपदा कोरान्ने (एस.के.), अपुर्वा कुलकर्णी (ए.के.), प्रिया कोठारी, मयुरी कुलकर्णी ही त्यामुलींची नावं. या ग्रुपमध्ये प्राजक्ता जोशी, दिप्ती साळवे यांचा पण समावेश आहे बरं का.! मुलांचा ग्रुप काय ह्या दोघांच्या मध्ये तरंगता असतो.
        सी बॅच तशी पाहिलं तर सर्वात सुखी बॅच आहे. यांच्या बॅचमध्ये एखादा निर्णय झाला की सर्व मुलं त्यावर ठाम असतात. आमच्या ए बॅचच्या एकदम विरुद्ध टोक असलेली ही बॅच. मुलांना प्रॅक्टिकलचं टेंशन नसतं, जरनलही आमच्या नाहीतर बी बॅचच्या मुलांचे कॉपी करायचे, प्रॅक्टिकलही एकाच ग्रुपमध्ये अख्या बॅचने करायचं, चंगळ आहे खरचं..! या बॅच मध्ये मुलांची संख्या जास्त आणि मुली फक्त तीनच आहेत. त्यातही प्रियंका पाटील आणि श्रुती रुपनार या त्या तीनपैकी दोघी. आमच्या वर्गातल्या सर्वात शांत मुली आहेत असं आमच्या ए बॅचला वाटतं.
        ही तर झाली आमच्या वर्गातली सध्याची स्थिती. हल्ली लेक्चरही सुरळीत चालु झाले आहेत. आता आम्ही एकदाचे सिनियर्स झालोत, त्यामुळे आमच्या फस्ट इयरच्या जुनियर्सला चांगली फ्रेशर्स पार्टी देण्याचा विचार केला होता. तोही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच, पण ऐन आमची फस्ट सेशनल आल्याने सगळं फिस्कटलं  होतं. ५ सप्टेंबरही यंदा जल्लोषात साजरा झाला. नेहमीप्रमाणे मुलं तयारीत आली होती. प्रत्येकवर्गात जाऊन आम्ही आमच्या ज्युनियर्स बरोबर गप्पा मारत होतो, आम्हाला जे अनुभव येत होते ते त्यांना सांगत होतो, ते सुद्धा त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते. सेकंड इयरच्या श्रेयस बागल(गुरुजी) या आमच्या जुनियरने वाघ सर, अनंतवार सर, धनेश्वर सरांची तुफान मिमिक्री केली होती. त्याच्या मिमिक्रीचा व्हिडीओ हितेश बडगुजर त्याच्या नव्या मोबाईलमधुन काढत होता, पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्या व्हिडीओमध्ये बागलचा कमी आणि याच्या हसण्याचाच आवाज जास्त येत होता.
        असो, फस्ट इयरच्या वर्गात अमेयची जादु मुलांपेक्षा मुलींवरच चालली होती. कारण मैथिली नावाची फस्ट इयरची मुलगी त्याच्या जणु प्रेमातच पडली. दुसरीकडे, थर्ड इयरच्या सायली कासारला होस्टेलचे मुलं जवळ-जवळ अर्धा ते पाऊणतास प्रश्न विचारण्यात गुंग होते. सेकंड इयरच्या प्रॅक्टिकलला रमेश गोरडला सर बनुन जायचं होतं, कारण त्याला सेकंड इयर मधली भावी ड्रग इन्सपेक्टर श्रद्धा आवडत होती. आणि त्यानिमित्तानं तिच्याशी त्याला बोलताही येणार होतं, मुलांनी त्याला पुरता हरभर्याच्या झाडावर चढवलं होतं, पण तीला जेव्हा व्हायवा साठी बोलवलं तेव्हा हा तिला नायपरला गेलेल्या सिनिरर्सची नावे विचारायला लागला, सांगायचे होते काही, ऐकायचे होते काही, पण पोरगा भलतेच प्रश्न विचारत असल्याचं पाहुन मग बाकीचीच मुलंच तिला प्रश्न विचारायला लागली, अन सहाजिक याने स्वतःच त्याच्या पोटावर पाय पाडुन घेतला होता.
        यंदा ५-सप्टेंबरच्या आधी देऊल प्रत्येक सरांचे जाऊन फोटो काढत होता, त्यामुळे आपले फोटो याने कशासाठी काढले याचं प्रत्येक सरांना कुतुहल होतं, पण त्याने त्याची एक मस्त मुव्ही क्लिप बनवली होती. ती माझ्या ब्लॉगवरपण आहे बरं का. यंदा पहिल्यांदाच शिक्षकांवर म्युझिकल फिशपॉंड्स टाकण्यात आले होते. शिक्षकांसाठी संगीतखुर्चीचा कार्यक्रमही ठेवायचा निर्णय मुलींनी घेतला होता. आमच्या वर्गातल्या मुलींनी स्वतःच्या हाताने शिक्षकांसाठी त्या कार्यक्रमाच्या सुंदर निमंत्रण पत्रिका तयार केल्या होत्या. आमच्या कॉलेजच्या मुलांना वेळेचं महत्व कळावं यासाठी आमच्या वर्गातर्फे कॉलेजला एक चांगलं घड्याळ भेट म्हणुन देण्याचं ठरलं होतं. शिक्षकदिनाच्या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये होती ती देऊलनं बनवलेली क्लिप आणि माझं मनोगत. त्यादिवशी मी खरं तर भाषणच केलं पण आमच्या एम.फार्मच्या मुलांना ती कविता कशावरुन वाटली हे मला कळलंच नव्हतं. त्यादिवशी मी त्या आठ मिनिटांच्या मनोगतात आमच्या सरांबरोबर आलेले अनुभव सांगत होतो. वाघ सर, सावकारे सर, डुंबरे सर, बेलसरे सर, आणि पाल सरांची मिमिक्री मला जमते त्याचाच आधार मी माझे मनोगत प्रभावीपणे मांडण्यासाठी केला होता. भाषण चांगलं झालं होतं, पण मला सरांना काय वाटेल याचीच जास्त चिंता लागली होती. पण दुसर्याच दिवशी भाषणात काही ऑब्जेकशन घेण्यासारखं काही नव्हतं असं जेव्हा मिलिंद वाघ सरांनी सांगितलं तेव्हा माझ्या जीवात-जीव आला होता.
        आमची सेशनल परिक्षा झाली आणि मग आम्ही फ्रेशर्सच्या तयारीला लागलो, आमच्या कॉलेजमध्ये कोणताही कार्यक्रम करायचा असला तर मुलांसमोर प्रश्न असतो तो क्वॉंट्रीचा. हा यक्ष प्रश्न सोडवल्याशिवाय पुढचं काहीच करता येतं नाही. शेवटी प्रत्येकी २००/-रुपये सर्वांनी देणे हा निर्णय झाला. त्यातही काही फुकटे होते त्यांच काय करावं हाही प्रश्न असायचाच. केटरिंग, डी.जे. सर्व बुक झाले होते, फस्ट इयरच्या मुलांची स्क्रिनिंगही झाली होती. पण फ्रेशर्स पार्टीला दोन दिवस बाकी असतांना आमदार वसंत पवार यांच निधन झाल्याची वार्ता आली, त्यामुळे पुन्हा फ्रेशर्स पुढे ढकलली ती पार पडली चक्क ३ डिसेंबरलाच..
        फ्रेशरला आम्ही नाटक सादर करायचं ठरवलं होतं, Back to First year B.Pharm. कधी नव्हे ते यंदा आम्हाला नाटकात मुलींना काम करण्यासाठी जास्त आग्रह करावं लागला नाही. कारण मागील दोन वर्ष आम्हाला मुलींना नाटकात काम करण्यासाठी तयार करण्यात चांगली मेहनत करावी लागायची. कारण आम्ही नाटकात मुलींना कमी संवाद देतो, हे त्याचं कारण. यंदा आमच्या नाटकाची मुख्य हिरोइन अनामिका काम करणार नव्हती. अन बी बॅचच्या मुली यंदा तयार झाल्याने मग अनामिकासाठी पर्याय उपलब्ध झाला होता. अनामिकाला मी खास महत्व देतो कारण ज्यावेळी आम्ही सेकंड इयरला पहिल्यांदा नाटक करणार होतो, तेव्हा आमच्या वर्गातल्या बाकीच्या मुली तयार झाल्या नव्हत्या, अशा स्थितीत आमचं नाटक करता येणं शक्य नव्हतं त्यावेळी अनामिका आमच्या नाटकात काम करण्यासाठी तयार झाली होती.
        बाकीच्या मुलींनी जे कारणं देऊन नाटकात काम करायचं टाळलं होतं त्यांना तीने छेद दिला होता. त्यामुळेच मी जेव्हाही नाटक लिहितो, नाटकात हिरोईन म्हणुन अनामिकालाच मुलीचा रोल देण्याच्या हिशोबाने लिहितो. असो, यंदा नाटकात प्रियंका कुलकर्णी काम करणार असल्याने आमचा भाऊ म्हणजे शंतनु फारच खुष झाला होता. कारण फायनल इयरला आल्यावर शंतनुला प्रियंका आवडायला लागली होती. नाटकात सायलेंट गर्लफ्रेंड ही नवी कंसेप्ट टाकली होती, याचं बी बॅचच्या मुलींना नवल वाटत होतं. पण फ्रेशर्स पार्टी पुढे ढकल्यामुळे आमचा नाटक करायचा मुड गेला. भाऊला वाईट वाटलं होतं, पण गॅदरिंगला नक्की मोठं नाटक करुया अन तेही त्याच्या अपोझिटला प्रियंका कुलकर्णीलाच घेऊ असं सांगितल्यावर कुठे त्याला बरं वाटलं होतं.
        असो, फ्रेशर्स पार्टीचं नावं आमच्या वर्गातल्या मुलांनी, "जल्लोष बेधुंद मनांचा" असं ठरवलं होतं. दरवेळी होतो तसा यंदाही कार्यक्रम जरा उशीराच सुरु करावा लागला होता. यंदा रावसाहेब थोरात हॉलमध्ये पार्टी असल्याने मुलांना बरं वाटलं होतं. यंदा फ्रेशर्स पार्टीचं पहिल्या भागाचं सुत्रसंचालन मी अन प्रसाद माळी करणार होतो, स्क्रिप्ट मीच लिहली होती, रजनीकांत वर आधारित. प्रसाद माळी बरोबर मी कसं काय सुत्रसंचालन करायला तयार झालो याचा प्रश्न आमच्या गृपच्या मुलांना पडला होता. पण शेवटचे काही महिने राहिले त्यामुळे कोणाचं मन का दुखवावं याचा विचार करुन मी त्याच्याबरोबर सुत्रसंचालन करण्यासाठी तयार झालो होतो. कार्यक्रमाचा श्री गणेशा थर्ड इयरच्या सुष्माने तिच्या सुंदर नृत्याविष्कारानेच केला. तिने अप्रतिम शास्त्रीय नृत्यातुन गणेश वंदना सादर केली होती.
        नंतर आमच्या वर्गातल्या मुलींचा फ्युजन डान्स झाला, आणि आमच्या वर्गातली मुलं कंफ्युज झाली. कारण ज्या मुलींनी गेल्या तीन वर्षांत स्टेजवर येण्याचं धाडसही दाखवलं नव्हतं त्यांनी यंदा "जोर का झटका हाय जोरोंसे लगा.." यावर डान्स करुन मुलांना चांगलाच  झटका दिला होता. मनोज जावरेनेही "रोबोट डान्स" केला होता. विकासने "तेरे मस्त मस्त दो नैन," हे गाणं म्हंटलं, आणि तेही राहत फतेह अली खान यांच्या साथीनेच.. तुम्हाला मी काहीतरी सांगतोय असं वाटेल, पण आमच्या कोळसे भाऊंनी जिथुन कराओके करुन आणले होते, इतके थर्ड क्लास केलेले होते की सिंगरचा आवाज मध्ये मध्ये येतचं असायचा, आता कळलं असेल की विकासने राहतजींच्या जोडीने कसं गाणं म्हटलं. यंदा फिश पॉंड्सही होतेच, त्यातही आमच्या वर्गातल्या रोहिणी आणि उज्वलावरच जास्त होते. रोहिणी वर सुशील साळवे आणि राहुल साठे यांच्या कडुन, तर उज्वलासाठी आधी सांगितलेली यादी होती. दिवाकरनेही बहुतेक त्याला आवडणार्या सगळ्या मुलींवर एक कविता केली, पण त्यावेळी मी ती वाचण्याचं टाळलं कारण ती कविता मीच केली असणार असं आमच्या वर्गातल्या मुलींना वाटलं असतं, कारण दिवाकरही कविता करायला लागला हे फक्त त्यावेळी मला माहिती होतं.त्याची ती कविता अशी होती:-        
        "रोहिणी" नक्षत्राच्या पहाटी,
        शांततेत "प्राजक्ता"च्या फुलांचा सुवास दरवळला,
        "अम्रिता" पडावा तसा फुलांचा सडा पडला
        प्रियकराला वाटे आपल्या "प्रिया"स भेटावे,
        तसा अलगद माझा "अनामिका"चा स्पर्श त्या फुलांना झाला,
        तेवढ्यात अशा रोजच्या "उज्वला"ला जाग आली,
        या "अपुर्वा"च्या स्वागतास धरती जागी झाली..!
रोहिणी, प्राजक्ता, अम्रिता, प्रिया, अनामिका, उज्वला आणि अपुर्वा ही आमच्या वर्गातल्या काही मुलींची नावं आहेत, ज्या आमच्या वर्गातल्या जास्तीत जास्त मुलांना आवडायच्या. आता अभ्यास एके अभ्यास हेच धेय्य मुलांच्या नजरे समोर आहे.
        फ्रेशर्स पार्टीत जेवण झाल्यानंतर होस्टेलाईट्सचे दोन नाटक सादर झाले. एक होतं खेड्यातल्या बोगस डॉक्टरांवर, आणि एक होतं शिवरायांवर आधारित. होस्टेलचे मुलं वेशभुषा करण्यात जास्त भर देतात, जरीवाल्याकडुन भाडे तत्वावर कपडे घेऊन येतात, त्यांना त्या कपड्यात बघितलं की बघणार्याला वाटतं, यांच नाटक एकदम जबरदस्त असेल, पण बडा घर अन पोकळ वासा अशी त्यांची स्थिती असते. त्यांच्या नाटकाला ना प्रस्तावना, ना नाव, आणि पात्र परिचय, सगळं आपल्यालाच समजुन घ्यावं लागतं; विषयही भरकटतच चालतो. फक्त सगळे संवाद तोंडपाठ असतात, आणि ते म्हणतांना ते चुकत नाही एवढीच एक त्यांच्या नाटकातील उल्लेखनीय बाब असते.
        श्रेयस बागल आणि त्याचा साथीदाराने चांगल सुत्रसंचालन केलं होतं. आमच्या देऊलभाऊंचा स्टॅटिक डान्सही चांगला झाला होता, अन तोही वन्स मोर मिळवुनच. या दरम्यान फस्ट इयरच्या मुलांची फायनल स्क्रिनिंग झाली, त्यातुन मयुर जाधव हा मि.फ्रेशर्स तर मुली मधुन हुमाला मिस. फ्रेशर्स म्हणुन निवडण्यात आलं. संपदाने मि. आणि मिस. फ्रेशर्स साठी मुकुट आणले होते, त्यावर छोटे लाईट लावलेले होते, त्यामुळे होस्टेलची मुलं, "कालिकेच्या जत्रेतुन आणेल का गं..?" असं ओरडत होते. असो, आम्ही तर मस्त मागे बसुन मजा करत होतो. म्युझिकल फिश पॉंड्सला चांगलेच कमेंट घसाफोड करुन पास करत होतो. एकुणच काय तर फ्रेशर्स पार्टी चांगलीच झाली होती. पार्टी संपल्यानंतर रनरअप ठरलेल्या श्रीरंगला हितेशनं पार्टी मागितली ती सुद्धा चहाची, पार्टी नव्हती जणु जबरदस्तीच होती असं म्हंटलं तरी चालेल, मग आम्ही समर्थ मध्ये जाऊन पाऊण तास चहा पित बसलो, कारण तिथेही गप्पांना चांगलाच रंग आला. श्रीरंगहा प्रियंका कुलकर्णीचा मावसभाऊ असल्याने मुलं आता शंतनुला चांगलीच चिडवत होती. शंतनु पण काही कमी नव्हता, त्यानेही मग अमेयला टार्गेट केलं, मग अमेयने हितेशला अशा आमच्या कॉलेजगप्पांना ऐन रंगात असतांना, माझं घडयाळात लक्ष गेलं, आणि मग, "चलो भाई लोग..सायट्रिकची वेळ झाली.."असं म्हणत मग मी नितीश, हितेशला निघायला लावलं. फस्ट इयरपासुन मी आजपर्यंत मी कॉलेजला येतांनाही आणि कॉलेज सुटल्यावर देखील सायट्रिक मार्गे जाणार्या बसनेच घरी जातो, कधी चुकवत नाही.
        यंदाही ओथुर येथे व्हॉलिबॉलच्या स्पर्धांच आयोजन केलेलं होतं, आमची चांगली प्रॅक्टिस चालु होती, अन तेही गेल्या वर्षी तिथे जाण्याची परवानगी मिळाली तशी यावर्षी देखील मिळेल हे ध्यानात घेऊनच. पण आमच्या पदरी यंदा निराशा आली, कारण प्राचार्यांनी सरळ तिथे जायची काही गरज नाही, GPAT & GATE च्या परिक्षेचा अभ्यास करा असं बजावुन सांगितलं. मग आम्ही सावकारे सरांकडे गेलो, सावकारे सर मागीलवर्षी स्पोर्ट्स इनचार्ज होते, त्यामुळे आम्ही सरांना प्राचार्यांना आम्हाला परवानगी देण्यासाठी सांगा असं सांगण्यासाठी गेलो. सावकारे सरांना आम्ही जेव्हा सांगितलं की फायनल इयरचे आम्ही तीनच जण आहोत, बाकीचे खेळाडु हे फस्ट आणि सेकंड इयरचे आहे. आणि शिवाय स्पर्धा तीन दिवसांचीच तर आहे. तेव्हा सर हसायला लागले. त्यांनाही माहिती होतं की मागच्या वर्षाच्या बॅचचा रिझल्ट चांगला न लागल्याने आम्हाला जाऊ न देण्याचा निर्णय सरांनी घेतला होता. पण नुसतं GPAT & GATE च्या परिक्षेच कारण पचनी पडंणारं नव्हतच.
        दोन-तीन दिवसात अभ्यासात काही खुप तीर मारता येणार आहे अशी तर काही गोष्ट नव्हती, आम्हाला परवानगी देऊन टाकायला हवी यावर सावकारे सर तयार झाले. मग ते आम्हाला यावर्षी स्पोर्ट्स इनचार्ज असलेल्या अनंतवार सरांकडे घेऊन गेले, अनंतवार सरांनी देखील तुम्ही पहिले त्या कॉलेजनं पाठवलेलं निमंत्रण पत्रक घेऊन या मग सांगतो असं सांगितलं. आम्ही तिथल्या आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांनी कॉलेजला एक आठवड्यापुर्वीच निमंत्रण पाठवलं आहे असं सांगितलं. मग आम्ही कार्यालयात चौकशी केली, तर त्यांनी आपल्याला काही निमंत्रण आलं नाही असं सांगितलं. आम्हाला काय झोल आहे ते कळलं. दरवर्षी बाहेरच्या कॉलेजमध्ये होत असलेल्या स्पर्धांचे आयोजक आमच्या कॉलेजला निमंत्रण पाठवतात, पण कार्यालयातुन ते नोटीस बोर्ड वर लावण्याची तसदी कॉलेजमधुन घेतली जात नाही. आमच्या कॉलेज म्हणजे पोपटपंची तयार करण्याचं मशिनच आहे असं वाटत असतं, GPAT & GATE च्या परिक्षेत यांना चांगला निकालही हवा असतो, पण त्यासाठी हव्या त्या सुविधाच कॉलेजमध्ये नसतात.
        फायनल इयरच्या सुरुवातीला घेतलेल्या मिटींग मध्ये आश्वासनांचा पाऊस कॉलेज प्रशासनानं पाडला, पण त्यातली एक गोष्टही अजुन पुर्ण केली नाही. मुलांसाठी सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत लायब्ररी खुली ठेऊ, पण प्रत्यक्षात सकाळी सव्वा नऊ वाजता लायब्ररी उघडते, अकरानंतर पुस्तके मिळतात आणि संध्याकाळी साडे पाचला लायब्ररी बंद होऊन जाते. मुलांसाठी शिक्षकांना M.C.Q. Question bank तयार करायला लावली, दरमहिन्याला ओपन बुक टेस्ट ठेऊ असं सांगितलं, पण आजपर्यंत एकही M.C.Q. आम्हाला मिळाला नाही. उलटच आम्हीच आमच्यासाठी M.C.Q. तयार करुन घेतो, माझ्या ब्लॉगवर मी काही M.C.Q. Question's टाकलेले पण आहेत. आमचे सिनियर्स आमच्यासाठी एक आठवडा वर्क शॉप घेणार होते, बाकीच्या कॉलेजच्या मुलांना त्यांच्या कॉलेजन संमती देऊन तिथे जायची परवानगी दिली, पण आमच्याच कॉलेजने आम्हाला तिथे जायची परवानगी नाकारली. शिकवण्याच्या बाबतीत जरी कॉलेजचे शिक्षक तरबेज असले, तरी बाकीच्या गोष्टींत ते लवकर जुळवुन घेत नाही असं आमच्या कॉलेजच्या प्रत्येकाला वाटतं.
        यंदा GATEची परिक्षा आणि राज्यसेवा पुर्व परिक्षा दोन्ही एकाच दिवशी आल्याने आमच्या वर्गातल्या काहींची पंचाईत झाली आहे. मागे काही दिवसांपुर्वी आमच्या कॉलेजचा माझी विध्यार्थी निषाद देशमुख यांच अपघाती निधन झालं होतं. काही महिन्यांपुर्वी पंचवटीतल्या एका मुलाने आत्महत्या केली होती, आणि त्याला जबाबदार ठरवलं गेलं तांबे सरांना, तीन वर्षांसाठी त्यांना बडतर्फ करण्यात आलं. आमच्या कॉलेजमधल्या मुलांना फार आनंद झाला होता. तांबे सर म्हणजे फार्मसी शिक्षकांवर लागलेला कलंकच आहे असं आमच्या कॉलेजचे मुलं अभिमानानं सांगतातच. काही दिवसांपुर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष- डॉ. नरेंद्र दाभोळकर सरांचा सेमिनार झाला होता. आमच्यासाठी तो एक चांगला अनुभव होता. यंदा आमचं गॅदरिंग जानेवारी महिन्यातच असेल असा संकेत अनंतवार सरांनी दिला होता. त्यामुळे मुलं आता जोमात अभ्यास करत आहेत, कारण स्पोर्ट्स वीक मध्ये खुप वेळ निघुन जाणार, शिवाय नंतर लगेच सेकंड सेशनल आणि त्यानंतर GATEची परिक्षा असल्याने आता फायनल इयरच्या मुलांना तरी निदान दिन दुगनी और रात चौगुनी मेहनत करावीच लागणार आहे यात शंकाच नाही. त्यामुळे मी देखील नंतर वेळ मिळेल, पण यंदा एम.फार्मच्या रौप्य महोत्सवीवर्षाचा मुहुर्त असल्याने गॅदरिंग मध्येच पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं होतं.
        फायनल इयरचे सुमारे पाच महिने अजुन बाकी आहे, गेल्या साडे-तीन वर्षांत काय मिळालं, काय गमवलं, काय करायचं होतं, आणि काय करायचं राहुन गेलं याचा विचार हल्ली आमच्या वर्गातल्या प्रत्येकाला पडतच असेल, कॉलेजची ही चार वर्ष आमच्या आयुष्यातला एक चांगला टप्पा होता, असं आज आम्ही म्हणु शकतो, या कॉलेजमधल्या मुलांमध्ये एक स्पर्धात्मक स्पिरिट डेव्हलप झालयं, याचा फायदा त्यांना नेहमीच होत राहिलं. यंदा आमच्या वर्गातले बरेच जण GATE/GPAT & NIPER च्या परिक्षांमध्ये चमकतीलच, आमच्या प्राचार्यांची पहिल्या पन्नास मध्ये निदान दहा विध्यार्थी आपल्या कॉलेजचे असावे अशी इच्छा आहे, त्यांची इच्छा नक्कीच पुर्ण करण्याची धमक या कॉलेजच्या मुलांमध्ये आहे. MAT/ JPEG या M.B.A. साठी असलेल्या परिक्षांतही आमच्या वर्गातल्या प्रणित सुराणा, अक्षय सोनोने, उत्कर्ष वाटाणे, ओबोद उल्ला यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. पंकज भाऊंची C.D.S. ची तयारी जोरात चालु आहे. योगेश शिरोळेला मुंबईला हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणुन जॉब लागलाय, त्यामुळे त्याचं दर्शन आता थेट वार्षिकच्याच परिक्षेला बहुतेक होईल. हितेशच्या मोठ्या भावाचं क्लिनिकचं उदघाट्न झालं, तेव्हा आता भावाच्या क्लिनिक शेजारी तु देखील आयुर्वेदिक मेडिकल टाक म्हणजे एकदम झकास होईल, असं हितेशला आमच्या वर्गातले मुलं सांगत होते.
    येत्या काही महिन्यांनतर आम्ही एकदाचे बी.फार्म पास होऊ, कोण कुणाच्या संपर्कात किती वेळ राहिल हे सांगता येण आजही कठीणच आहे. फेसबुकमुळे तरी ही कमी झालेली आहे. यंदा गॅदरिंग लवकरच असल्याने आमची फेअरवेल पार्टी देखील ऐन जानेवारीत असेल. फेअरवेल मित्रांना देऊ, की आमच्या ज्युनियर्सला की कॉलेजला देऊ असा प्रश्न मला हल्ली कधी कधी पडतं असतो. पण फार्मसीला फेअरवेल देणं हा विचार माझ्या मनात डोकावला तरी त्याला नकारच मिळेल. आज माझा मुलगा डॉक्टर आहे वा इंजिनियर आहे असं  सांगत असलेल्यांना माझाही मुलगा फार्मसिस्ट आहे असं अभिमानानं माझ्या आई-वडीलांना सांगत येईल, इतक फार्मसी फिल्ड मला आवडतं. या फार्मसी फिल्डची लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी विशेषतः ग्रामिण भागातील मुलांना, यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहिलं. फार्मसीचा अभ्यासक्रम आणि फार्मा इंडस्ट्री यांची योग्य सांगड घालुन फार्मासीत शिकणार्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी भविष्यात मला काम करायची जबरदस्त इच्छा आहे. आयुष्यात माणसाने सामाजिक बांधिलकी जपायला हवी हे मी शिकलेलो आहे. माझं हे पुस्तकही जणु माझी सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे असं मी मानतो.

७) द्विधा मनस्थितीतलं ते थर्ड ईयर..!

         सेकंड इयर चांगलचं मस्तीत घालवलं होतं, त्यामुळे GATEच्या अभ्यासाला आता सुरुवात करायची असं आमच्या वर्गातल्या कित्येकांनी ठरवलं. अपेक्षेप्रमाणे ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पेपर मुलांना भयंकर अवघड गेला होता. कित्येक फस्ट क्लास मिळालेल्यांना ग्रेस मार्क्सचा आधार घेऊनच ऑरगॅनिक केमिस्ट्री ह्या विषयात पास होता आलं होतं. आमच्या रिझल्ट ज्या दिवशी लागला होता त्या दिवशी आम्ही प्रॅक्टिकल बुडवुन पांडवलेणीला गेलो होतो, अन तेही मागच्या बाजुने चढुन जायचं असं आमच्या भाऊंचा म्हणजे शंतनुचा आग्रह, पांडवलेण्यावरुन सरळ आम्ही शंतनुच्या घरी गेलो होतो, तितक्यात आमच्या वर्गातल्या मुलांनी त्याला नेटवर रिझल्ट आलायं असं सांगितलं.
    इतक्यावेळ आनंदात असणारे आमच्या चेहर्याचा रंग बदलला, काळजात धडकी भरली, पण सर्वांना फस्ट क्लास होता, त्यामुळे मग पुन्हा वातावरण आनंदी झालं. संपदा कोरान्ने वर्गात पहिली आली होती, शंतनुला तर विश्वास बसत नव्हता, त्याला काय पण आम्हालाही धनेश्वर सरांची आवडती विध्यार्थीनी रोहिणी चव्हाणचं पहिली येईल असं वाटलं होतं; पण संपदानं यंदा बाजी मारली होती. डिप्लोमॅट असलेल्या निलेशलाही चांगलेच मार्क्स मिळाले होते, शिवाय त्यांना असलेले जादा विषयांतही तो सुटला होता, त्यामुळे मुलं सहज त्याला पार्टी मागु लागले, अन त्याने ती द्यायची कबुल करुन टाकली. आम्हा लोकलाईट्सच्या पार्टीचं हक्काचं ठिकाण म्हणजे अमेयचा प्लॅट.
        असं थर्ड इयरच्या सुरुवातीला आमच्या वर्गात वातावरण असायचं. होस्टेलला तर मुलांनी अभ्यास करायचा धडाकाच लावला होता. यात आघाडीवर असायचे, लक्ष्मीकांत जोडवे (लक्ष्या), रमेश गोरड, युवराज जाधव, विशाल वेल्हाळ (बम्मण), विश्वजीत दाडगे (बोंगो), राहुल नारखेडे (नारु) आणि मोनाली जगताप. सिनियर्संनी ठरवुन दिलेल्याप्रमाणे पहिले कोलॉजी, नंतर कोग्नोसी, नंतर मेडिकेम अशा विषयांचा अभ्यास करायला जय्यत तयारी झाली. लेक्चरला कावळे सर यावर्षी आम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री (मेडिकेम) हा किचकट विषय शिकवणार होते, आधीच सेकंड इयरला ओ.सी. इतकं वाईट होतं, अन त्यात मेडिकेम समोर ओ.सी. एकदम चिल्लर आहे असं सिनियर्सनी सांगितल्यावर आम्हाला टेंशन यायला सुरुवात झाली. यंदाही सुरुवातीचे काही दिवस सिनियर्सचे जरनल, पुस्तके आणि त्यांच्या नोट्स गोळा करण्यात गेले. यंदा फार्मास्युटिक्स-३ हा विषय आम्हाला श्री डेरले सर शिकवणार होते, पण सरांची निवड AICTE  च्या डायरेक्टर पदी झाल्याने आम्हाला आता त्यांच्याजागी बेळे मॅडमच तो विषय शिकवणार होत्या. थर्ड इयरचा फार्मास्युटिक्सचा अभ्यासक्रम चांगला तयार केला होता असं आम्हाला वाटायचं, कारण टॅबलेट्स, कॅप्सुल्स, इमलशन, ससपेंशन्स यांच्या जोडीला कॉस्मेटिक्स होतीच. पण कॉस्मेटिक्स मध्येही मुलांना खास आकर्षण होतं ते लिपस्टिक्सचंच..!
        फार्मा-मॅनेजमेंट हा विषयाचा समावेश आमच्या अभ्यासक्रमात केला होता, अन तो शिकवणार होते ते आमच्या कॉलेजचे मॅनेजमेंट गुरु-सावकारे सर. सरांच लेक्चर संध्याकाळी ५-६ या वेळेत असायचं, त्यामुळे मुलांना लेक्चरला बसवुन ठेवण्याचं काम सर शिकवतांना दैनंदिन घडणारे उदाहरणं सांगुन बरोबर मॅनेज करायचे. बायोटेक्नोलॉजी हा विषय शिकवण्यासाठी आम्हाला सौ. फरांदे मॅडम होत्या, पण त्या नाशिकच्या उपमहापौर पदी निवडुन आल्याने त्यांच्या जागी त्यांनी लिना मॅडमची नियुक्ती करुन दिली होती. लिना मॅडम आमच्या वर्गावर लेक्चर घ्यायला आल्या होत्या, नेहमी वर्गात डुलक्या घेणारा अमेय त्यादिवशी एकदम खडबडुन जागा झाला होता. अमेय मॅडमला एक-एक डाऊट विचारत होता, हा मुद्दाम प्रश्न विचारतो असं त्यांना वाटलं असावं पण आम्हाला तर याची १००% खात्री होती. बायोटेकचं लेक्चर झाल्यानंतर अमेय आमच्याकडे आणि आम्ही त्याच्याकडे बघुन हसतंच होतो.
        लिना मॅडमचं दुसरं लेक्चर सुरु झालं, त्या आम्हाला फरमेंटेशन शिकवत होत्या, आता आमचे सर्व लेक्चर एक तासाचेच असतात, पण त्यादिवशी नेमकी लाईट गेल्याने लेक्चर संपल्याची बेल काही झाली नाही. मॅडमचं शिकवणं सुरुच होतं, अन आता मुलांनी त्यांना लेक्चर झालयं हे सांगण्यासाठी गोंधळ घालु लागले. त्यात देऊलभाऊ कोल्हे, बेलसरे सरांची नक्कल करत, "Don't talk in front of my back, I mark any one of you absent " असं ओरडतं होता. त्यातच मग मॅडम चिडल्या अन त्या सर्वांच्या वहीत फरमेंटरची आकृती काढली आहे का ते बघायला लागल्या, अन जे अपेक्षित होतं तेच झालं माघे बसलेल्यांनी तो फरमेंटर काढायला मग सुरुवात केली, पण मॅडमच्या तावडीत प्रशांत जमशेटे, स्वप्निल येवले लागलेच. मॅडम त्यांच्या नोटबुक्स घेऊन वर्गाबाहेर पडल्या, अन दोन-तीन मिनिटातचं आमच्या सी.आर.ला म्हणजे संपदाला टिचर्स रुममधुन बोलावणं आलं. झालेला प्रकार सांगुन लिना मॅडमच्या डोळ्यातनं अश्रु यायला सुरुवात झाली, मग काय अनंतवार सर, बेलसरे सर, कावळे सर, आणि दोन तीन शिपाई सरळ आमच्या वर्गात आले आणि त्यांनी आमची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रशांत जमशेटे, आणि येवलेला मग प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये धाडलं होतं, आणि आम्हाला प्रत्येकाला १००/-रुपयांचा फाईन भरावा लागणार होता अन तोही दोन दिवसांच्या आत, शिवाय अपोलॉजी लेटर जोडीला होतचं. 
        यावेळीही आमच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी साजरी झाली होती. पण यावेळी मुलांची घेण्यात आलेल्या स्क्रिनिंगला फायनल इयरच्या होस्टेलच्या मुलांनी कहरच केला. जी मुलगी दिसायला सुंदर, तिला जास्त वेळ नको ते प्रश्न विचारायचा पोरखेळ त्यांनी सुरु ठेवला होता. आता त्यांना प्रश्न विचारु दिले नाही तर ते क्वॉंट्री देत नाही, मग त्यांच्या टिचभर इगोला जणु सुज येते. फस्ट इयरची विनया, आणि पुजा या दोघींना त्यांनी जास्त प्रश्न विचारले होते, त्यातही विनयाला जरा जास्तच. साडी आणि बिकिनी यातला फरक एका सिनियरने तिला विचारला होता. बहुतेक त्याला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आई-बहिणीने दिलं नसावं, म्हणुन विचारत असावा असं आमच्या वर्गातले मुलं एकमेकांत म्हणत होते. नंतर तिलाच परत स्री कसा शृंगार करते ते सांगायला लावलं, यावेळी मात्र त्यांच्याच वर्गातल्या मुलींनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या प्रश्न विचारणार्याशी भांडायला लागल्या.
        मग प्रतिमा शिंदेचा नंबर आला, पण तीलाही याआधी काय प्रकार घडला हे ठाऊकच होतं, त्यामुळे मग ती रागातच प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत होती. "ह्या अंबाबाईला घालवा रे" असं म्हणत मग बाकीच्या मुला-मुलींना स्क्रिनिंगला बोलवण्यात आलं. स्क्रिनिंगच्या वेळी झालेला प्रकार बघुन आमच्या वर्गातली कित्येक मुलांनी यावेळी फ्रेशर्स पार्टीला न जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तर आधीच पैसे दिले होते, त्यामुळे आम्ही जायचं ठरवलं होतं. फायनल स्क्रिनिंगसाठी काय करायचं हे देखील आमच्या सिनियर्सला ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्यांना या कामात मी पुर्ण मदत केली.
    यावेळी मी माझी "मॉडर्न प्रेयसी" ही कविता सादर केली होती. उत्कर्ष वाटाणे आणि पावडर मॅन विशाल गुरवचा डान्स चांगला चालु होता, पण लाईट मध्येच गेली, नंतर लॅपटॉप मध्येच बंद पडला त्यामुळे त्यांचा डान्स चांगलाच खोळंबला गेला. साई पुजारीनेही "जलवा" यावर चांगला डान्स केला.    फ्रेशर्स पार्टी अन जेवण म्हंटलं की होस्टेलचे काही मुलं असे काही बिथरतात की विचारायची सोय नाही. एकाच ताटलीत अधाशासारखं वाढुन घेतलेलं असतं, आणि मध्यभागी मठ्याचा ग्लास ठेवलेला, अन अशातच घाई गर्दीत तो ग्लास कलंडला की सगळी प्लेट मठ्ठामय होऊन जाते, आणि ते तसेच खात बसतात. काहींची मग कोण जास्त गुलाबजाम खातो, अशी नेहमी प्रमाने पैंज लागते.
    असो, फायनल स्क्रिनिंगच्या आधी कळलं की स्क्रिनिंग आधीच होस्टेलच्या मुलांनी प्रतिमा शिंदेलाच मिस. फ्रेशर्स करायचं असं त्यांच्या वर्गातल्या जजेसला सांगितलं, यांना मी इतकावेळ खर्च करुन चांगल्या स्क्रिनिंगसाठी कशा फेर्या असाव्यात यासाठी ऊठाठेव केली, पण यांनी आधीच ठरवलं की कुणाला मि. आणि मिस. फ्रेशर्स करायचं, ही गोष्ट मला खटकली. त्यामुळे मी पण स्क्रिनिंग होण्याच्या आधीच मग त्या सर्व सिलेक्ट केलेल्या मुलांना सगळे प्रश्न सांगुन टाकले, त्यामुळे विनयाला प्रतिमा पेक्षा जास्त मार्क्स मिळाले, प्रतिमा शिंदेनेही ब्लॅक मध्ये पिक्चरच्या टिकिटाची मार्केटिंग कशी करावी हे सुंदर पणे करुन दाखवलं, पण बाकीच्या प्रश्नांची उत्तरे तीला जमलेच नाही, तर दुसरीकडे विनयाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आली, आणि मग तिलाच मिस.फ्रेशर्स करण्यात आलं होतं. त्यादिवशी जी मुलगी चांगली दिसेल तिलाच मिस. फ्रेशर्स करायचा सिनियर्सचा मनसुबा चांगलाच उधळुन लावला होता. हा किस्सा जेव्हा माझ्या दोस्तांना सांगितला तेव्हा ते गदागदा हसत होते.
        यंदा फार्मास्युटिक्सचे प्रॅक्टिकल्स चांगले होते, एम.फार्मचेच मुलं आमचं प्रॅक्टिकल कंडक्ट करयाचे, त्यामुळे निदान आमच्या बॅच मध्ये मला आणि दिवाकरला काही टेंशन नसायचं, कारण एम. फार्मच्या मुलांबरोबर आमची चांगली ओळख होती. प्रतिक गांधी आणि देवेंद्र येवले ह्या दोघं आमचे थर्ड इयरचे प्रॅक्टिकल्स कंडक्ट करणार होते. बाकीच्या मुलांना प्रतिक गांधी थोडा खडुस वाटायचा, तर देवेंदला मुलं बरोबर मॅनेज करुन टाकायचे. थर्ड इयरला आम्ही टॅब्लेट्स तयार करायचं शिकलो होतो. तसं आमच्या कॉलेजमध्ये बरेच चांगले उपकरण होते, पण त्याची योग्य निगा न राखल्याने त्यातले बरेच धुळ खात पडले होते. टॅब्लेट तयार करायचं मशीनही एकदम पुरातन काळातलं वाटायचं.
        बी.फार्म लेव्हल नाही निदान एम.फार्मच्या मुलांना तरी असल्या मशीन्सवर काम करायची वेळ येते याची त्यावेळी कीव वाटत होती. बाकीचे प्रॅक्टिकल्स फस्ट इयरला केले होते तेच पुन्हा यावर्षी करायचे होते. कॉस्मेटिक्स असल्याने जरा इंट्रेस्ट वाढायचा. कोल्ड क्रिम, व्हॅनिशिंग क्रिम, सनस्क्रिन क्रिम, शेव्हिंग क्रिम, शॅम्पु, आय लायनर, आय मस्कारा, आय शॅडो, हर्बल फेस पॅक, टुथ पेस्ट यांच्या जोडीला लिपस्टिक होतीच. फार्मसीत कॉस्मेटिक्स पण तयार करायचं शिकवतात, हे कित्येक लोकांना माहिती सुद्धा नसेल. जेव्हा मी शेजारी या सर्वांसाठी लागणारे कंटेनर्स आहेत का ते विचारायचो, त्यावेळी त्यांना नवल वाटायचं. त्यांच्या कडे नसले की ते इतरांकडुन आणुन द्यायचे, पण त्यांची अट ऐवढीच की कॉलेजमधील तयार केलेलं प्रोडक्ट त्यांना जरुर दाखवायचं. आमच्या सोसायटीत राहत असलेल्या छोट्या मुलांना याच कौतुक असायचं. त्यांच्या बालसुलभ आणि चौकस प्रश्नांना उत्तरं देण्यात खरचं आनंद मिळायचा.
        यंदा फार्माकोलॉजीच्या प्रॅक्टिकल्सचे ७०% एक्सपेरिमेंट हे गोट ट्रॅकियावर करायचे होते. बकरीच्या त्या ट्रॅकियाच्या तीन रिंग्स कापुन त्यावर रिस्पॉंन्स घेणं, हे मुलांसाठी सर्वात कंटाळवाणं काम होतं, तर मुलींना ते किळसवाणं वाटायचं. अम्रिता देशमुख मात्र त्याला अपवाद होती. आम्हाला कधी कधी जास्त कंटाळा आला की मग आम्ही खुप कॉंसंट्रेटेड डोस टाकायचो, त्यामुळे असां काही रिस्पांस यायचा, मग कावळे मॅडमला प्रश्न पडायचा की यांच्या ग्रुपचे रिस्पॉंस असे कसे आले? एकदा ऐन सेशनलच्या प्रॅक्टिकलला रिंग्स टाय करण्यात वेळ गेला, त्यामुळे वेळेत आपलं प्रॅक्टिकल काही पुर्ण होत नाही, याची खात्री झाली. मग त्या ऑरगन बाथ मध्ये डायरेक्ट ८० डिग्री सेल्सिअसचं पाणी ओतुन दिलं, त्यामुळे त्या रिंग्स जणु शिजुन मरुन गेल्या. त्यामुळे आता रिस्पॉंन्स काही मिळणार नाही हे हे फक्त मला आणि माझ्या पार्टनर दिवाकरला माहिती होतं. कावळे मॅडम जेव्हा रिस्पॉन्स चेक करायला आल्या तेव्हा मी त्यांना रिस्पॉंस येत नसल्याचं सांगितलं.
        बाकीच्या सगळ्यांचे रिस्पॉंस येतात आणि याचा एकट्याचाच कसं काय येत नाही त्यामुळे मॅडम चिंता करत होत्या. एम.फार्मच्या मुलांना त्यांनी जास्त कॉंसंट्रेटेड Acetylcholineचं सोल्युशन बनवायला लावलं, लोड कमी करुन बघ, नीट वॉशिंग दे असं सांगत होत्या. नंतर एम.फार्मच्या मुलांनी बनवलेल्या फ्रेश सोल्युशनचाही डोस दिला, पण रिस्पॉंस काही येत नव्हता असं मॅडमच्या लक्षात आलं, आणि त्यांनी तुझ्या पार्टनरचाच रिस्पॉंस ट्रेस कर असं सांगितलं. त्यादिवशी मॅडमची चिंता आणि कळकळ बघुन नंतर या गोष्टीचा पश्चाताप झाला, आणि पुन्हा असला प्रकार करायचा नाही असं ठरवलं, पण वर्षभर हेच एक्सपेरिमेंट असल्याने अधुन मधुन असं मीच नाही तर बाकीचेही करायचे.
        फार्माकोग्नोसी-२ हा विषय यंदाही भाऊच म्हणजे श्री अहिरे सर शिकवणार होते. यंदा याविषयाला प्रॅक्टिकल्सचीही जोड होती. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे सेक्शन घेऊन त्यांचा अभ्यास कराण्याचे एक्सपेरिमेंट यात होते. आमच्या कॉलेजमधल्या त्या बांटल्यात ठेवलेल्या वनस्पती मुलांना एकदम पुरातन काळातल्या वाटायच्या कारण एक टेस्ट धड येत नसायची, त्यात केमिकलही एकदम खराब होते. ही लॅब इतर लॅब्सच्या तुलनेत मात्र जरा जास्तच स्वच्छ असायची इतक समाधान या लॅबमध्ये होतं. यंदा र्हबॅरियमही बनवायचं होतं, आम्हाला आधी याबाबतं चांगलाच इंट्रेस्ट होता, पण सिनियर्सने जेव्हा हा प्रकार नक्की काय असतो, त्यावेळी मग त्या इंट्रेस्टचे सेक्शन निघायला सुरुवात झाली.
        सावकारे सरांच्या एका लेक्चरला असंच मनोज जावरेला त्याचा सरांच्या शिकवण्यातला इंट्रेस्टला मॅनेज करणं कठीण गेलं, आणि त्याने मग सरांच चित्र वहीच्या मागच्या पानावर काढायला सुरुवात केली. सगळी मुलं काहीच लिहित नव्हती, आणि हा एकटाच काय लिहुन घेतोय असा प्रश्न सरांना पडला. आता मनोज जावरे हा काही एकदम हुशार मुलगा नव्हता, शिवाय त्यादिवशी तो शेवटच्या बेंच वर बसलेला, त्यामुले सरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि सर त्याची वही बघायला गेले. सर आपल्याकडे येतात असं बघुन त्याने ती वही दप्तरात टाकायचा अयशस्वी प्रयत्न केला, कारण सरांनी त्याच्या हातातुन ती वही हिसकावली. सर त्याची वही चाळत होते, आणि अचानक सर चिडले, कारण या पठ्याने सरांच चित्र वहीच्या मागच्या पानांवर काढलं होतं. सरांनी त्याची वही खिडकीच्या बाहेर रागाने फेकुन दिली, आणि आमचं लेक्चर संपल असं सांगितलं.  
        यंदा आम्हाला थर्ड इयरला प्रोजेक्ट करायचे होते, पण आमच्या कॉलेजकडुन आम्हाला साधे Re-view report तयार करायला लावले, आणि तेही स्वतःच्या हस्तलिखित स्वरुपात. आमच्या मुलांची तर याबाबत खुप नाराजी होती. कॉलेज असं चव घालवायचे काम करत होतं त्यामुळे संताप होत होता. थर्ड इयर सुरु झाल्यापासुन गेले काही महिने आमच्या C.P.N. मधील वातावरण एकदम बिघडलयं. एखाद्या स्वच्छ- शांत वाहत असलेल्या नदीतील पाणी अचानक पणे खळखळावं अनं सगळं गढुळ पाणी होऊन जावं असच सध्या घडतय़ं ..या सगळ्या वातावरणाला सुरुवात झाली ती आमच्या सेकंड सेशनल पासुनच. यंदा आमच्या कॉलेज मध्ये दरवर्षी लावतात तशी डिफॉल्टर्सची लिस्ट लागली. प्राचार्यांनी स्पष्ट संकेत दिले की यंदा डिफॉल्टर्सच्या सेरीजला सेकंड सेशनलचा किल्ला काही घेता येणार नाही, पण इंप्रुव्हमेंट टेस्टच्या जहागिरीवरच समाधान मानावं लागेल. (Defaulter student's म्हणजे कमी अटेंडन्स असणारी मुलं-मुली, त्यांना सेकंड सेशनलच्या परिक्षेलान बसु देण्याचं फर्मान आमच्या प्राचार्यांनी काढलं, पण त्यांच्या अटेंडन्स मध्ये सुधार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या साठी इंप्रुव्हमेंट टेस्ट ठेवायचा निर्णय घेतला.)
        No parking here! अशा पाटी खालीच जसे आपले देश-बांधव जसे गाड्या पार्क करतात कारण त्यांना ठाउक असतं की या सारख्या नोटिसांची काही किंमत नसते. अगदी त्याच थाटात आमच्या डिफॉल्टर्सनी  सुद्दा त्या नोटिस कडे फारसं लक्ष दिलं नाही.. अशा ५६ नोटिसा दरवेळी लागतात,पण दरवेळी परिक्षेला तर मुलांना बसु देतात, कॉलेजची काय बिशाद आम्हाला सेकंड सेशनलला बसु न द्यायची?" असं त्या नोटिसकडे पाहुन डिफॉल्टर्स बोलत होते. प्राचार्यांनी जणु काही "बोला-तो-बोला" करत मुलांना सेकंड सेशनलला खरंच बसु देणार नाही हे क्लियर करुन टाकलं. मग मात्र डिफॉल्टर्सचे धाबे दणानले. काही मुलं कॉलेजकडुन क्रिकेट, व्हॉलीबॉल च्या स्पर्धा खेळायला गेले त्यांचे बंक्स सँक्शन केले होते. पण, आमच्या प्राचार्यांनी काढलेल्या फर्मानामुळे त्यांनाही डिफॉल्टर्स ठरवण्यात आलं.
        आता काहींना वाटेल की कॉलेज प्रशासनाचं चुकतयं बरं का, पण तसं नव्हतं. म्हणतात ना एका हाताने टाळी वाजतं नाही! डिफॉल्टर्स मधील बहुतेक मुलांचे बंक्स साधारण ४० च्या पुढेच. त्यातही आमच्या कॉलेजचा Defaulter Icon बंकवीर, सम्राट बंकेश्वर, नितीनभाऊ बागुल यांनी तर एकही दिवस कॉलेजला दर्शन दिलं नाही असं बहुतेक सरांना वाटत होतं. सांगायचा हेतु ऐवढाच की मुलांनी सुद्दा मागचा पुढचा विचार न करता बंक मारले होते. सहाजिकच यांना सुधारण्याचा पवित्रा आमच्या प्राचार्यांनी घेतला, मग त्यांच काय चुकलं? पण जे मुलं कॉलेजकडुन क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळायला गेले त्यांना तर परीक्षेला बसु द्यायला हवं या गोष्टीवर अनेकांच एकमत झालं तर त्यात काही नवल नाही.
        तशीच दुसरी बाब म्हणजे मुलं नव्या फाइन सिस्टिममुळे जाम झाले होते. "Arrogency fine, Life threatening jump fine, chemical loss fine यासारखे अस्त्रांचा शोध आमच्या कॉलेज प्रशासनाने लावला होता. सहाजिकच मुलं चुकल्या शिवाय आजपर्यंत कोणताही फाइन लावला गेला नव्हता. पण यंदा Arrogency fine, आणि Life threatening jump fine ने तर कहरच केला होता. एकदा आमच्या कॉलेजमध्ये कसला तरी सेमिनार होता, त्यामुळे आम्हाला खाली सेमिनार हॉलमध्ये बोलवायला शिपाई आला, त्याला मुलं सद्दाम म्हणतात. सगळी मुलं खाली जात होती. देऊल भाऊ हळुहळु येत होता, त्यावर सद्दाम चिडले आणि त्याला पटकन खाली जा असं सांगु लागले, देऊल भाऊ त्यांना, "सर खालुन तोंड धुवुन लगेच येतो", असं सांगितल्यावर सद्दाम तिथुन निघुन गेले आणि थोड्याच वेळात प्राचार्यांकडुन देऊलला बोलवणं आलं. आणि मग त्याला Arrogency fine म्हणुन ५०/-रुपये भरायला लावला.
        आमच्या कॉलेजमध्ये पी.एच.डी. साठी नवीन इमारत करायचं काम सुरु होतं, ती बिल्डींग आमच्या कॉलेजच्या बिल्डींगला खेटुनच बांधली. एक फुटाचही अंतर नसेल, इतक्या कमी अंतरावरुन आमच्या वर्गातल्या लक्ष्मीकांतने उडी मारली, आणि त्या नव्या बिल्डींग मध्ये अभ्यास करायला गेला. पण हा प्रकार बेलसरे सरांनी बघितला, त्यालाही बोलवलं, आणि मग त्याला ५०/-रुपये Life threatening jump fine म्हणुन भरायला लावला. असले विचित्र फाइन भरायला लागत होते त्यामुळे मुलांची कॉलेज प्रशासनाबाबतच्या भावना फार बदलत चालल्या होत्या. या सगळ्यांत आनंदाची बाब म्हणजे आमच्या भाऊंचा जी.आर.ई. चा स्कोर खुपच चांगला आला होता.
        असो,सेकंड सेशनल झाली आणि मग सगळ्यांना स्पोर्ट्स वीक, फेअरवेल पार्टी आणि गॅदरिंचे वेध लागले. कोठेही जा मुलांना काही ऑरगनाईज करायला लावलं की लगेच मच्छी-बाजारात जशी कलकल असते तशीच कलकल सुरु व्हायला वेळ लागत नाही. चार-पाच मुलं-मुली स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी करतात, अन बाकीचे फक्त त्याला नावं ठेवतात हे चित्र प्रत्येक ठिकाणी आढळतंच. आमचा वर्ग सुद्दा त्याला अपवाद नव्हता. पण ऑल्स वेल दॅट एंड्स वेल प्रमाणे एकदाच मुलांनी कोणता इव्हेंट केव्हा साजरा करायचा ते ठरवलं. स्पोर्ट्स वीक आणि फेअरवेल पार्टी पर्यंत सार काही व्यवस्थित पार पडलं पण गॅदरिंगला मात्र गालबोट लागलं..!
        यंदा T.Y.ला असतांना कॉलेजचं गॅदरिंग जरा लवकरच झालं होतं.गॅदरिंग  लवकर घेण्याचा प्राचार्यांचा निर्णय कॉलेज मध्ये आयोजीत केलेल्य वर्क शॉप मुळे घेतला होता. सेकंड सेशनल नुकतीच पार पडली आणि एका दिवसाच्या अवधी नंतर लगेच कॉलेज मध्ये डेज, स्पोर्ट्स वीक, फेअरवेल पार्टी आणि गॅदरिंग हे सर्व अवघ्या सहा दिवसांत आटपायचं होतं. फायनल इयरच्या मुलांनी डेज आणि स्पोर्ट्स वीकची जबाबदारी सहाजिकच आमच्या वर्गावर सोपावुन दिली, मात्र गॅदरिंग त्यांनी अरेंज करायचं ठरवलं. बहुतांश कॉलेजमध्ये साजरे होत असलेले डेज आमच्या कॉलेजमध्येही साजरे होतात. काही नवीन्य आणायचं ठरवलं तर प्रत्येक मुलाला त्याबाबतीत समजवणं म्हणजे डोक्याला तापच..! टाय ऍंड सारी डे, थिम डे, कलर डे, ट्रॅडिशनल डे, कलर डे असे पारंपारिक डेज सोडुन इतर डेजलाच आमच्या कॉलेज मध्ये परवानगी मुळिच नाही. मिसमॅच डेचं नाव काढायला मुलांची हिम्मत होत नाही, कारण त्यांच मिसमॅच कल्पनेपलीकडचं नसतचं. त्यामुळे त्यात काही मजाच नाही.
         दोन दिवसांमध्ये सगळे डेज आटपायचे, अन तीन दिवसांमध्ये स्पोर्ट्सवीक अन शेवटचा दिवस गॅदरिंगला अर्पण. डेजची सुरुवात नेहमी प्रमाणे टाय ऍंड सारी डे नेच झाली. त्यानंतर थिम डे आणि कलर डे साजरा झाला. फस्ट ते फायनल इयर मिळुन फक्त तीनच थिम सादर झाल्या. फस्ट इयरच्या थिमचा विषय बालमजुरांशी निगडीत तर आमच्या वर्गातुन प्रसाद माळीचा ग्रुप आणि माझा ग्रुप. माळीने त्यांची मागील वर्षी सादर केलेली थिमचा विषय "थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली" सादर केला. यंदा त्याने ट्रफिक हवलदार आणि श्रीमंत बापांच्या मुलांचे वर्तन यावर चांगली थिम सादर केली. मॊटर सायकलवरुन ट्रिप्सी जाण्याचं नाटक करणारे विशाल, नितीन आणि मनोज यांनी त्या गाडीचा आवाज "घ्यांग्यांग पिपऽऽऽ घ्यांग्यांग पिपऽऽऽ घ्यांग्यांग पिपऽऽऽ" करत उपस्थितांना खुश करुन टाकलं. फस्ट इयरच्या अजिंक्य सुपेकर यानं पेपर वाटत असलेल्या मुलांची झक्कास नक्कल केली. त्यांच्या वर्गातल्या बहुतेक मुली त्याच्यावर इंप्रेस झाल्या असणार यात शंका नव्हती. आमचा विषय "पाणी अन लोडशेडींगचा" तसा विषय नेहमीचाच पण तो नव्याने माडांयचा माझा कयास होता. "This is the problem faced by all, but ignored by most of us. so try to imagine, inspire & implement..Beacuse every move you make to save a drop of water & unit of electicity makes a difference.." हे वाक्य सर्वाना आवडलं, शिवाय पाणी नावाची एक चारॊळी थिमचा शेवट करतांना वापरली ती अशी:
        "थेंब-थेंब पाण्यासाठी पॊरं त्यांची वणवणं फिरली,
          दॊन थॆंब आसवांसंगॆ रणरणत्या ऊन्हातनं तशीच परतली,
          काय त्य़ांचा गुन्हा असावा, दॊन दिवसांची तहानही न भागावी,
          ज्यांना पुरेसं पाणी मिळतयं, का हॊ त्यांनी मग त्याची नासाडी करावी?
मॅड ऍड शो ला तर आमच्या वर्गातील पंकज, देऊलभाऊ(D.B.K.) आणि प्रणित यांनी व्हिक्स आणि हार्पिक या प्रोडक्ट्सची एकदम भन्नाट ऍड सादर केली आणि प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरुन टाकलं. पण एकमात्र नक्की व्हिक्स आणि हार्पिक या कंपन्यांनी यांचा फंडा वापरला तर प्रेम-वीरांकडुन व्हिक्सची, तर महिलांकडुन हार्पिकची मागणीचं प्रमाण कितीतरी पटींनी वाढेल. ओव्हर आर्म आणि अंडर आर्म क्रिकेट, व्हॉलिबॉल, चेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम यांच्या सर्व मॅचेस अवघ्या तीन दिवसांमध्ये आटपायच्या होत्या. स्पोर्ट्स वीक मध्ये फक्त तीनच दिवस ऐकुन तुम्हाला नवलं वाटलयं का? पण आम्हाला ते तीन आठवड्यांपेक्षा कमी नाहीत..! स्पोर्ट्स वीकमध्ये फुटबॉल आम्ही फस्ट इयरमध्ये असतांनाच खेळला गेला, त्यानंतर आम्ही फायनल इयर पास झाल्या शिवाय हा खेळ खेळला जाण्याची शक्यता कमीच. त्याला कारण म्हणजे आमच्या वर्गातला अमेय चौरसिया. आम्ही फस्ट इयरला असतांना "दि रायजिंग स्टार ऑफ फुटबॉल" हे बिरुद याला प्रदान झालं. पण मुलांसाठी तो "C.P.N.चा रोनाल्डोचं". मैदानात अमेयने एकदा फुटबॉल घेतला की बाकीचे मुलं नुसते घुम्यासारखे त्याच्याकडे बघत बसतात. हा भाऊ गोल वर गोल करतच जातो, जणु आमच्या फुटबॉल टिमची वन मॅन आर्मी..! त्यामुळे इतर वर्गातील मुलांमध्ये "आयला हारणारच तर खेळायचं कशाला?" असं निगेटिव्ह स्पोर्ट्समन स्पिरीट तयार झालयं.
        फेअरवेल पार्टी सुद्धा चांगली पार पडली. आणि मग २५-जानेवारी-२०१० गॅदरिंगचा तो काळा दिवस अखेर उजाडलाच..! गॅदरिंगला सुरुवात होतं नाही तोच वादळापुर्वी येणार असलेल्या शांततेचा अनुभव बहुतेकांना झाला. D.J.वाल्याच्या D.J.ची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. लाईट सिस्टीमचा घोळ चालु होता. सकाळी साडे-आठ वाजता बरोबर गॅदरिंगला सुरुवात होणार अशी आकाशवाणी आमच्या कॉलेजच्या G.S.ने दोन दिवसांपुर्वीच केली होती पण गॅदरिंगला सुरुवात मात्र पाऊणेबारा वाजता झाली. सकाळीच आलेल्या मुलांनी मग आमच्या धनेश्वर सरांच्या शब्दांत सांगायचं तर genes express करायला सुरुवात केली.
    आदल्या दिवशी उरलेल्या रोझ डे च्या इंट्रीज तेवढ्यावेळात उरकण्याची सुबुद्धी फायनल इयरच्या मुलांना सुचली तीच मोठी भाग्याची गोष्ट.  पण काही मुलं मात्र रोझ घ्यायला आलेल्या मुलींना आय लव्ह यु म्हणुन चिडवत हो्ते. अशावेळी पोरी मात्र दुर्गा-कालीचं रुप धारण करुन अशा मुलाना धडा नाही शिकवत तर आपल्या जागी बसुन बोट मोडत बसतात. असो, एकदाची गॅदरिंगला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करायला आमच्या वर्गातील प्रणित आणि मयुरी यांची जोडी स्टेजवर आली. त्यांनी सुत्रसंचालनाला सुरुवात केली नाही तोच मुलांच्या घोळक्यातनं "छक्का..छक्का.." अशा आरोळ्यांनी हॉलवर ताबा मिळवला. आमच्या वर्गातल्या मुलांनी मग वातावरण शांत करत फायनल इयरच्या मुलांना समजवालं, आणि आणखी काही झालं तर कार्यक्रम सोडुन मुलं निघुन जातील असं सांगितलं मग पुढचा दिड-तास सगळं सुरळीत पार पडलं. पण फायनल इयर कडुन लागलेली आग इतक्यातच शांत होणारी नव्हती..
        दुपारचे जेवण आटोपल्यानंतर फायनल इयरने अचानक फॅशन शो घेण्याचा विचार केला नाही तोच आमच्या वर्गातील मुलही पेटुन गेले. दरवेळी दिल्या जात असलेल्या "बेस्ट क्लास ऑफ दि इयर" साठी फायनल इयर हा पराक्रम करतयं याचा मुलांना राग आला. कारण एकुण गुण बघता व्हॉलिबॉल, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन यासारख्या खेळांत आमचा वर्ग अव्वल, अंडर आर्म क्रिकेट मध्येही वर्गाला दुसर स्थान मिळालं, याशिवाय सांस्कृतिक खेळांमध्येही आमच्याच वर्गाने सगळीकडे बाजी मारली. त्यामुळे फायनल इयर आमच्या पेक्षा सुमारे ३० गुणांनी मागे होतं. गॅदरिंगच्या कार्यक्रमात आमच्या वर्गातुन तीन नाटक सादर होणार होते. त्यातही माझाग्रुप मागील वेळचा विजेता ग्रुप, आमच्या कॉलेजमध्ये नाटकात आमचा हात धरणारा कोणताच ग्रुप नाही हे सगळ्यांना ठाऊक. त्यामुळे एकंदरीत आमचे गुण वाढणारच होते. फायनल इयरला मग मात्र फक्त डान्स, सिंगिंग आणि फॅशन शो यांचाच आधार होता आम्हाला माघे टाकण्यासाठी. अशा परिस्थीत आमच्या वर्गाचा संयम थोडाबहुत बाकीच होता..
        एम.फार्म.च्या सोणवने सरांनी झक्कास डान्स केला त्यामुळे त्यांनाच प्रथम पारितोषिक मिळणार यात कोणालाच शंका नव्हती. फायनल इयरच्या आशा द्वितीय स्थानावर पण तिथेही एम.फार्मचं वर्चस्व दिसायचे वेध लागले. त्यातच मग आमच्या वर्गातल्या मोनालीचा डान्स केव्हाचा खोळंबत पडला होता त्यामुळे तिचाही पारा चढायला सुरुवात झाली. त्यातच माळीचा म्युझिकल ड्रामा सुरु असतांना स्टेजवर असलेल्या मुलींना फायनल इयरच्या काही मुलांनी "ऐ दुसर्या कोणत्या पोरी मिळाल्या नाही का बाजारात?" असा टॉंट मारला. सेकंड इयरच्या काही मुली जेव्हा लावणी सादर करत होत्या तेव्हा "रेट काय आहे गं तुमचाऽऽ?"म्हणायचं धाडस त्यांच्याच वर्गातल्या मुलांनी केलं. हे सगळं घडतं असतांना फायनल इयरच्या मुलांनी फॅशन शो घेण्याचं ठरवलं, मग इतकावेळ शांत असलेली मोनाली खवळली. त्यामुळे आमच्या वर्गातील काही मुलांनी लगेच रॅंम्प वरच ठाण मांडलं. मग कुठे मोनालीचा डान्स पार पडला, अन त्यानंतरच फॅशन शो झाला हे सांगायची गरज नाही..!
        एकीकडे हा सगळा प्रकार घडत असतांना सावकारे सर मात्र आमच्या ग्रुपचा ड्रामा बघण्यासाठी आतुर झाले होते. पण काय करणार फायनल इयरचं मॅनेजमेंट अतिशय थर्ड क्लास, त्यामुळे सर वैतागुन तिथुन निघुन गेले, आणि मग वीस सुमारे वीस मिनीटांनंतर आमच्या नाटकाला सुरुवात झाली. मी लिहिलेल्या नाटकाचा विषय हा कॉलेज मध्ये गॅदरिंगच्या आधी घडलेल्या वातावरणाशी निगडीत, शिवाय दरवेळी काहीतरी नाविन्यपुर्ण नाटक सादर करायची आमच्या ग्रुपची परंपरा. त्यामुळे मुलं शांत बसुन चांगला प्रतिसाद देतं होती. कॉलेजची अन मुलांची बाजु मांडण अन तेही समोर असलेल्या शिक्षकांना न दुखवता, हे आमच्या साठी असलेलं चॅलेंज होतं. जरा काही कमी जास्त झालं की आमच्या मार्क्सशीट वर त्याचा परिणाम होणारच याची भिती माझ्या बरोबर माझ्या सोबत काम करत असलेल्या माझ्या दोस्तांनाही होती!
    पण शेवटी एकदम जीव ओतुन काम करायचं समाधान आलं कारण सगळ्य़ांना भावना तर कळल्या, पण कोणी दुखावलं नव्हतं याची खात्री आम्हाला नाटक सादर करतांनाच येत होती. कारण ज्या वाक्यांवर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळणार नाही अशी खात्री होती, ती वाक्ये सुद्धा टाळ्या अन शिट्ट्या खेचण्यात यशस्वी झाली. माझ्या तोंडुन तर नकळत पणे आमच्या प्राचार्यांची खतरनाक मिमिक्री झाली. सर जर समोर असते तर सरांनाही आश्चर्याचा धक्काच बसला असता. मुलांचा मात्र त्याला टाळ्या अन शिट्ट्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमच्या नाटकाला पहिलं बक्षीस मिळेल की नाही यावर मुलांमध्ये सट्टा लागला होता. तो सुद्धा माळीचा म्युझिकल ड्रामा झाल्यावर अन आमचा ड्रामा सुरु होण्याआधी. पण पसंती आम्हाला जास्त होती हे नव्याने सांगायला नको..! आमचा ड्रामा झाल्यावर मग एक दोन परफॉर्मन्स झाले मग फायनल इयरच्या अनिकेत गायकवाडने "नटरंग"च्या गाण्यावर अप्रतिम डान्स केला, तोही "वन्स मोर"चा प्रतिसाद मिळवुनचं. त्यानंतर सेकंड इयरच्या सायली कासारच्या ग्रुपचा सुद्धा ड्रामा होता.
    प्रसाद माळीच्या ड्रामाच्या वेळी त्यातल्या मुलींना सेकंड इयरच्या मुलांनी देखील चिडवल्यामुळे आमच्यातील दोघा-तिघांनी जत्रेत मिळणारे भोंगे वाजवायला सुरुवात केली-न-केली तोच सेकंड इयरच्या मुलांनी आमच्या वर्गातील मुलांवर खुर्च्या फेकल्या. मग काय गॅदरिंगच्या रंगाचा बेरंग झाला. डुंबरे सर मुलांच्या भांडणात पडले तर त्यांनापण सेकंड इयरच्या मुलांकडुन चांगलीच धक्का-बुक्की झाली. इकडे असा तमाशा चालु असतांना सायली कासारचा ड्रामा चालुच होता. शेवटी आमच्या मुलांनी तिथुन पाय काढुन घेणचं पसंत केलं.
        कॉलेजचं नशीब बलवत्तर, प्रमुख अतिथी असलेल्या रेडिओ मिर्ची 98.3 FM याचा आर.जे. भुषण मटकरी समोर हा पराक्रम मुलांनी नाही गाजवला ते..! पण ज्या हॉल मध्ये हे सर्व काही घडलं तिथल्या लोकांकडुन ही बाब प्राचार्यांपर्यंत पोहचलीच. अन २६ जानेवारीला या घटनेचे पडसाद एकदाचे उमटलेच! काहीही म्हणा, पण मुलांनी त्या दिवशी कहरच करुन टाकला होता. एकवेळ खुर्च्या फेकल्या ते प्रकरण पचवता येण्यासारखं होतं. पण मंचावर असलेल्या मुलींना एकदम खालच्या दर्जाचे कमेंट्स पास  करणं ही गोष्ट खपवुन घेण्यासारखी मुळीच नव्हती. वर लिहिलेले  तर काहीच नाही, यापेक्षा भयानक अन लाजिरवाणे कमेंट्स मुलांनी पास केले ही सगळ्यात वाईट घटना C.P.N.च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. जास्त काय सांगणार, पण एवढं नक्की झालं होतं की याचे फार वाईट परिणाम भोगायला मुलांना तयार रहायचं होतं, कारण मुलांनी अखेर एकदाची लायकी दाखवलीच....!
        २६ जानेवारीला सकाळी झेंडा वंदन झाल्यानंतर सावकारे सरांनी मला बोलवलं, आणि काल काय प्रकार झाला ते सगळ्या शिक्षकांना सांगायला लावलं. मी झाला तो प्रकार जसाच्या तसा सांगत गेलो, इकडे बेळे मॅडम आणि बाकीच्यां सरांचा संताप शिगेला पोहचला. सेकंड इयरच्या मुलांच नाव ऐकताच धनेश्वर सरांचा पारा चढला. कारण सेकंड इयरच्या बॅचने त्यांना भयानक त्रास दिला होता. एकाने तर त्यांना त्यांच्यासमोर "म्हातार्‍या" असं म्हणायला कमी केलं नव्हतं. हे प्रकरण ज्यावेळी प्राचार्यांकडे गेलं, तेव्हा सेकंड इयरच्या मुलांची चांगलीच हजामत झाली. शिवाय डुंबरे सरांनी देखील काय झालं होतं, खुर्च्या कोणी कोणावर फेकल्या ते माहिती होतं, त्यामुळे सेकंड इयरचे मुलं चांगलीच अडचणीत सापडले होते. फायनल इयरचे पण काही सिनियर्स होते, पण त्यांची शेवटची काही महिने राहिल्याने त्यांच नाव घेऊ नको असं आमच्या वर्गातली मुलं मला सांगत होती.
        सहाजिकच यानंतर कॉलेजमधलं वातवरण आणखी कडक झालं. त्यातही लॅब असिस्टंट शिंदेंना नव्या बिल्डींगमध्ये निरोध सापडले होते. कॉलेजमधली काही मुलं मुली एकत्र अभ्यासाला नव्या बिल्डींगमध्ये बेंच टाकुन बसत होती, त्यांच्यापैकीच कुणाचं तरी काम असावं असं त्यांना वाटत होती. त्यामुळे आता कॉलेजमध्ये मुलींना संध्याकाळी सहानंतर थांबता येणार नाही असं फर्मान काढलं होतं. त्या नव्या बिल्डींगचे काम करणारे कामगार त्याच बिल्डींग मध्ये राहत होते, पण मुलांवरच शंकेची पाल आली होती ही गोष्ट फारच निंदनीय होती. यंदा इंडस्ट्रियल ट्रेनिंग केलं असल्याने कॉलेजमध्ये साधारण चार दिवस येता आलं नव्हतं, आणि नंतर पुन्हा आजारी असल्यामुळे दोन दिवसांचे बंक्स झाले होते असे एकुण सहा बंक्स मंजुर करुन घ्यायला प्राचर्यांकडे गेलो होतो.
    आजपर्यंत बंक मंजुर करुन घेण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. ट्रेनिंगचे चार दिवस तर सरांनी लगेच मंजुर केले, पण आजारी असल्यामुळे झालेले बंक्स काही मंजुर केले नाहीत. आजारी पडायच्या पहिले बंक्स मंजुर करायचे होते, असं आमच्या प्राचार्यांचं म्हणनं होतं. आता कोणाला स्वप्न पडता, वा कुणी दिव्यात्मा आहे ज्याला आपण केव्हा आजारी पडणार आहोत ते कळतं. येत्या दोन दिवसांनंतर मला कावीळ होणार आहे सर कृपया सात दिवसांसाठी बंक्स मंजुर करुन देता का? असं त्यावेळी मी मनात म्हणत बाहेर आलो होतो.
        फेम केयर फार्मा, अंबड येथे मी इंडस्ट्रियल ट्रेनिंग केलं होतं. दरवेळी आमच्या कॉलेजमधली मुलं टॅब्लेट्स आणि कॅप्सुल्स जिथे तयार होतात तिथेच ट्रेनिंग करायला जातात. पण मी कॉस्मेटिक्स इंडस्ट्रितच ट्रेनिंग करायचं ठरवलं होतं. फेम केयर फार्मातली लोकं फार चांगली होती. अगदी वर्करपासुन ते मॅनेजर्सपर्यंत सगळा स्टाफ चांगला होता. प्रोडक्शन, क्वॉलिटी कंट्रोल, रिसर्च & डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, स्टोअर्स अशा अनेक विभागातुन मला ट्रेनिंग दिलं गेलं. माझं नशीब चांगलं होतं, कारण मला ऑक्सिब्लीच आणि हेयर रिमुव्हींग क्रिम यांच प्रोडक्शन अगदी जवळुन बघायला मिळालं. क्वॉलिटी कंट्रोल या डिपार्टमेंट मध्येही खुप काही शिकायला मिळालं. रिसर्च & डेव्हलपमेंट मध्ये वेगवेगळी प्रोडक्टस कशी चांगल्यात चांगली बनवता याची माहिती मला समजेल अशा शब्दांत सांगितली होती.
        तिथे फोटो काढण्याची सक्त मनाई होती. एकंदरीतच इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा अनुभव खुप छान होता. इतक्या मोठ्या प्रमाणात न ब्रेक होता क्रिम्स बनवली जाते हे मी अगदी जवळुन पाहिलं होतं. आम्ही कॉलेजमध्ये १०-१५ ग्रॅम्सच्या वर क्रिम्स वा लोशन बनवायचो, पण तेही पहिल्याच खेपेत बनेल याची खात्री नसायची, पण इंडस्ट्रित १००० लिटरची बॅच तयार होत होती, आणि ते सुद्धा काही चुक न घडता. इंडस्ट्रियल ट्रेनिंगमुळे वर्क इथिक्स काय असतं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, वर्कर आणि मॅनेजर यांच्यात कसं वातावरण असतं हे बघायला आणि शिकायला मिळालं. रवी चुणे, शलाका कदम, मंदार काळे, सौ. मंजुषा जोशी मॅडम, यांनी मला फार्मा इंडस्ट्रिबाबत भरपुर माहिती दिली होती.
        खरंच एप्रिल-मे हे दोन महिने ऐन परीक्षांचा काळ अन नेमकी त्यावेळीच काही-ना-काही गोष्टी अशा घडतात, अन मग वैतागुन म्हणावं लागतं आता वाजलेत की बारा..! दरवेळी परीक्षांची चाहुल लागली की तहान लागल्यावर विहीर खोदायची त्याप्रमाणे आमच्या कॉलेजमधली ४५%मुलं खडबडुन जागे होतात. ४५% मुलं जणु एकदाची परीक्षा आलीच अशा थाटात परीक्षेच्या स्वागतासाठीच सज्ज असतात, तर उरलेले मुलांची कंडिशन "अरे इतक्या लवकर परीक्षा, अजुन तर पोरशन व्हायचा बाकी आहे, आता नेहमी प्रमाणेच वाट लागली!!" अशीच होऊन जाते. आमची थर्ड सेशनल एकदाची झाली की सगळ्या कॉलेजवर जणु अवकाळाच आली असं वाटतं. ज्याला पहावं त्याला एक ना अनेक समस्या, चिंता, शंका-कुशंका, सगळ्या तोंडावर स्पष्ट दिसत असतात. "यार माझा फार्माकोलॉजीचा ऍव्हरेज होईल का नाही?" " अरे कोलॉजीचं काय मेडिसिनल केमिस्ट्री,सगळ्यात बाप विषय आहे, अरे एका चॅप्टरचे स्ट्रक्चर्स केले की मागच्या चॅप्टरचेचे स्ट्रक्चर्स जणु आपल्याला म्हणतात ’बघ माझी आठवण येते का?’ मेडिकेमच्या प्रॅक्टिकलची सगळी भिस्त तर वेगवेगळ्या ड्रग्सच्या स्ट्रक्चरवरच, त्यात भर म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर्सची साथ आपली वाट लावण्यासाठी तयार झालेला दुग्धशर्करा योगच आहे." "अरे स्ट्रक्चर्स, IUPAC नॉमेनक्लेचर्स गेले तीन टाईम, पण ऍनालिसिसची  डायल्युशन्स अन इंस्ट्रुमेंट्स यांची काळजी लागुन आहे रे. आयला कोणत्या वेळी हे इंस्ट्रुमेंट्स दगा देतील काही भरवसा नाही." "अरे त्याचं इतकं टेंशन नसतं रे,
    सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे डुंबरे सर मुलांना दिलेले डायल्युशन्स बसच्या तिकीटावर, नाहीतर एखाद्या छोट्याशा चिठ्ठीवर लिहुन ठेवतात, अन नेमकी ती चिठ्ठी हरवुन जाते." "ते सोडा रे फार्माकोग्नोसीच्या प्रॅक्टिकलला ट्रान्सव्हर्स सेक्शनचा झोल होतोच बरं का.! आदिमानवाच्या काळापासुन जपुन ठेवलेल्या असतील अशा त्या जडी-बुटींवर आपल्याला ऍन्युअलचं प्रॅक्टिकल काढायचयं.." "फार्मास्युटिक्सला कमी नका समजु बरं का? आयला 33 प्रोडक्टसचे फॉर्म्युले रटायची. त्यातही शेव्हींग क्रिम, व्हॅनिशिंग क्रिम सारखे प्रिपरेशन्सभरीस भर म्हणजे ग्रॅन्युल्स कधी बनतात तर कधी बनतचं नाही.." या सारखे संवाद कॉलेज मधील मुलांमध्ये चालत असतातं.
        आमच्या कॉलेज मधली काही मुलांचा नुसत्या नोट्स झेरॉक्स करायचा दणका चालतो. गरज असो-वा-नसो आपल्या बरोबरचे मुलं करतात ना मग आपण पण झेरॉक्स करुन टाकयच्या. उगाच नंतर कटकट नको. अशी भावना मनी बाळगणारे नगीने भरपुर सापडतील. वर्षाच्या सुरुवातीलाचा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या हे मुलं वर्षाच्या शेवटी करत असतात. मग अशावेळी हत्ती गेलं अन शेपुट राहिलं असं म्हणन्यापेक्षा शेपुट गेलं अन हत्ती तेवढा राहिला हेच योग्य वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतांना मुलां समोर येते ती जरनल सर्टिफाय करायची अन फाइन भराण्याची वेळ..एकवेळ जरनल सर्टिफाय करवुन घेणं काही वाटतं नाही पण फाइन भरणं, यावर प्रत्येकाचा मेंदु विचार करतोच.
        "सर मला किती फाइन लागला आहे?" असं मुलांनी विचारलं अन चुकुन जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्याला जर जास्त फाइन बसला तर मग त्या मुलांची स्थिती बघण्या सारखी असते. "सर माझे अमुक बंक्स मंजुर झालेले आहेत, किंवा हे ब्रेकेज माझं नाही, किंवा ह्या ब्रेकेज समोरची सही माझी नाही. सर हे ब्रेकेज कॉमन वर टाकलं होतं ना मग आता मला एकट्याला कसं काय फाइन बसला?" ह्या प्रश्नांची बरसात करायला मुलं लगेचं तयार. अन समोरुन उत्तर एकचं, "प्राचार्यांना भेटा!" मग नाईलाज को क्या ईलाज है? म्हणतं फाइन भरायचा अन एकदाचं हॉल तिकीट मिळवायचं, अशा एक ना अनेक समस्या सोडवतं अभ्यास करायचा, मग कसं काय बारा वाजणार नाहीत हो..?
        यावेळी एक गोष्ट आमच्या डिफॉल्टर्ससाठी प्राचार्यांनी चौथी सेशनल घेतली, अन तेही प्रत्येक पेपरचे ७५/-रुपये जास्तीचे भरुनच. डिफॉल्टर्सला मात्र यावेळी फायदा झाला कारण कित्येक विषयांचे पेपरमध्ये थर्ड सेशनलला आलेले प्रश्न टाकलेले होते. एक दोन विषयांचे तर थर्ड सेशनलचेच पेपर रिपिट झाले होते, त्यामुळे त्यांचा ऍव्हरेज चांगला झाला होता. १२८ बंक्सचा रेकॉर्ड आमच्या बंकवीर नितीन बागुलने यंदा केला होता, असं सावकारे सरांकडुन कळलं. कॉलेजच्या इतिहासात सगळ्यात जास्त कॉलेज बंक कुणी केलं असेल तर बागुलचं नाव त्यात अग्रभागी असेल. म्हणुनच तर मुलांनी त्याला सम्राट बंकेश्वर अशी उपाधी दिली होती.
        यंदा आम्हाला प्रत्येकाला प्रोजेक्ट साठी सर्वांना एक एक ड्रग दिला होता, आणि त्याचा review reoprt आम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या हाताने लिहिला होता. ज्यांच अक्षर खराब होतं त्यांचा तो रिपोर्ट बघण्यासारखा होता. सर्वांना आपाआपल्या प्रोजेक्ट साठी सेमिनार देणं गरजेचं होतं, त्यामुळे सगळ्यांचा पावर पॉइंट प्रेझेंटेशन चांगल असण्यावर भर होता. आमच्या वर्गातल्या प्राजक्ताचा, नितीशचा आणि वैभव सुखाळकरचा सेमिनार खरचं खुप छान झाला होता. पण शंतनुच्या प्रेझेंटेशनमधले फोटो पाहुन सर्वांना हसु येतं होतं. त्याचा ड्रग हा डिप्रेशन आलेल्यांसाठी वापरतात, त्यामुळे त्याने डिप्रेस झालेल्या माणसांचे तुफान फोटो टाकले होते. आणि त्या फोटोतल्या माणसाला बघुन मुलं हसत होती.
    फोटोग्राफीच्या बाबतीत आमच्या वर्गात शंतनुचा हात कोणी धरु शकणार नाही. फोटोग्राफीची चांगली समज त्याला आहे. एकदम साध्या कॅमेर्यातुनही तो चांगले फोटो टिपण्यात तरबेज झाला आहे. सर्वांचे सेमिनार झाल्यानंतर मग इंटरनल म्हणुन असलेल्या श्री. आखडे सरांनी शंतनुचा सेमिनार सगळ्यात चांगला झाला, असं सांगितलं. त्यामुळे शंतनु फारच खुष होता. योगेश शिरोळेला मात्र सेमिनार देतांना फार टेंशन आलं असावं, कारण त्याच्या सेमिनारच्या वेळी तिथे मिलिंद वाघ सर, बेलसरे सर, वाघ सर, धनेश्वर सर उपस्थित होते, आणि ते त्याला प्रश्न विचारत होते, याला तर काय बोलावं आणि काय बोलु नये असं झालं. चांगला पाऊण तास त्याचा सेमिनार चालला होता, त्याचीस्थिती बघण्यासारखी आणि केविलवाणी झाली होती.
        असो, यावेळी थर्ड इयरला म्हणावं तसा अभ्यास कुणीच केला नव्हता. आम्हा फार्मसीच्या मुलांची गेटची परिक्षा रद्द केल्याने मुलांच्या डोळ्यासमोरचं टार्गेट गेलं होतं, त्यामुळे मुलही चलता है चलने दो, याच्यात मस्त राहायचे. मिलींद वाघ सरांचे मात्र शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचामार्फत गेट ची परिक्षा पुन्हा सुरु करणासाठी न्यायालय़ीन लढा देण्यासाठी प्रयत्न सुरु होते. वेगवेगळ्या कार्यालयांपुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मोर्चे काढले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तितकं यश मिळत नव्हतं. कारण फार्मसीची आपल्या देशातली स्थिती हेच मला वाटलं, शिवाय मिडियाचा प्रभावी वापर झाला नव्हता असंही आमच्यातल्या काहींना वाटायचं. राज ठाकरे साहेबांच्या मनसे कडुन काही प्रयत्न करुन बघुया असं आम्ही ठरवलं होतं, पण सरांची कोणत्याच राजकीय पक्षाची मदत न घेता लढा देण्याचं ठरवलं त्यामुळे मग मुलं गप्प बसली होती.
         यावर्षी देखील नेहमी प्रमाणे मे महिन्यातच आमची परिक्षा पार पडली, ऍनालिसिसच्या प्रॅक्टिकलला एक्सटरनल म्हणुन तांबे सर आले नव्हते म्हणुन मुलं खुष होते. आमच्या कॉलेज मधल्या मुलांना त्यांचा इतका तिटकरा होता, की कधी कधी मुलं चक्क शिव्याच देणं पसंत करायचे. मुलांच शैक्षणिक नुकसान करणार शिक्षक होता, असं आमचे सिनियर्स सांगायचे. असो, मेडिकेमच्या प्रॅक्टिकलला मात्र जरा वाट लागली, कारण प्रोडक्ट ओव्हन मध्ये जळुन खाक झाला, आणि कावळे सर असल्याने काही झोल करनं म्हणजे कठीणच काम होतं. त्यामुळे रिकाम्या पॉलिथिन बॅगलाच लेबल चिटकवलं आणि सरांकडे सबमिट करायला गेलो, सरांनी विचारलं की प्रोडक्ट कुठे आहे, मग सरांना काय झालं ते खरं खरं सांगुन टाकलं आणि मग लॅबच्या बाहेर पडलो होतो.
    मेडिकेमच्या प्रॅक्टिकलला नापास होऊ नये हीच अपेक्षा मनात होती. युनिव्हरसिटीचे पेपरही चांगले गेले होते, मॅनेजमेंटच्या पेपरमध्ये मुलांना उत्तर चांगलीच टाईम मॅनेज करुन लिहावी लागत होती. बायोटेक्नोलॉजीचा पेपर फुटलायं असं होस्टेलाईट्सला कळालं होतं, आणि मग काय अपेक्षेप्रमाणे तो पेपर खुप सोपा गेला होता. असं एकंदरीत थर्ड इयरचं वर्ष गेलं होतं. आणि आता आम्हाला फायनल इयरचे वेध लागले होते.