Wednesday, November 14, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१६


                     घरी आल्यावर स्वराली अभ्यास करु लागली, रात्री झोपेत ती अर्जुनच्या बर्थ डे ला त्याला काय सरप्राईज द्यायचं त्याचा विचार करु लागली. सकाळी अर्जुन तिला पेपरसाठी शुभेच्छा देण्यासाठी आला. मग मैथिली आणि स्वराली दोघ्याजणी तिथुन निघाल्या. "ऐ मैथिली, तुला एक विचारु का पण तु हसणार नसशील तर?" असं स्वरालीनं तिला विचारलं. "अभ्यासाचं काही विचारु नकोस गं, आधीच जाम टेंशन आलयं," असं मैथिली तिला बोलली. "अगं अर्जुनचा बर्थ डे आहे २२ फेब्रुवारीला, त्याला एकदम छान सरप्राईज द्यायचं आहे," असं स्वराली त्याला बोलली. "अगं स्वराली, मगं काय ठरवलंय तु?" असं मैथिलीनं तिला विचारलं. "अजुन काही सुचलच नाही गं," असं स्वरालीनं तिला सांगितलं. "एक काम करु, आपण पेपर झाला की ठरवुया," असं मैथिलीनं तिला सुचवलं. 
        इकडे कॉलेजमध्येही १४ फेब्रुवारीचे सगळ्यांना वेध लागले होते. व्हॅलेंटाईन डे येणार म्हणुन प्रत्येक जण उत्साहात होता. कॉलेजमधली मोजकीच अफेअर्स सोडली तर एरवी मुला मुलींमध्ये जणु वर्गात कोल्डवॉर चालायचा. पण व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी जणु कोल्डवॉर थांबलेलं असायचं. मुलं-मुली आप-आपसांतलं इंटरएक्शन वाढवु लागायची. कोणाला अचानक त्याच्या जवळ असलेल्या विषयाच्या नोट्स मुद्दाम तीच्याकडुन हव्या असायच्या, एखादी मुद्दाम मग तीला आवडणार्‍याचं जर्नल मागायची, लेक्चरला दांड्या मारणारे हक्कानं लेक्चरला येऊन बसायचे. कॉलेजसुरु झाल्यापासुन ज्यांनी लायब्ररीकार्ड काढायची तसदी घेतलेली नसायची त्यांच दुर्लभ दर्शन कॉलेजच्या लायब्ररीला व्हायचं. लेक्चरला एरवी सरांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करणारे अचानक सरांच्या प्रश्नांना स्वतःहुन उत्तर द्यायची, कुणाला मग कधी न पडायचे असे प्रश्न पडायचे, कॉलेजनंतरही अभ्यासाला काही जण थांबायचे. 
            कॉलेजच्या कॅंटीनमध्ये एरवी मिळणारे पोहे, उपमा, वडापाव, समोसे, मेदुवडे, मिसळ, चहा, कोल्ड्रिंक्स यासारख्या पारंपारिक पदार्थांच्या जोडीला मग इडली, डोसे, व्हेज कटलेट्स, पेस्ट्रीज, आईसक्रीम्स, केक, पावभाजी, पाणीपुरी, कोल्ड कॉफी यासारख्या पदार्थांची रेलचेल असायची. कॉलेजचा युनिफॉर्म घालायचा नाही, त्याऐवजी फाईन भरणारे मग कडक इस्त्री केलेल्या कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये झळकायचे. कॉलेजमधल्या विध्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या श्री बच्छाव सर विध्यार्थीप्रिय शिक्षिका असलेल्या सौ. पोद्दार मॅडमच्या लेक्चरला मुल-मुली हक्कानं ऑफ मागायचे, वर्गात मग प्रत्येकजण आप-आपलं टॅलेंट सादर करायचा, एखादी गाणं चांगल म्हणायची, कुणाला डान्स छान जमायचा, काहीजण मिमिक्री करायचे, कधी अंताक्षरी रंगायची, सर व मॅडमही त्यांच्यावेळचे किस्से वर्गात मुला-मुलींना सांगायचे असं छान हसतं-खेळत वातावरण कॉलेजमध्ये असायचं. जणु श्रावणात धरणी जशी हिरवळीने सजुन जाते आणि वातावरण कसं प्रसन्न वाटतं अगदी कॉलेजमध्ये तसंच वाटत असायचं, एकप्रकारे जणु कोणीतरी जादुची कांडी फिरवलेली असायची व्हॅलेंटाईन डे असला की..! 
             पेपर झाल्यानंतर स्वराली आणि मैथिली दोघीजणी अर्जुनच्या वाढदिवसाला काय खास तयारी करायची याचा विचार करु लागल्या. "हे स्वराली, अर्जुनचा बर्थडे १४ फेब्रुवारीला असता तर तुला तर काही टेंशन घ्यायचीच गरज नसती, व्हॅलेंटाईन डे ला अर्जुनचा बर्थडे, आणि स्वराली त्याला प्रपोझ करतेयं व्वा हाऊ रोमॅंटिक..!" असं मैथिली तीला बोलली. "छे, मैथिली काहीपण डोकं चालवु नकोस तु, अर्जुन माझा बेस्ट फ्रेंड आहे कळलं, तु मला असंच चिडवणार असशील तर मी चालले," असं स्वराली थोडी लाजतच बोलली. "बरं, नाही चिडवतं, पण माझी कल्पना छान होती ना? अगं खरंच त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ना, त्यामुळे तुलाच छान काहीतरी सुचेलच बघं, आणि तु त्याच्यासाठी काही केलं तरी ते त्याला खुप आवडेल बघं, तुला एक गोष्ट मनापासुन सांगते कदाचित तुला वाटेल की मी काहीपण बोलतेयं, पण मला वाटत तु अर्जुनला खुप आवडतेस, मी नेहमी बघते जेव्हा तो तुला बघतो तेव्हा खुप खुष असतो," असं मैथिली बोलली. मैथिलीच्या या बोलण्यानं स्वराली क्षणभर गप्पच होती. मैथिलीच्या त्या वाक्यांनी तीचं मन सुखावलं होतं. 
                 "हे कायं गं स्वराली, रागावलीस का माझ्यावर?" असं मैथिली गप्पच असलेल्या स्वरालीला बोलली, मानेनचं तीनं नकार दिला आणि त्या दोघी घरी परतल्या. कॉलेजमध्ये अर्जुनचा ग्रुप दुपारी कॅंटीनमध्ये गप्पा मारत होता. "दोस्तांनो, तुम्हाला आज एक गुडन्युज देण्याचं मी आणि तेजालीनं ठरवलंय बरं का?" असं रितेश बोलला. "अरे व्वा, सांग की लवकर, शुभ काम में देरी क्यों?" असं शामली बोलली. "०७-०७-२००७ ला आम्ही सात फेरे घेऊन सातजन्माच्या बंधनात अडकणार आहोत.!" असं रितेश बोलला. "अरे म्हणजे तुम्ही कॉलेज पासाआऊट झाल्यानंतर  लगेच लग्न करणार आहात? आईशप्पथ काय सॉलिड गुड न्युज दिलीस रे, खरंच का?" असं हर्षित एकदम एक्साईट होऊन बोलला. "अगं तेजाली खरंच?" असं बाकीच्या मुली तिला बोलल्या. रितेश आणि तेजाली दोघांनी हसतच मान हलवुन होकार दिला. "अरे पण हे असं अचानक घडलं कसं रे?" असं अर्जुन बोलला. "अरे काल हिचा बर्थ डे होता, हिच्यासाठी मला काहीतरी खरचं खुप खास करायचं ठरवलं होतं, तिला घरी गेल्यानंतर मी आई-बाबांना तेजालीशी लग्न करणार असल्याचं सांगितलं, आई-बाबांनी विचार करुन होकार दिला, आणि आम्ही सगळे मग थेट तेजालीच्या घरी गेलो, तिथे माझे आई-बाबांनी तिच्या आई-बांबाशी बोलणी केली, आणि सगंळ जणु स्वप्नासारखं वाटावं असं घडलं." असं रितेश बोलला. "अरे खरचं याला म्हणतात प्रेम, तेजाली- रितेश तुम्ही दोघं मेड फॉर इच ऑदर आहात यात कुठलीच शंका नाही, कॉंग्रॅट्स..!"असं लावण्या बोलली. सगळ्या ग्रुपनं मग त्यांच अभिनंदन केलं. 
              "चला यंदाचा व्हॅलेंटाईन एकदम खास ठरेल तर मगं," असं अर्जुन बोलला. "अरे आमचा तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे पेक्षा काही कमी खास असतो का?" असं रितेश तेजालीकडे  बघुन बोलला. त्याच्या या वाक्यानं तेजाली पुरतीच लाजुन गेली, आणि जमलेल्या सगळ्यांना हसु आलं. थोड्यावेळानं मग ते लेक्चरला गेले. आज लेक्चरला त्यांना अनायसे ऑफ मिळाला, वर्गात मग मुलं-मुली जस्ट-अ-मिनिट खेळु लागले. "अर्जुन, तुला एक गोष्ट सांगतो तुला हसु येईल, बघं ना दरवेळी सोहम असायचा तर या बाकीच्या मुलांचा नुसता जळफळाट व्हायचा ना..! सोहम असं काही सादर करायला लागला की मुली काय खुष व्हायच्या, मागची मुलं त्याला कशी विनवत म्हणायची, "भाई एखादी तरी राहुद्या ना आमच्यासारख्यांवर प्रेम करण्यासाठी, सगळ्या मुली तुमच्याच प्रेमात पडायला लागल्या तर आम्हाला तर या वयात हिमालयात जायची वेळ येईल, कॉलेज लाईफमध्ये एकही गर्लफ्रेंड नाही असं सांगितल्यावर हसतात की बाकीचे..! काहीतरी दया करा तुमच्या भक्तांवर, आम्हाला काही टिप्स द्या," असं हर्षित बोलला. "हो रे, पण नुसतेच मागचे मुलं नाही तर तु सुद्धा असायचाच की त्यांच्याजोडीला विसरलास का?" असं म्हणत अर्जुनने त्याला कोपरखळी दिली, आणि मग ते दोघही हसायला लागले. 
                         वर्गात जस्ट-ए-मिनिटचा खेळ चांगलाच रंगात आला होता, तितक्यात लावण्या उठली आणि हर्षितला बोलली, "कविराज उठा, एखादी कविता म्हणा की..!" तीनं सगळ्यांसमोर त्याला कविता म्हणायला उठवलं हे बघताच वर्गात सगळी मुलं-मुली "कम ऑन कविराज, कविता, कविता," असं म्हणु लागले. हर्षित मग लाजतच कविता सादर करायला समोर आला, "चला मित्रांनो, खास तुमच्या आग्रहासाठी मी माझी नवंकविता सादर करतोय, "तो आणि त्याची ती" असं हर्षित बोलला. तितक्यात वर्गातल्या मुली एकासुरात ओरडल्या, "हर्षित कविता कुणाला डेडिकेट करतोय रे?" आणि सगळे हसायला लागले, लाजतच हर्षित बोलला, "लावण्या फक्त तुझ्यासाठी." सगळ्या मुली परत त्याला बोलल्या, "ऐकु नाही आलं, वन्स मोअर." आणि मग हर्षितने लावण्याकडे बघितलं, तिच्या नजरेला नजर भिडवत तो पुन्हा मोठ्यानं बोलला, "लावण्या फक्त तुझ्यासाठी," आणि त्यानं ती कविता सादर केली. वर्गातल्या प्रत्येकानं मनापासुन त्याला दाद दिली, कविता झाल्यानंतर मिनिटभर वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. लावण्या तर मनोमन सुखावली होती, तर हर्षितला जणु स्वर्गच सापडला इतका आनंद झाला होता. 
               अशीच मजा लेक्चरमध्ये येत असल्याने हल्ली मुलांचा अटेंडन्स १००% असायचा. टिचर्स रुममध्ये सर्व शिक्षक आप-आपसांत गप्पा मारतांना म्हणायचे, "कॉलेजध्ये निदान दोन महिन्यांनतर एखादा इव्हेंट ठेवायलाच हवा, म्हणजे नेहमी मुलांना अटेंडन्सच सांगायची कटकट चालली जाते, लेक्चरला मुलं लक्ष देतात, बरोबर का नाही पोद्दार मॅडम," असं बच्छाव सर बोलले. "हो ना, हेच तर वय असतं त्यांच शिकता शिकता मजा करायचं, कॉलेजचे दिवस परत परत थोडेच मिळतात, यंदाच्या सगळ्या बॅचेस खरच खुप ऍक्टिव्ह आहेत बरं का, आणि त्यातही हर्षित जोशीची बॅच खुपच छान आहे, मला तर माझे कॉलेजचे दिवस आठवतात त्यांच्या वर्गावर लेक्चरला गेलं की." असं सौ. पोद्दार मॅडम बोलल्या. इतर शिक्षकांनाही यानिमित्तानं त्यांच्या आठवणींची आठवण व्हायची.
                    कॉलेज सुटल्यानंतर आज अर्जुन एकटाच घराकडे चालला होता, घरी लवकर जाऊन त्याला स्वरालीला भेटायची ओढ लागली होती. हल्ली त्याला स्वरालीला भेटल्याशिवाय रहावतं नव्हतं, म्हणुनच त्याच्या पायांची गती वाढली होती. तितक्यात त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी त्याला माघुन हाक मारतयं त्याने मागे वळुन बघितलं तर त्याला चिराली दिसली. "अरे अर्जुन थांब ना, केव्हाची हाक मारतेयं रे, पण तुझं लक्षंच नव्हतं," असं ती एका दमात बोलली. "अगं जरा घाईतच होतो, पण तु सांग काय काम आहे?" असं अर्जुनने तिला विचारलं. "अरे तुला कसं सांगु रे, तुला तर सगळं महितीच आहे ना, सोहमला फार मिस करते रे." असं म्हणतांना ती उदास झाली होती. अर्जुनने तिच्याकडे सहानभुतीनं बघितलं आणि बोलला, "तुझ्या इतकचं आम्ही सगळेही त्यालाच नाहीतर बाकीच्या सगळ्यांना मिस करतो गं, आजच जस्ट-ए-मिनिट सुरु होतं त्यावेळीच हर्षितनं त्याची आठवण काढली होती." 
            "तेजाली आणि रितेशला बघितल्यावर मला सोहमच आठवतो रे, मला पुर्ण जाणीव होती की वर्गातल्या बर्‍याच मुली त्याच्यावर जीवापाड प्रेम करायच्या आणि तोही." असं म्हणतांना तिचे डोळे पाणावले. अर्जुनला तिला कसं समजवावं हा प्रश्न पडला. "रस्त्याच्या मध्ये उभं राहुन त्याच्यासाठी खुप मोठ्यानं रडावसं वाटतं, कुणी नाही निदान त्या चंदेरी चंद्रालाच माझ्या आसवांच कारण कळावं रे, त्याला मी कधीच विसरु शकत नाही रे अर्जुन." असं चिराली त्याला बोलली. तितक्यात तिथे मिताली आणि शामलीही येऊन पोहचली. अर्जुनने त्यांना चिरालीच्या दुखाःच कारण सांगितलं, मग त्यांनी तिला समजावलं, आणि मग ते घराकडे परतले.
                घरी आल्यावर अर्जुनला स्वरालीला भेटायचं होतं, दिवसभरात जे घडलं ते तिला सांगायचं होतं, म्हणुन तो तिची वाट बघत अंगणातच थांबला होता. पण रात्रीचे आठ वाजले तरी स्वराली अजुन कशी आली नाही म्हणुन त्याच मन बैचेन झालं होतं, "असं कसं झालं आज, स्वरालीची तब्येत तर बरी नसेल ना? रोज ती मला भेटायला येते आणि आज?" असं अर्जुन स्वगतच बोलला, आणि त्याने स्वरालीच्या घरी जाऊन तिला भेटुया असं ठरवलं. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळालं की स्वराली आज अभ्यासासाठी मैथिलीच्या घरीच रहाणार होती. अर्जुन मग घरी आला, "मैथिली कुठे रहाते, ते विचारायला हवं होतं आपण, निदान तिचा फोन नंबर तरी घ्यायला हवा होता, छे आज काही स्वरालीशी बोलण होणार नाही असं दिसतेयं," असं अर्जुन मनातच बोलत होता तोच त्याच्या घरच्या फोनची रिंग वाजली. 
           "नक्कीच स्वराली असणार..!" असं आनंदाने म्हणत त्याने तो फोन उचलला, आणि समोरुनही स्वरालीच बोलतच होती. "अगं स्वराली तुला माहिती आहे का, केव्हाचं तुझी आठवण काढत होतो बघं, इतक्यात तुझ्या घरी जाऊन आलो आणि कळलं की तु तर आज मैथिलीच्या घरी आहे ते, बरं तुझा पेपर कसा होता?" असं अर्जुन बोलला. "अरे अर्जुन, पेपर तर इतका सोप्पा होता की बस्स, मैथिलीलापण खुप सोप्पा गेला पेपर, आणि सॉरी अर्जुन तुला न सांगताच इकडे आले, उद्या मॅथचा पेपर आहे ना, म्हणुन मी आणि मैथिलीनं एकत्रच अभ्यास करायचं ठरवलं होतं." असं स्वराली त्याला बोलली. "छे गं, त्यात काय सॉरी म्हणतेस, तुझा पेपर महत्वाचा आहे, मन लावुन अभ्यास करा दोघीपण, उद्या येईल तुमचा पेपर झाला की भेटुया, आता फोन ठेवतो तुम्हाला अभ्यासात डिस्टर्ब नको, चल गुड नाईट," असं म्हणुन अर्जुनने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतरही त्याला स्वरालीशी बोलायची इच्छा होत होती. 
                 हर्षित थोड्यावेळानं अर्जुनच्या घरी आला, "हाय अर्जुन, तुझ्याकडे एक काम आहे यार, पण आपल्या दोघांशिवाय लावण्याला कळायला नको," असं हर्षित बोलला. "अरे असं कोणत काम आहे? आणि लावण्यापासुन आत्ताच लपवाछपवी करायला लागलास का?" असं अर्जुन हसतच बोलला. "अरे तसं नाही रे, तुला तर माहिती आहे ना परवा व्हॅलेंटाईन डे आहे ते, माझ्या आयुष्यातला पहिलाच आहे म्हणुन तो एकदम स्पेशल करायचा आहे रे," असं हर्षित बोलतांना उतावीळ झाला होता. "अरे हर्षित, तु तर असं बोलतोयं जसं की तो तुझा पहिला आणि शेवटचा. जाऊदे बरं काही ठरवलयं का?" असं अर्जुन हसतच त्याला बोलला. "नाही रे, हे असलं पहिल्यांदाच आहे ना आपल्या आयुष्यात भाई," असं हर्षित बोलल्यावर अर्जुनला हसु आवरणं अवघड झालं, "तु तर असा म्हणतोय की मला खुप सार्‍या व्हॅलेंटाईन डे चा अनुभव आहे, मी काय तुला मदत करणार? सोहम असता तर नक्की मजा आली असती बघं," असं अर्जुनने त्याला समजावलं. "अरे तु असं का बोलतोयं? म्हणजे तु आणि स्वराली." असं हर्षित बोलला, त्याला मध्ये थांबवतच अर्जुननं त्याला सांगितलं, "हे हर्षित, असं काही मनात विचार करु नको रे, ती आणि मी दोघंही बेस्ट फ्रेंड्स आहोत बस्स..! अर्जुनचं वाक्य मध्येच थांबवत हर्षित बोलला, "यार, तु तर रिलेशन स्टॅटसच क्लियर केल्यासारखं बोलतोयं, पण मला नाही वाटत तुम्ही नुसतेच बेस्ट फ्रेंड्स आहात, तुमच्यात त्यापेक्षाही खास नात आहे असं मला वाटतं रे, तु आणि स्वराली एकत्र का येत नाही तेच आम्हाला कळत नाही बघं, मला माहिती आहे की ती तुला खुप आवडते, मग तु का तिला प्रपोझ नाही करत रे अर्जुन? सोहम म्हणायचं तसं अभी नहीं तो कभी नहीं रे.!" असं हर्षितनं त्याला विचारलं. 
              हर्षितच्या प्रश्नानं अर्जुन निरुत्तरीत झाला, हर्षितला काय सांगावं हे त्याला सुचेना, "अरे माझं जाऊदे रे, आपण ठरवुया ना लावण्या आणि तुझ्या बद्दल," असं अर्जुन बोलला, "विषय बदलु नको अर्जुन, आधी मला सांग तु स्वरालीला सांगणार आहेस की नाही?" असं हर्षितच्या बोलण्यावर अर्जुनने क्षणभर त्याच्याकडे बघितलं, "काळ आला आहे रे, पण अजुन वेळ आली नाही हर्षित..!" असं म्हणत अर्जुनने हर्षितला परत त्याबद्दल बोलायला मनाई केली. थोडावेळानं मग हर्षित तिथुन निघुन गेला, तो गेल्यावर अर्जुन हर्षितच्या बोलण्याचा विचार करु लागला. त्याला एकदा वाटायचं की स्वरालीला सांगावं की तो तिच्यावर प्रेम करतो ते, पण पुन्हा त्याच्या मनानं तो विचार केव्हाच खोडलेला असायचा. आकाशात दाटुन आलेल्या काळ्या मेघांच्या उपस्थितीनं धरणी जशी सुखावते अगदी तसंच अर्जुनच्या मनाचं झालं होतं, स्वरालीच्या नसण्यापेक्षा ती असण्यानेच तो समाधानी होता. 

No comments:

Post a Comment